मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. त्यानंतर आता वाढत्या उष्णतेचा सामना हा नागरिकांना करावा लागत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून अनेक ठिकाणी पारा हा 40 शी पार गेल्याची नोंद झाली आहे. राज्यात मंगळवारी बहुतांश ठिकाणी तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या तापमानाने अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवली. चंद्रपूर, गोंदिया येथे 43 अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेलं आहे. तर नागपूरमध्येही 42 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तर मुंबई आणि पुण्यात देखील वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना फटका बसताना दिसत आहे. येथील तापमान 40 अंश सेल्सिअसच्यावर नोंदवले गेले आहे. राज्यात 14 ठिकाणी कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसवर गेल्याचे दिसून आले.