मोठी बातमी! एकाला वाचवायला गेले… पण चौघांचाही जीव गेला! साताऱ्यात एकाच कुटुंबावर काळाचा घाला
राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि विविध दुर्घटनांच्या घटना घडत आहेत. या पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला असून, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि विविध दुर्घटनांच्या घटना घडत आहेत. या पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला असून, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरासमोरील विद्युत केबलच्या तारेचा स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली. एका व्यक्तीला वाचवण्यासाठी इतर कुटुंबीय धावले असता, एकामागोमाग एक सर्वांनाच विजेचा धक्का बसल्याने चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेत दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच फलटण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वीजवाहिन्या, ओले विद्युत उपकरणे आणि पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
