विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली! शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया
शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून मोठा दावा केला आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजित पवारांकडे सोपवण्याचा निर्णय झाला होता. अजित पवारांच्या निधनामुळे हे स्वप्न अपूर्ण राहिले. विलीनीकरण घडवून आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे शिंदे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. पवारांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून त्यांनी म्हटले आहे की, दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाला होता. अजित पवारांना खरी श्रद्धांजली म्हणून पक्षाला पुन्हा मजबूत करण्यासाठी विलीनीकरण घडवून आणणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
शिंदे यांच्या दाव्यानुसार, 12 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत, विलीनीकरणानंतर पक्षाचे सर्व नेतृत्व अजित पवारांकडे देण्यासंदर्भात शरद पवार आणि सर्व नेत्यांनी एकमताने निर्णय घेतला होता. कार्यकर्त्यांचीही तीव्र इच्छा होती की अजित पवारांनी पक्षाची सूत्रे हाती घ्यावीत.
परंतु, काळाने मध्येच झडप घातल्याने अजित पवारांचे अपघाती दुर्दैवी निधन झाले आणि दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की, आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना एकत्र आणणे ही सर्वांची जबाबदारी आहे. प्रामाणिक प्रयत्न करून मन मोठे केल्यास हे शक्य होईल आणि तीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल. दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाच्या संदर्भात चर्चा सातत्याने सुरू असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
