मुंबई : येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना तयारीला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “शाखाप्रमुखांना न भेटल्यास काय होतं, ते पाहिलं असेल. गेल्या 10 महिन्यात बदलती मुंबई, बदलता महाराष्ट्र आपण पाहतोय.एकनाथ शिंदे यांचं म्हणणं, पक्षाचा विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, समस्या ऐकण्यासाठी मी आलो आहे. यापूर्वी घरी बसणारे लोक आता बाहेर पडायला लागलेत. ठाण्यात दिघे साहेबांच्या आशीर्वादानं ठाणे महापालिकेवरूल भगवा कधी उतरला नाही. ठाण्यात सोयीसुविधा,बिल्डर आणण्याचं काम आम्ही केलं. 25 वर्ष मुंबईत सत्ता असून मुंबईचे प्रश्न सुटले का?, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. आज मुंबईच्या रस्त्यांची स्थिती पाहा, दरवर्षी खड्डे, एखाद्या राज्याला लाजवेल इतकं आपलं बजेट आहे,पण प्रश्न अजून सुटले नाहीत. मुंबईतील ड्रेनेज वॉटर प्लांट साधं बांधू शकला नाहीत, हे पाप आहे. खूप वर्ष खोके मोजायची सवय होती, ती मोडल्यानं सारखं खोके खोके म्हणत आहेत”, असं देखील श्रीकांत शिंदे म्हणाले.