Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र समोर आले आहे. नदीत रसायनयुक्त पाणी सोडण्यात आल्याने इंद्रायणीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात फेस तयार झाला असून, यामुळे वारकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र समोर आले आहे. नदीत रसायनयुक्त पाणी सोडण्यात आल्याने इंद्रायणीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात फेस तयार झाला असून, यामुळे वारकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला अवघे चार दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्याने भाविकांमध्ये चिंता वाढली आहे. दरवर्षी लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असताना, नदीचे वाढते प्रदूषण हा गंभीर प्रश्न बनला आहे.
स्थानिकांकडून नदीत औद्योगिक किंवा रसायनयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप करण्यात येत असून, या प्रकाराची तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, पालखी सोहळ्यापूर्वी इंद्रायणी नदी स्वच्छ करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वारकरी आणि नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेमुळे धार्मिक आणि पर्यावरणीय दोन्ही स्तरांवर चिंता व्यक्त केली जात असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
