राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यानंतरही राज्यपालांनी काहीच निर्णय न घेतल्याने त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींवर जोरदार हल्ला चढवला आहे. कॅबिनेटमधील प्रमुख सदस्यांनी राज्यपालांना विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तारखेविषयी कळवलं आहे. राज्यपालांना विधिमंडळाचं स्वातंत्र्य आणि महाराष्ट्र सरकारचं महत्त्व कळत असेल तर त्यांनी ताबडतोब तारीख दिली पाहिजे, असं सांगतानाच राज्यपाल हे भापजचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपालांना लक्ष्य केलं. तसेच फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरूनही भाजपवर हल्ला चढवला.