त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात. अमरावतीत दंगल उसळते. जनतेच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष भरकटवण्यासाठीच अशा दंगली घडवल्या जातात. मात्र अमरावतीत जे घडले, तशी घटना महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात घडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सोडायचं नाही. अशा लोकांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी औरंगाबादेत दिला आहे. यावेळी राज ठाकरे जहाल हिंदुत्वाकडे वळाल्याचं पाहायला मिळत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या औरंगाबाद दौऱ्यात हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. शहरात राज ठाकरे येण्यापूर्वी जय श्रीराम चा नारा देणारे बॅनर लावण्यात आले होते. तसेच कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उद्देशून बोलताना राज ठाकरे यांनी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर मनसेचा झेंडा असला पाहिजे, असे आदेश दिले. तसेच शहरातील प्रत्येक चौकात पक्षाचा झेंडा लावा असेही ते म्हटले. निवडणुकीपूर्वी लोकांचा विश्वास संपादन करा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.