विधान भवनाचं पावित्र्य राखलं पाहिजे; उपमुख्यमंत्री शिंदेंची ‘त्या’ घटनेवर मोठी प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान भवनातील राड्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काल घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. विधानसभेच्या सभागृहाच्या परिसरात आजपर्यंत अशी घटना घडली नव्हती. हे सार्वभौम सभागृह आहे. याचं पावित्र्य राखलं पाहिजे, अशी मोठी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्य विधी मंडळात पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. याच अधिवेशनात काल विधानभवनाच्या परिसरात शरद पवारांचे नेते जितेंद्र आव्हाडांचे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने चांगलाच हाय व्हॉल्टेज ड्रामा विधीमंडळात बघायला मिळाला. यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी तुंबळ हाणामारी देखील केली. त्यामुळे एकच गदारोळ उडाला. या घटनेवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि सभागृह अध्यक्षांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. ही घटना अक्षम्य आहे. विधानभवनाच्या परिसरात आपण सर्वसामान्य जनतेला न्याय देतो. कायदे बनवतो. त्यामुळे या पवित्र वास्तूचं पावित्र्य देखील तसंच राखलं गेलं पाहिजे. म्हणून कडक कारवाई व्हावी अशी सगळ्यांची भावना असल्याचं देखील यावेळी बोलताना शिंदेंनी सांगितलं.
