BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, 20 जागांवर घोडे का अडले?
Mumbai Municipal Corporation Election 2026: बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अखेर महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आला आहे. पण अजूनही 20 जागांवर घोडे आडले आहे. काय आहे कारण, कसा आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला?

BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणूक 2026 साठी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात जागा वाटपाबाबत सहमती झाली आहे. दोन्ही पक्षांमध्ये एकूण 227 मधील 207 जागांचा तिढा सुटला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटप अत्यंत महत्त्वाचे मानल्या जात होते. पण अजूनही 20 जागांचा पेच कायम आहे. याविषयी लवकरच दोन्ही पक्षांतील नेते बैठक घेऊन निर्णय घेतील अशी माहिती समोर येत आहे. आता उमेदवारी भरण्याची तारीख जवळ येत असल्याने जागा वाटपाचे गुऱ्हाळ अधिक न लांबवण्याचा निर्णय झाल्याचे समजते.
असे होईल जागा वाटप
भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागा वाटपाचे सूत्र ठरले आहे. त्यातंर्गत भाजप 128 जागांवर तर शिवसेना शिंदे गट 79 जागावर निवडणूक लढवेल. मुंबई महापालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत आणि आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेसाठी यंदा भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवण्याची तयारी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष या निवडणुकीत वेगवेगळे लढत आहेत. त्याचा फायदा घेत एकीने निवडणूक लढवण्याचे नियोजन झाले. तुटेपर्यंत न ताण्याचे धोरण अवलंबले गेले. त्यामुळे जागा वाटपात जास्त वाद झाले नसल्याचे समोर येत आहे.
भाजप,शिवसेना आणि महायुतीची बैठक
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी जागा वाटपाविषयी माहिती दिली. त्यानुसार, भाजप, शिवसेना आणि महायुतीची एक महत्त्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांची एकत्रित निवडणूक सभा, रॅली याविषयी चर्चा झाली. जागा वाटपावर सहमती झाली आहे. 207 जागांवर दोन्ही पक्ष लढतील. तर 20 प्रभागांवर दोन्ही पक्षातील वरिष्ठांची लवकरच चर्चा होईल असे साटम म्हणाले. त्यानंतर कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार उतरवणार हे समोर येईल असे ते म्हणाले.
20 जागांवर लवकरच तोडगा
तर शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी जागा वाटपावर सहमती झाल्याचे सांगितले. त्यानुसार, भाजप 128 आणि शिवसेना शिंदे गट 79 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर उर्वरीत 20 जागांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वरिष्ठांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल असे शेवाळे म्हणाले.
