Kalyan : कल्याणमध्ये जलवाहिनी फुटली अन् पालिकेचा गजब कारभार, सुविधा न देता KDMC टँकर माफियाच्या पाठीशी?
कल्याण पश्चिमेच पाणीबाणी असताना महापालिकेकडून नागरिकांना सुविधा देण्याऐवजी पालिका टँकर माफियाच्या पाठीशी असल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिका ही नागरिकांची सेवा करणारी यंत्रणा आहे की कमाई करणारी संस्था? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जातोय.
कल्याण पश्चिमेतील मुख्य जलवाहिनी फुटल्यानंतर तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलाय. नागरिकांना पाणी न देता पालिकेकडूनच 400 रुपयांना टँकर देण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत 500 हून अधिक टँकर विकल्याची माहितीही समोर येत आहे. तर खासगी पाण्याच्या टँकरचे दर वाढले असून 500 रुपयात मिळणारा टँकर एक हजार ते दीड हजारापर्यंत मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, गेल्या तीन दिवसापासून पाणी नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांवर रात्रीच्या अंधारात रांगा लावून टँकरमधून पाणी भरण्याची वेळ आली आहे. तर दोन दिवस रात्रं-दिवस काम करून पाईपलाईन दुरुस्ती करत पाणीपुरवठा सुरू केला असून ज्या भागात पाणी मिळत नसेल त्यांनी तक्रार केल्यास त्या ठिकाणी देखील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
Published on: Jun 12, 2025 04:23 PM
