BMC Mayor : मराठी, उत्तर भारतीय नंतर आता बुरखेवाली… मुंबई महापौर पदावरून राजकीय रणकंदन, वारिस पठाण यांच्या विधानानं वाद

| Updated on: Jan 02, 2026 | 11:39 AM

मुंबई महापौर पदासाठी निवडणुकीच्या प्रचाराआधीच राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. कृपाशंकर सिंग यांच्या उत्तर भारतीय महापौर विधानानंतर वारिस पठाण यांनी बुरखेवाली महापौर होईल, असे म्हटले. यावरून ठाकरे गट, मनसे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, तर संजय निरुपम यांनीही उत्तर भारतीयांच्या बाजूने उडी घेतली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच महापौर पदावरून राजकीय वादंग सुरू झाले आहे. भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होऊ शकतो, असे विधान केले होते. यानंतर एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी मुंबईत बुरखेवाली महिला महापौर होईल, असे वक्तव्य करत वादात उडी घेतली आहे. पठाण यांनी इन्शाअल्लाह, हिजाब घालणारी महिलाही मुंबईची महापौर बनेल, असे म्हटले आहे. या वक्तव्यांवरून विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. नितेश राणे यांनी ठाकरे गटावर टीका करत, त्यांनी वारिस पठाण यांच्या बुरखा, खान-पठाण या विधानांवर मौन का बाळगले, असा सवाल केला. तसेच, मनसेही यावर गप्प असल्याचे म्हटले. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनीही उत्तर भारतीयांच्या बाजूने उडी घेत, एमआयएमच्या बुरखेवाली महापौर चालते, मग हिंदू आणि हिंदी समाज का नाही, असा सवाल केला. मुंबईत 35-40% मराठी, 20% मुस्लिम, 15% उत्तर भारतीय आणि 15% गुजराती मतदार आहेत. त्यामुळे महापौरपदाचा वाद आता जातीय, भाषिक आणि प्रादेशिक बनला आहे.

Published on: Jan 02, 2026 11:39 AM