संपूर्ण महाराष्ट्रभरात पावसानं हाहा:कार माजलाय. चिपळूण आणि महाडमध्ये महापुराचं संकट ओढावलं असतानाच आता महाराष्ट्रावर दरडींनी घाला घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रत्नागिरी, रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाडच्या तळीये गाव, साताऱ्यातील आंबेघर गावात, तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडी आणि खेडच्या धामणंदमध्ये दरड कोसळून अनेक घरं गाडली गेली आहेत. 3 जिल्ह्यातील या दुर्दैवी घटनांमुळे महाराष्ट्रावर भीषण संकट ओढावल्याचं दिसून येत आहे. राज्याच्या या सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अमित शाहांमध्ये फोनवर चर्चा झाली आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला मदतीचं आश्वासन देखील देण्यात आले आहे.