Aashish Shelar : …तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना… आशिष शेलार यांचा दोन्ही ठाकरेंना टोला
राज्य सरकारने गडकिल्ले आणि संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नवीन धोरण जाहीर केले आहे. यासोबतच भाजप नेते आशिष शेलार यांनी अंबरनाथ येथील गोळीबाराच्या घटनेचा निषेध केला. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेला आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी शिंदे गटाला टेस्ट ट्यूब बेबी म्हटले होते. यावरभाजप नेते आशिष शेलार यांनी राऊतांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नसली तरी, त्यांना एक प्रश्न विचारला की, तुम्ही शिवतीर्थावर जाऊन झिम्मा खेळून आलात, अनिल परब यांना घेऊन फुगडी घालून आलात, तरी शिवतीर्थावरचा चाफा ना डोलेना, ना बोलेना. शिवतीर्थावर वारंवार जाण्यामागे मनधरणी किंवा पायधरणी चालू आहे का, याचा खरा अर्थ त्यांनी स्पष्ट करावा, असे आवाहन शेलार यांनी केले. तसेच, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला उद्देशून शेलार म्हणाले की, जेव्हा युतीत होता, तेव्हा मातोश्रीवर येऊन चर्चा केली जात असे. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील पराभव समोर दिसल्यावर उद्धव ठाकरेंची अकड कुठे गेली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
