मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परिक्रमा यात्रेच्या माध्यमातून पूरग्रस्त शेतकऱ्यांची मदत करावी अशी मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांना घेऊन यात्रेच्या माध्यमातून आंदोलन केले. त्यांनतर त्यांनी नृसिंहवाडी येथे सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांबाबत संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निर्णय घेतला नाही तर स्वाभिमानीने जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार स्वाभिमानीचे शेकडो कार्यकर्ते नृसिंहवाडीत पोहोचले होते. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजपाटा तैनात होता. पोलिसांनी काही विपरीत घडू नये यासाठी सर्व बंदोबस्त केला होता. तरीही काही कार्यकर्ते पंचगंगा नदीपात्रात जाण्यात यशस्वी झाले होते. एका शेतकऱ्याने थेट नदीपात्रात उडी घेतली होती. पण पोलिसांनी त्याला तातडीने बोटीत घेतलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता.