Maharashtra News LIVE : सोलापुरात मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद
देशात सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमानासह अमरावती होरपळले; विदर्भात पुढील ५ दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असली तरी २२ मेपासून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यासह महत्वाच्या बातम्यांचे अपडेट जाणून घ्या या ब्लॉगमध्ये...

महाराष्ट्रात सध्या राजकीय, सामाजिक आणि हवामानविषयक घडामोडींमुळे वातावरण कमालीचे तापले आहे. एकीकडे देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील नांदेड आणि नाशिकपर्यंत पोहोचले आहे. सीबीआयने (CBI) नांदेडमध्ये एका संशयित कुटुंबाची तब्बल ८ तास झाडाझडती घेतली आहे. तर नाशिकमधील आरोपीच्या घरातून महत्त्वपूर्ण डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रस्तेमार्गे पुणे दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या या दौऱ्याकडे आणि त्यावरील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. तर दुसरीकडे निसर्गाचा पाराही तितकाच चढला आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात काल देशातील सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दक्षिण अंदमानात मान्सून दाखल झाला असला, तरी विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार आहे. येत्या २१-२२ तारखेनंतर मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्यास २२ मेपासून नागरिकांना या असह्य उन्हातून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासह महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, कीरिडा आणि मनोरंजनाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग…
LIVE NEWS & UPDATES
-
गडकरींच्या कार्यक्रमात प्रकल्पग्रस्त व्यक्तीची घोषणाबाजी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून जलसंवाद कार्यक्रम नागपुरात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाषण देत असताना आणि जलसंवर्धनासंदर्भात वेगवेगळ्या गोष्टी सांगत असताना भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त एक व्यक्ती त्या ठिकाणी हातात फलक घेऊन घोषणाबाजी करायला लागला. तो व्यक्ती घोषणाबाजी करायला लागताच गडकरींनी तुम्ही मला येऊन भेटा असं सांगितलं, मात्र तो घोषणाबाजी करत राहिल्याने त्या ठिकाणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं व बाहेर नेऊन समज दिली.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये खोकडपुरा परिसरात इमारतीला भीषण आग
छत्रपती संभाजीनगर शहरातील खोकडपुरा परिसरातील मेडिकल असलेल्या एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीला आटोक्यात आणण्यासाठी खाजगी टँकर घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
-
-
संभाजीनगर शहरात एका इमारतीला भीषण आग
छत्रपती संभाजीनगर शहरातील खोकडपुरा परिसरातील मेडिकल असलेल्या एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीला आटोक्यात आणण्यासाठी खाजगी टँकर घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवली.
-
सोलापुरात मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद
सोलापुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. सोलापुरात आज 44 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उन्हामुळे सोलापूरकर हैराण झाले आहेत. मागील तीन दिवसांपासून सलग 43 डिग्री तापमान होते. मात्र आज तापमानाने सर्वाधिक उच्चांकी गाठत 44 डिग्रीवर पारा नेला आहे.
-
अमरावतीत ट्रॅफिक नियमांचा खुलेआम बोजवारा
अमरावतीत ट्रॅफिक नियमांचा खुलेआम बोजवारा सुरु आहे. पोलीस महासंचालकांच्या बंगल्या समोरूनच विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेले ऑटो धावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थ्यांची वाहतूक करून ऑटो चालकांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा प्रकार घडला आहे. मुख्य रस्त्यावर दररोज नियमभंग होत असतानाही ट्रॅफिक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
-
-
वर्ध्याचा पारा सलग दुसऱ्या दिवशी ४६ अंश सेल्सिअसवर
वर्ध्याचा पारा सलग दुसऱ्या दिवशी ४६ अंश सेल्सिअसवर गेला आहे. त्यामुळे तापमानातील तीव्रता कायम असून तीव्र उन्हाच्या झळांनी नागरिक बेजार झाले आहेत. त्यामुळे सर्वांना पाऊस कधी पडतो याची आस लागली आहे.
-
नागपूर : रॅपिडो चालकाला मारहाण
नागपुरात ‘रॅपिडो’ चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या दोन आरोपी अटक करण्यात आली आहे. रोहित रहागंडाले आणि समीर लांबट अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी पारडी पोलिस स्टेशन हद्दीतील उमिया धाम मंदिराजवळ रॅपिडो चालकावर हल्ला करून आरोपीने मोबाईल आणि पैसे लुटले होते.
-
देशात पेट्रोलचे दर 120 ते 30 जातील – जयंत पाटील
देशात पेट्रोलचे दर 120 ते 30 रुपये होतील, डॉलरचा दर शंभर रुपये पर्यंत जाईल, असे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी करत भाजपावर टीका केली आहे. तसेच देशात आपोआप लॉकडाऊन लागेल की काय ? अशी भीती आपल्या मनात निर्माण झाल्याचे जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे.
-
पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनासाठी पैशांची मागणी
पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैशांची मागणी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दर्शनासाठी प्रति व्यक्ती दोनशे रुपये घेत असल्याचा एक कथित ऑडिओ कॉल सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कॉलमध्ये पाच जणांसाठी तब्बल एक हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे ऐकू येत आहे. विशेष म्हणजे हे पैसे फोन पे द्वारे घेतल्याचाही उल्लेख या ऑडिओमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे विठ्ठल दर्शनाच्या कथित काळाबाजाराचा थेट पुरावा समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
-
खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी जेजुरीत राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी
अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत असणारे जेजुरीच्या श्री खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी आज जेजुरीत मोठी गर्दी केली आहे. आज रविवारची सुट्टी असल्याने भाविक हे मोठ्या प्रमाणात जेजुरी दाखल होऊन खंडेरायाचे दर्शन घेतले. श्री खंडेरायाच्या गडावर येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषाने भाविकांनी गड दुमदुमून गेला.
-
वाढत्या उष्णतेमुळे फ्लॅट मधील फ्रिजने घेतला पेट
पिंपरी चिंचवड शहरात वाढत्या उष्णतेमुळे फ्लॅट मधील फ्रिजने अचानक पेट घेतला आहे. यमुना नगर परिसरातील रूणालबाहार सोसायटी मधील एका सदनिकेत असलेल्या फ्रिजने आज सकाळी अचानक पेट घेतला होता. फ्रीज ने पेट घेतल्यानंतर फ्लॅट मध्ये मोठ्या प्रमाणात धूर तयार झाला होता या घटनेची वर्दी अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन फ्रीजला लागलेली आग आटोक्यात आणली आहे.
-
अंबरनाथचे ‘ते’ १२ नगरसेवक भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला!
अंबरनाथचे ‘ते’ १२ नगरसेवक भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला गेले आहेत. शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकरांनीही घेतली भेट. युती होताच सेना भाजपाच्या सदिच्छा भेटी
-
भाजपा प्रशिक्षण शिबीर महागड्या वातानुकुलीत हॉलमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन, खाद्यतेल वापरतांना काटकसर करावी, गरज असल्यासच इंधन वापरावे वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. मात्र पंतप्रधानांच्या या आवाहणाला भारतीय जनता पक्षानेच हरताळ फासल्याचे समोर आलंय, नांदेडमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय दोन दिवसीय महानगर प्रशिक्षण अभियान घेण्यात आले. हा प्रशिक्षण अभियान कार्यक्रम अत्यंत महागड्या वाताणुकुलीत हॉल मध्ये घेण्यात आला.
-
जळगावत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे तब्बल 66 फुटांचे कट आऊट
जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर लागले भाजपचे मंत्री तथा संकटमोचक गिरीश महाजन यांचे तब्बल 66 फुटांचे कट आऊट. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित भाजप पदाधिकारी विनोद सोनवणे यांच्या वतीने कट आऊट लावण्यात आले आहे. गिरीश महाजन यांचा 66 वा वाढदिवस असल्याने 66 फुटांचे कट आऊट लावून अनोख्या पद्धतीच्या शुभेच्छा..
-
पुण्याच्या नसरापूर प्रकरणात विशेष न्यायालयात सुनावणी होणार
पुण्याच्या नसरापूर प्रकरणात विशेष न्यायालयात सुनावणी होणार… पुणे ग्रामीण पोलिसांकडून काल आरोपपत्र दाखल… याप्रकरणात 50 हून अधिक नागरिकांचे जबाब नोंदवले… तर तांत्रिक पुरावे आरोप पत्रात जोडले…
-
अश्विनी चैनानीचा जामीन अर्ज सेशन कोर्टानं फेटाळला
नाशिकच्या TCSमधील लैंगिक शोषण आणि धार्मांतर प्रकरण… ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चैनानीचा जामीन अर्ज नाशिकच्या सेशन कोर्टानं फेटाळला… पॉश कमिटीवर असूनही तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका…, तक्रारी असूनही कारवाई न झाल्याचा पॉश कमिटीवर आरोप…
-
प्रफुल पटेलांनी शरद पवारांसमोर पार्थ पवारांबद्दल नाराजी व्यक्त केली
प्रफुल पटेलांनी शरद पवारांसमोर पार्थ पवारांबद्दल नाराजी व्यक्त केली. पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर प्रफुल पटेलांकडून पवारांसमोर नाराजी. 12 मे रोजी प्रफुल पटेल, तटकरे शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर गेले होते. tv9 मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब
-
गडचिरोली पोलिसांकडून 8 माओवाद्यांना अटक
गडचिरोली पोलिसांकडून 8 माओवाद्यांना अटक… 2020मधील फादेवाडा चकमकीतील माओवाद्यांना अटक… तेलंगणातून 4, कुमणार-मधून 2 तर नेपाळमधून 2 जणांना अटक..अत्याधुनिक रायफलसह 51 शस्त्रं जप्त
-
वडगाव मावळातील माळी नगर परिसरात एका सोसायटीच्या आवारात बिबट्याचा वावर
येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या चित्रित झाला असून येथील सोसायटी च्या पार्किंग मध्ये बिबट्याचा मुक्त संचार दिसून आलाय,काल मध्यरात्री हा बिबट्या सोसायटीच्या आवारात शिरताच कुत्रे भुंकू लागले तेव्हा सीसीटीव्ही तपासले असता बिबट्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलाय. त्यामुळे स्थानिक रहिवासी यांच्यात भीतीचं सावट दिसून आले.तरी वडगांव वन परिक्षेत्र वन अधिकारी यांनी या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे
-
आठ दिवसापासून कचरा डेपोला आग, प्रशासन ढिम्म
आठ दिवसापासून कचरा डेपोला आग लागली आहे. पडेगावातील कचरा डेपोला सातत्याने त्या भागातील नागरिकांच्या विरोध आहे. या कचऱ्याला आग लावण्याचा प्रकार झालाय मागच्या आठवड्यापासून आग सुरू आहे. महानगरपालिकेला सांगितल्यानंतरही आग योजना जात नाही, पर्यावरणाचा प्रश्न लोकांना श्वास घेता येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पार्टीची सत्ता या महानगरपालिकेत आल्यापासून प्रशासन ढीम झालं आहे. शिवसेने आज आक्रमकपणे आंदोलन केल आहे, असे आमदार अंबादास दानवे म्हणाले.
-
उल्हासनगर मारहाण धिंड प्रकरणात दोन्ही महिला आरोपींच्या पोलीस कोठडी वाढ
उल्हासनगर धिंड प्रकरणात आरोपी ज्युली वाघरी आणि विणु वाघरी यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसाची वाढ झाली. उल्हासनगर न्यायालयाने या आधी एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र आज पुन्हा उल्हासनगर न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. महिलेची मारहाण करत केस काढून अर्धनग्न अवस्थेत धिंड काढल्याचा गंभीर आरोप असून इतर तपासासाठी पोलिसांनी दोघींची पोलिस कोठडी मागितली. सध्या या प्रकरणी आणखी ८ ते १० आरोपी फरार असून पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे
-
सोशल मीडिया वापरताना तो खूप जबाबदारीने हाताळावा लागेल- कृष्णराज महाडिक
युवा मोर्चाची ओळख ही आंदोलन म्हणून नाही तर आता आपल्याला जनतेत जाऊन मिसळायचे आहे. कोविड काळात मी पहिल्यांदा युट्युब व्हिडीओ केला त्याला लाखो व्हिव्यूज मिळाले. त्यानंतर मोठ्याप्रमाणात व्हिव्यूज मिळू लागले. त्यातून येणारे पैसे मी समाजसेवेसाठी वापरत आहे. सोशल मीडिया वापरताना तो खूप जबाबदारीने हाताळावा लागेल. यापुढे मी सर्व कामात असेल असे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक म्हणाले.
