गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापुरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज संध्याकाळी राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले जाणार असल्याने कोल्हापूरला पुराचा आणखी फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूरपरिस्थितून नागरिकांची सुटका करण्यासाठी नेव्ही आणि आर्मीलाही सज्ज करण्यात आलं आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात सरासरी 150 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आज रात्रीपर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी 53 फुटावर जाण्याचा अंदाज आहे.