भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नवी घोषणा दिली. आजपर्यंत आपण ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या धोरणानुसार चालत होतो. मात्र, आता बदलती परिस्थिती पाहता ‘सबका प्रयास’ हा आणखी एक घटक त्यामध्ये जोडावा लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. भारताच्या 100व्या स्वातंत्र्यदिनासाठी आपण आतापासूनच काही संकल्प केले पाहिजेत. बदलत्या युगानुसार नागरिकांनीही स्वत:मध्ये बदल केले पाहिजेत. भारताचा 100 वा स्वातंत्र्यदिन साजरा होईल तेव्हा देश पायाभूत सुविधा आणि अन्य सुविधांच्याबाबत पुढारलेला असला पाहिजे. विकासाची गंगा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे. हा विकास सर्वांगीण आणि सर्वस्पर्शी असावा. सरकारला विनाकारण नागरिकांच्या आयुष्यात हस्तक्षेप करायला लागू नये, असा संकल्पही आपण करुयात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.