-
केंद्र सरकारने हमीभावाबद्दल घेतलेली भूमिका शेतकरी विरोधी-बच्चू कडू
केंद्र सरकारने हमीभावाबद्दल घेतलेली भूमिका शेतकरी विरोधी आहे, असा घरचा आहेर शिवसेना नेते बच्चू कडू यांनी दिला. त्यासाठी लढा उभा करावा लागेल मी शिवसेनेत सत्तेत गेलो तरी शेतकऱ्यांना विसरणारा नाही ” माँ को माका का स्थान मिलेगा और मा के समान किसान है हमारा” त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर उभा राहणार असल्याचे ते म्हणाले.
-
अतिवृष्टीतील शेतकरी कर्जमाफी मध्ये बसत नाही ही सरकारचे चुकीचे धोरण
शेतकरी कर्जमाफीचा अहवाल कॅबिनेट कडे सादर झाला आहे आता तो सहकार विभागाकडे जाईल तिथे शासन निर्णय होईल मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे शेतकऱ्याचा प्रोत्साहन निधी वाढला पाहिजे अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकरी कर्जमाफीमध्ये बसत नाही हे सरकारचे धोरण चुकीच आहे त्यांना कसं सामावून घेता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे शेतकरी कर्जबाजारी होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना झाली पाहिजे कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक टोल फ्री क्रमांक सुरू करावा सरकारने नाही केला तर आम्ही शिवसेनेच्या वतीने सुरू करू असा घरचा आहेर बच्चू कडू यांनी दिला.
-
नीट पेपर फुटी प्रकरणावरून आमदार बच्चू कडू संतापले
नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपीला फाशी द्या नाहीतर आम्ही मारू सरकार काय झोपा काढते का? आमदार बच्चू कडू यांचा संतप्त सवाल विचारला. अशी कसे पेपर फुटतात सरकार काय झोपा काढतोय का? पेपर फुटणे म्हणजे एखादा खून होण्यापेक्षा डबल खून आहे आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद होत आहे. पेपर फुटणे ही मोठी हत्या आहे या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवले पाहिजे. ज्यांनी पेपर फोडला आहे त्याला सरकारने शिक्षण नाही दिली तर आम्ही जाऊन मारणार असा इशारा त्यांनी दिला.
-
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांचं मुंबई महापौरांना पत्र
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी मुंबई महापौरांना पत्र लिहिलं आहे. खुल्या जागेतील बकऱ्यांच्या कत्तलीवर कारवाईची मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. नियम डावलून उघडल्यावर बकऱ्यांची कत्तल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वेळोवेळी निर्बंध घालूनही काही ठिकाणी नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.
-
पुण्यात देशातील पहिलं पीपीपी मॉडेलवर आधारित कर्करोग रुग्णालय उभं- फडणवीस
आज अतिशय आनंदाची बातमी आहे. पुण्याच्या पीएमसी भूमीवर देशातील पहिलं पीपीपी मॉडेलवर कर्करोग हॉस्पिटल उभं राहत आहे. सीजीएसच्या दराने रुग्णांना उपलब्ध करून दिली आहे. केंद्र सरकार राज्य सरकारने आपल्या योजनेत कॅन्सरचा विषय घेतला आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या संकल्पनेतून हॉस्पिटल उभारण्यात आलं आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा जळगावच्या सराफ बाजारातील गर्दीवर परिणाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा जळगावच्या सराफ बाजारातील गर्दीवर परिणाम दिसून येत आहे. वर्षभर सोनं-चांदी खरेदी न करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जळगावकरांकडून प्रतिसाद मिळतोय. केवळ लग्नासाठी आणि अत्यावश्यक तेवढंच सोनं चांदी खरेदी करण्यासाठी नागरिक सराफ बाजाराच्या दुकानांमध्ये येत असल्याचं चित्र पहायला मिळतंय. आज रविवार सुट्टीचा दिवस असताना देखील जळगावच्या सराफ बाजारातील दुकानांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. नव्या दागिन्यांची खरेदी न करता जुनी दागिने मोड करून नवीन दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
-
गडचिरोलीतील हिरापूर गावात जनगणनेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांचा गावकऱ्यांकडून विरोध
गडचिरोलीतील हिरापूर गावात जनगणनेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांचा विरोध करत आम्हाला जनगणना नको अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. विमानतळासाठी हिरापूर आणि त्या आजूबाजूची जमीन पूर्णत: अधिग्रहण करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्यामुळे गावकऱ्यांनी जनगणनेचा विरोध केला आहे. गावात आता लोकच नसताना जनगणना कशासाठी असा सवाल अधिकाऱ्यांसमोर गावकऱ्यांनी उपस्थित केला.
