Sanjay Raut : परप्रांतीयांकडून नाही, अंतर्गत शक्तींकडूनच.. ; राऊतांचा भाजप-शिंदे गटावर पलटवार
Sanjay Raut Full Press : ठाकरे बंधूंचा एकत्र येण्यावर टीका करण्यावरून आज राऊतांनी भाजपवर पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याचा उत्साह अद्यापही कायम आहे, आणि या मेळाव्याची सर्वत्र चर्चा होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील जनता गेली 20 वर्षे या क्षणाची वाट पाहत होती. या मेळाव्याने विशेषतः मराठी जनतेच्या अपेक्षा उंचावल्या असून, उद्धव आणि राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट भूमिका अपेक्षित आहे. मात्र, योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात, असे राऊत यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्याला रुदाली संबोधले होते, यावर राऊत यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, ऑपरेशन सिंदूरसुद्धा एकप्रकारे रुदालीच आहे. 1857 चा उठावही अशाच रुदालीतून उभा राहिला होता. तसेच, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकजुटीत खोडा घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.
राऊत यांनी पुढे म्हटले की, भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते सातत्याने उद्धव आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे अशक्य असल्याचे सांगत होते. आता ते ही युती कशी टिकेल, हे आम्ही पाहू असे म्हणत आहेत. राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला, ठाकरे बंधूंच्या एकजुटीला आव्हान परप्रांतीयांकडून नाही, तर महाराष्ट्रातील अंतर्गत शक्तींकडून आहे. एकत्र कसे येतात, हे पाहतो म्हणजे तुम्ही ठाकरेंवर नियंत्रण ठेवत आहात का? मराठी माणसाला एकत्र येऊ देत नाही का? उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील राजकीय निर्णय कधी होईल, याबाबत चर्चा सुरू असली, तरी राऊत यांनी ठामपणे सांगितले की, या संदर्भात योग्य वेळी निर्णय होईल, याची खात्री आहे. तसेच, ठाकरे बंधूंच्या युतीत खोडा घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी पुन्हा केला.
