Maharashtra News LIVE : देशात अमरावती सर्वात हॉट, पारा 46 अंशावर; विदर्भात पुढील 5 दिवस उष्णतेची तीव्र लाट
देशात सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमानासह अमरावती होरपळले; विदर्भात पुढील ५ दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असली तरी २२ मेपासून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यासह महत्वाच्या बातम्यांचे अपडेट जाणून घ्या या ब्लॉगमध्ये...

LIVE NEWS & UPDATES
-
अमरावती देशात सर्वाधिक उष्ण, पारा ४६ अंशांवर; पुढील ५ दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज
भारतीय हवामान खात्याने दक्षिण अंदमानात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली असली, तरी दुसरीकडे विदर्भात सूर्याचा प्रकोप सुरूच आहे. शनिवारी देशातील सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली असून, पुढील पाच दिवस संपूर्ण विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. सकाळपासूनच पडणाऱ्या कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, २१-२२ मे नंतर विदर्भात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, २२ मेपासून तापमानात घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
-
भांडुपच्या काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर गुन्हा दाखल
मुंबईतील भांडुप प्रभाग क्रमांक ११० च्या काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर (काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी), त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि चालकावर भांडुप पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पतीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेचे अपहरण करणे, तिला बेदम मारहाण करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या कोपरकर कुटुंबावर करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संपूर्ण कुटुंबाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, भांडुप पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
-
-
कोकण रेल्वेमार्गावर धावणार 10 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने पनवेल ते सावंतवाडी रोड आणि मडगाव दरम्यान १० अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सावंतवाडी रोडसाठी आठ आणि मडगावसाठी दोन फेऱ्यांचा समावेश आहे. या अंतर्गत गाडी क्रमांक ०१००७ पनवेल-सावंतवाडी विशेष गाडी ६ जूनपर्यंत दर शनिवारी सायंकाळी ६.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता पोहोचेल, तर परतीची गाडी क्रमांक ०१००८ सावंतवाडी येथून दर शनिवारी सकाळी ७.२० वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता पनवेलला पोहोचेल.
-
पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही भेट झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही भेट नेमकी कशासाठी याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
-
नागपुरात तीव्र उष्णतेमुळे दुपारी कोचिंग क्लासेसवर बंदी; कामगारांना विश्रांतीचे आदेश
नागपूर जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी ११ ते सायंकाळी ४:३० या वेळेत कोचिंग क्लासेस घेण्यावर पूर्ण बंदी घातली असून, वर्ग केवळ सकाळी किंवा संध्याकाळी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, बांधकाम व कारखान्यातील कामगारांना दुपारी ११ ते ४ या वेळेत उघड्यावर काम करण्यास मनाई करून विश्रांती देण्याचे निर्देश दिले आहेत. महाविद्यालयांना दुपारच्या सत्रात परीक्षा टाळण्यास सांगण्यात आले असून, रुग्णालयांना ‘हीट ॲक्शन प्लान’ अंतर्गत सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-
-
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचा वाद आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हाचा (लोगो) वाद आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी पोहोचणार आहे. या बोधचिन्हात केवळ शैव पंथाची प्रतीके असून वैष्णव पंथाची चिन्हे वगळण्यात आल्यामुळे वैष्णवपंथी साधुसंत आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बोधचिन्हामध्ये प्रभू श्रीरामाचे प्रतीक असलेले धनुष्यबाण आणि वैष्णवांच्या इतर पवित्र प्रतीकांना समान स्थान मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे. हा वाद अधिक चिघळण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी भावना वैष्णव पंथियांकडून व्यक्त केली जात असून ते आता थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घालणार आहेत.