-
नागपूर जिल्ह्यातील उमरेड रोडवर कार चालकाचं नियंत्रण सुटून अपघात
नागपूर जिल्ह्यातील उमरेड रोडवर कार चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झाला. उमरेडवरून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. कारने डिव्हायडरच्या पलीकडे जाऊन नागपूरवरून चिमूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचं भीषण नुकसान झालं असून चालक दुखापतग्रस्त झाला आहे.
-
जालन्यातील भोकरदनमध्ये दुचाकीस्वारीने चक्क दुचाकीला LPG गॅस कनेक्शन जोडल्याचा प्रकार समोर
जालन्यातील भोकरदनमध्ये दुचाकीस्वारीने चक्क दुचाकीला LPG गॅस कनेक्शन जोडल्याचा प्रकार समोर आला. पेट्रोल डिझेलचा तुटवडा पाहता आणि किमती वाढल्याने देशी जुगाड केल्याचं उघड झालं. दुचाकीच्या डिक्कीमध्ये 3 किलोचे एलपीजी गॅस कनेक्शन आढळून आलं. भोकरदन शहरात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना ही दुचाकी आढळली ,भोकरदन पोलिसांकडून दुचाकी जप्त करण्यात आली.
-
कोल्हार / अहिल्यानगर – प्रवरा नदीत बुडून 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
कोल्हार / अहिल्यानगर – प्रवरा नदीत बुडून 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबियांसमोरच चिमुकल्याचा नदीपात्रात बुडून मृत्यू, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. प्रवरा नदीवरील बंधाऱ्याजवळ दुर्घटना घडली . आई वडिलांसोबत नदीवर गेलेला 14 वर्षीय मुलगा नदीपात्रात बुडाला. राहाता , शिर्डी आणि श्रीरामपुर नगरपालिकेच्या आपत्कालिन विभागाला 19 तासानंतर मृतदेह मिळाला .
-
इंधन दरवाढीविरोधात पुण्यात मनसेचं आंदोलन
इंधन दरवाढीविरोधात पुण्यात मनसेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.
-
चांदीच्या आयातीवरील निर्बंधाचा जळगावच्या सराफ बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
चांदीच्या आयातीवर लावण्यात आलेल्या निर्बंधाचा देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारावर मोठा परिणाम असल्याचे सराफ व्यावसायिकांनी म्हटलं आहे. जळगावच्या सराफ बाजारामध्ये 50% पेक्षा जास्त शुद्ध चांदी ही आयात केली जाते.
आयातीवर निर्बंध लावण्यात आल्याने परिणामी चांदीची आयात कमी होईल, चांदीचा बाजारात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता सराफ व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. आयात ठप्प झाल्याने परिणामी चांदीचा तुटवडा निर्माण होईल आणि चांदीचे दराचा भडका होण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे
सराफ दुकानांबरोबरच अनेक उद्योगांमध्ये चांदीचा उपयोग होतो, मात्र निर्बंधांमुळे व्यवसायावर उद्योगांवर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
-
सोलापुरात युवक काँग्रेसकडून भाजप कार्यालयावर मोर्चा
सोलापुरात युवक काँग्रेसकडून भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष युवराज मोरे यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला. नीट पेपर फुटी, इंधन दरवाढ आणि प्रणिती शिंदेंविरोधात वादग्रस्त विधान विरोधात मोर्चा काढण्यात आला होता.
