पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवलाय. कुठं दरड कोसळली, कुठं पुरात नागरिक अडकले तर कुठं थेट कोव्हिड रुग्णालयात पाणी घूसून थेट रुग्णांना प्राण गमवावे लागले. राज्यातील विविध घटनांमध्ये आतापर्यंत एकूण 71 जणांचा मृत्यू झालाय. यात चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटलमधील कोव्हिड सेंटर, महाडमधील तळीये, साताऱ्यातील आंबेघर, रायगडमधील पोलादपूर आणि साताऱ्यातील वाईचा येथील घटनांचा समावेश आहे.
पावसाच्या थैमानामुळे निर्माण झालेली महाराष्ट्रावरील संकटाची मालिका थांबताना दिसत नाही. चिपळूणमध्ये दरडी कोसळून 38 लोक दगावल्याची घटना ताजी असतानाच कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आल्यामुळे व्हेंटिलेटरवरील 8 रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली. गेल्या 4 दिवसांपासून कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोकणात अनेक भागात पूर आला आहे.