मी पाठमोरा होतो. केबिन एवढीशी. मग मतपत्रिका यांना दिसली कशी? थ्रीडी कॅमेरे आहेत की काय यांच्याकडे, असा सवाल करत भाजपावाले बावचळलेत, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मुंबईत राज्यसभेसाठीचे मतदान केल्यानंतर त्यांनी ही टीका केली आहे. आव्हाडांनी जयंत पाटील यांच्या हाती मतपत्रिका दिल्याने आव्हाडांच्या मतावर भाजपा आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेतला, त्यावर आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली. आव्हाड यांच्यासह काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्याही मतावर आक्षेप घेण्यात आला. आव्हाड म्हणाले, की मतदानावर जे नियम आहेत, त्याप्रमाणे मतदान केले. ते (भाजपा) काय बोलतात, यावर आम्ही प्रतिक्रिया द्यायची का, असा सवाल त्यांनी केला आहे.