Maharashtra Local Elections: कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी…तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन् नेत्यांनाच सवाल

| Updated on: Dec 31, 2025 | 11:21 AM

महाराष्ट्रभरातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कार्यालयात राडा केला, तर नाशिकमध्ये तिकीट वाटपातील गैरव्यवहाराचे आरोप करत कार्यकर्त्यांनी एबी फॉर्मच्या वाटपाला विरोध केला. अनेक शहरांमध्ये तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी डावलल्याने सर्वच पक्षांमध्ये, विशेषतः भाजपमध्ये, कार्यकर्त्यांचा तीव्र असंतोष समोर आला. छत्रपती संभाजीनगर येथे भाजपने निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्याने श्री अण्णा भंडारींसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात जोरदार आंदोलन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्नही केला. सुवर्णा बताडे आणि दिव्या मराठे यांसारख्या महिला कार्यकर्त्यांनीही तिकीट न मिळाल्याने आमरण उपोषणाचा इशारा दिला.

नाशिकमध्येही भाजपने पदाधिकाऱ्यांकडून फार्म हाऊसवर एबी फॉर्म वाटप सुरू असताना कार्यकर्त्यांनी गेट तोडून प्रवेश केला. २०-२० वर्षे काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलून २ कोटी रुपये घेऊन तिकीट वाटप केल्याचा गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी केला. तसेच नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या वाहनाचा इच्छुकांनी पाठलाग करत आपला संताप व्यक्त केला. चंद्रपूरमध्येही राकेश बोमनवार यांनी सर्वेक्षणामुळे तिकीट कापल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली. एकूणच, तिकीट वाटपातील अनियमितता आणि निष्ठावंतांना डावलल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष दिसून आला.

Published on: Dec 31, 2025 11:21 AM