-
NEET पेपर फुटीप्रकरणी मोठी कारवाई; नाशिकमधून अटक केलेल्या शुभम खैरनारचे बँक पासबुक आणि डिजिटल पुरावे जप्त
देशभर गाजलेल्या ‘नीट’ (NEET) पेपर फुटीप्रकरणी नाशिकमधून अटक करण्यात आलेला संशयित शुभम खैरनार याच्याविरुद्ध सीबीआयने (CBI) तपासाचा फास आवळला आहे. सीबीआयने शुभमचा मोबाईल, लॅपटॉप तसेच त्याच्या नांदगाव येथील घर आणि फ्लॅटमधून बँक पासबुक, व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आणि काही महत्त्वपूर्ण डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. ही प्रश्नपत्रिका मोठ्या रकमेला विकली गेल्याच्या संशयावरून सीबीआयकडून आता बँक खात्यांचे व्यवहार तपासले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ प्रश्नपत्रिका फुटीपुरता मर्यादित न राहता, आर्थिक गैरव्यवहार, पैशांची देवाणघेवाण आणि इतर आरोपींशी असलेले लागेबांधे या दिशेने अधिक तीव्र होणार असून लवकरच आर्थिक व्यवहारांचे मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.
-
-
कसारा-इगतपुरी दरम्यान विशेष रेल्वे ब्लॉक; लोकल सेवा बंद राहणार असल्याने प्रवाशांचे हाल
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत कसारा-इगतपुरी दरम्यान ओव्हरहेड इक्विपमेंटच्या (OHE) पायाभूत कामांसाठी १७ ते २२ मे दरम्यान दररोज दुपारी ३.५० ते सायंकाळी ५.५० या वेळेत दोन तासांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ६ दिवसांच्या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते कसारा लोकल सेवा पूर्णपणे उपलब्ध नसेल, ज्यामुळे आसनगाव ते कसारा दरम्यानचा प्रवास कमालीचा खडतर होणार आहे. लोकल बंद राहिल्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजून पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागणार असल्याने त्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.
-
गोंदियात मध्यरात्री अवकाळी पावसाचा तडाखा; वादळी वाऱ्यामुळे पिकाला मोठा फटका
गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्री अचानक हवामानात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील धान कापणी करत असलेल्या शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली असून, शेतात कापून ठेवलेले धान भिजल्याने उत्पादनाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. धानासोबतच मका पिकालाही या पावसाचा फटका बसण्याची शक्यता असून, वादळी वाऱ्यामुळे आंबा गळती वाढून आंबा उत्पादक शेतकरीही संकटात सापडला आहे.
-
मोसमी पाऊस अंदमानात दाखल; केरळमध्येही लवकरच आगमनाची शक्यता
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेपूर्वी दाखल होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी मान्सूनने आग्नेय अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, नैऋत्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागरासह संपूर्ण अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर मजल मारली असून विजयपुरम येथेही त्याचे आगमन झाले आहे. मान्सूनची ही प्रगती पाहता लवकरच देशाच्या मुख्य भूभागावर पावसाची दमदार हजेरी लागण्याचे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्रात सध्या राजकीय, सामाजिक आणि हवामानविषयक घडामोडींमुळे वातावरण कमालीचे तापले आहे. एकीकडे देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील नांदेड आणि नाशिकपर्यंत पोहोचले आहे. सीबीआयने (CBI) नांदेडमध्ये एका संशयित कुटुंबाची तब्बल ८ तास झाडाझडती घेतली आहे. तर नाशिकमधील आरोपीच्या घरातून महत्त्वपूर्ण डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रस्तेमार्गे पुणे दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या या दौऱ्याकडे आणि त्यावरील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. तर दुसरीकडे निसर्गाचा पाराही तितकाच चढला आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात काल देशातील सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दक्षिण अंदमानात मान्सून दाखल झाला असला, तरी विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार आहे. येत्या २१-२२ तारखेनंतर मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्यास २२ मेपासून नागरिकांना या असह्य उन्हातून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासह महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, कीरिडा आणि मनोरंजनाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग…
Published On - May 17,2026 8:56 AM
