कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत. गेल्या दोन दिवसांत प्रचंड पावसामुळे कोकण रेल्वेची सेवा ठप्प झाली होती. मात्र, आता पाऊस थांबल्यामुळे कोकण रेल्वेची सेवा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने ट्विट करून दिली.
महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईलगतच्या कल्याण, बदलापूर, कर्जत भागांतही पाऊस कोसळत आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री आणि काळ नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले. महाबळेश्वर येथे धो धो पाऊस पडत असल्याने त्या पाण्याचे लोट सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरले आहेत. कोल्हापूरची स्थितीही गंभीर आहे. अशा तऱ्हेने मुसळधार पावसाने राज्यापुढे नवे संकट उभे केले आहे.