Maharashtra News LIVE : पावसाची दमदार बॅटिंग, मुंबईसह राज्यात संततधार
Maharashtra News LIVE : राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात संततधार सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे.अनेक भागात नदी नाले एक झाले आहेत. तर दमदार पावसामुळे पेरणीला वेग आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
परशुराम घाटात आणखी एक नवा धोका
चिपळूणच्या परशुराम घाटात आणखी एक नवा धोका निर्माण झाला. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहासाठीचा सिमेंट काँक्रीट मार्ग खचला आहे. पायऱ्यांच्या स्वरूपातील काँक्रीट चॅनल तुटले आहे. तुटलेला काँक्रीटचा भाग खाली कोसळण्याच्या स्थितीत आहे. तुटलेला भाग कोसळल्यास पेढे गावाला धोका निर्माण झाला आहे. घाटाच्या संरक्षण व्यवस्थेलाच तडा गेला. गॅबियन भिंतीच्या पायाखालची मातीही सरकली आहे. त्यामुळे दुहेरी धोक्यामुळे परशुराम घाटाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. घाट संरक्षणाचे काम ऐरणीवर आले आहे. धोकादायक तुटलेला भाग तातडीने हटविण्याची गरज आहे.
-
धाराशिव जिल्ह्यात भूगर्भातील गूढ आवाजाची मालिका सुरूच
धाराशिव जिल्ह्यात भूगर्भातील गूढ आवाजाची मालिका सुरूच 109 दिवसांत 19 वेळा आवाज आला. काल उशिरा पुन्हा जिल्ह्यात गूढ आवाज आला. दारे-खिडक्या हादरल्या. प्राथमिक अंदाजानुसार, हिंगोलीतील 3.5 रिश्टर स्केल भूकंपाचा परिणाम असू शकतो आसा एक्सपर्ट चा अंदाज आहे. 2 एप्रिल 2025 रोजी पत्र पाठवूनही 120 दिवसांपासून तज्ज्ञांचे पथक दाखल नसल्याची जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांची माहिती दिली. नागपूरच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला जिल्हा प्रशासनाचा पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणी अद्याप नाही. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, गूढ आवाजांचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
-
-
पावसानंतरही पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई
मान्सून सक्रिय होऊनही पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई कायम आहे. जिल्हा प्रशासनाच्या १५१ टँकरद्वारे २५७ गावे आणि ६३२ वाड्यावस्त्यांतील २ लाख ५८ हजार नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. पुरंदर, जुन्नर आणि खेड तालुक्यांत सर्वाधिक टँकर सुरू असून, भूजलपातळी न वाढल्याने टँकरवरील अवलंबित्व अद्याप कायम असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
-
मुंबईत पावसाची रिपरिप
काल रात्रीपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम अंधेरी सबवेमध्ये दिसून येत आहे. अंधेरी सबवे गेल्या 15 मिनिटांपासून बंद करण्यात आला होता. सध्या पाणी कमी झाल्यानंतर वाहनांच्या वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आला आहे.
-
उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
आज उद्धव ठाकरे यांची दुपारी पत्रकार परिषद आहे. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. पक्ष बांधणीसाठी हा दौरा महत्त्वाचा होता. मुंबईत येताच त्यांचे जवळचे सहकारी सचिन अहिर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. या सर्व घडामोडींवर आज ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
-
Maharashtra News LIVE : राज्यात मान्सूनने उशीरा का असेना चांगली धडक दिली. तळकोकणापासून ते मुंबईपर्यंत ढगांची गर्दी जमली आहे. राज्यात सर्वदूर पावसाच्या आगमनाने डोंगररागांनी हिरवाईचा शालू नेसला आहे. तर धबधबे प्रवाहित झाले आहेत. राज्यातील अनेक भागात दमदार पावसामुळे नदीनाले एक झाले आहेत. मुसळधार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. तर पहिल्याच जोरदार पावसामुळे प्रशासनाचे पितळ उघडं पडलं आहे. मान्सूनपूर्व साफसफाईची कामे न केल्याने अनेक शहरात रस्त्यावर पाणी तुंबले आहे. काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. संसारपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे.
मातोश्रीवर आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे. उद्धव ठाकरे हे नुकताच बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करून आले आहेत. ते परतले नाही तोच त्यांचे विश्वासू सहकारी सचिन अहिर यांनी शिंदे गटात उडी घेतली. ते आता विधान परिषदचे उपसभापति आहेत. या सर्व घडामोडींवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर शेतकऱ्यांना राज्य सरकारने आनंदवार्ता दिली आहे. तर शेतीकामांसाठी गौण खनिजांवरील रॉयल्टी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
Published On - Jul 03,2026 7:59 AM
