पुणे : कोणत्याही लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. चिंचवडमध्ये भाजपने ही परंपरा जपली, मात्र कसबा पेठ मतदारसंघात ती परंपरा जपली गेली नाही. कसब्यात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व प्रकारामुळे भाजपमधील नाराजी नाट्य उघड झाल्याची चर्चा होत आहे. यानंतर कसबा पेठेतील भाजपविरोधातील वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा गेला. आता नंबर बापटांचा का? असा मजकूर लिहिलेले बॅनर्स कसबापेठेत लागले आहेत.
कसब्यात अशा आशयाचे बॅनर लावून भाजपला चिमटे काढल्याचे दिसत आहे. कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा का?, असा सवाल या बॅनर्समधून विचारण्यात आला आहे. त्यामुळे या बॅनर्सची पुण्यात जोरदार चर्चा आहे. मात्र हे बॅनर्स कुणी लावले, बॅनर्सवर कुणाचंही नाव नाही. पण पक्षात असणाऱ्या नाराजांनी हे बॅनर्स लावले असल्याचे सांगितले जात आहे.