-
मध्यरात्री कोयते-दांडक्यांसह गुंडांचा हैदोस , कोयता गँगची पोलिसांनी काढली दिंड
नाशिक – सिडकोतील शुभम पार्कमध्ये मध्यरात्री कोयते-दांडक्यांसह गुंडांचा हैदोस , कोयता गँगची पोलिसांनी दिंड काढली. रस्त्यावर उभ्या चार वाहनांची तोडफोड, जाब विचारणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. रेणुका माता गार्डन परिसरात दहशत माजवत टोळक्यानी उच्छाद मांडलेला. अंबड पोलिसांची काही तासांतच धडाकेबाज कारवाई केली. मुख्य तीन संशयित साहिल हिरे, सोमनाथ सोनवणे आणि दत्ता सोनवणे यांना अटक केली. मध्यरात्रीच्या हल्ल्याने सिडको परिसर हादरला तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
-
नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर; तापमान ४३° C वर पोहोचले
नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर; तापमान ४३° C वर पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमान ४१° C आसपास स्थिर होते. उष्णतेमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. उष्माघाताच्या रुग्णांसाठी उष्णता नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दक्षिण आणि मध्य भारतातून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उकाडा वाढला आहे. महावितरणच्या वीजपुरवठ्याच्या खंडित कारभारामुळे नागरिक अडचणीत आले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे.
-
नाशिकच्या ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंप ड्राय…
मालेगाव ते नामपूर, मालेगाव ते सटाणा, मालेगाव ते देवळा, देवळा ते कळवण रोडवरील अनेक पंपसाठ्या अभावी बंद स्थितीत आहेत. मालेगाव, सटाणा, नामपूर, देवळा, कळवण शहरातीलच पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल उपलब्ध आहे. पेट्रोल डिझेल तुडवड्याचा शेतीमशकतीच्या कामांवर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांच्या शेती मशागतीचे कामे रखडले आहे. इंधन टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा फेल झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे,
-
दोन महिन्यात राज्यातील 35 भोंदू गजाआड
दोन महिन्यात राज्यातील 35 भोंदू गजाआड झाले आहे. आज भोंदू अशोक खरात प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर भोंदूगिरीचे अनेक प्रकार उघडकीस आले. भोंदूगिरी करणाऱ्यांवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. राज्यभरातील भोंदू पोलिसांच्या रडावर आहेत.
-
गोंदियात अवकाळी पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान…
गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली… या अवकाळी पावसाचा मोठा फटका जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या धान पिकाला बसला आहे… जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गारपीट झाल्याने शेतातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे… काही ठिकाणी कापणीसाठी आलेले धान पावसामुळे आडवे पडले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे… अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे… दरम्यान कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू करण्यात आली आहे…
-
नाशिकच्या TCS प्रकरणातील आरोपीच्या समस्येत वाढ..
नाशिकच्या TCS प्रकरणातील पहिल्या गुन्ह्यातील दोषारोपपत्र अंतिम टप्यात असून येत्या दोन दिवसांत 900 पानाचे पहिले दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता. नऊ गुन्ह्यांपैकी उर्वरित आठ गुन्ह्यांचा देखील तपास हा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती. संशयित आरोपींच्या विरोधात पीडित्यांचे जबाब, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, डिजिटल पुरावे संकलित झाले असल्याची तपास यंत्रणेची माहिती. पहिल्या गुन्ह्यातील दोषारोपपत्र दोन दिवसात तपास यंत्रणेकडून होणार सादर. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात एका तरुणीच्या फिर्यादीवरून दानिश शेख, तोसिफ अत्तार आणि निदा खान विरोधात बलात्कारासह धार्मिक भावना दुखवल्याचा गुन्हा दाखल
-
धुळे महानगरपालिका हद्दीतील कचरा ठेकेदाराचा धक्कादायक प्रकार उघडीस..
कचरा ऐवजी भरले जात आहे माती. कचऱ्याचे वजन वाढावं यासाठी कचरा ऐवजी कर्मचाऱ्यांकडून ट्रॅक्टर मध्ये भरले जाती आहे माती. शिवतीर्था जवळ ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून ट्रॅक्टरमध्ये माती भरल्याचा प्रकार उघड. वजन वाढावं म्हणून माती उचलत असल्याचं कर्मचाऱ्या चे म्हणणे… शिवसेनेच्या वतीने ठेकेदाराला लाखो रुपये देऊन ठेका दिला असताना माती उचलत असल्याने मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप..
-
गोंदियात अवकाळी पावसाचा कहर, 20 घरांचे नुकसान
गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली… अचानक बदललेल्या हवामानामुळे अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे… जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे छत उडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत… गोंदिया जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील ग्रामपंचायत ओवारा गावांमध्ये जवळपास 20 घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे… तसेच अनेक ठिकाणी झाडे वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वीजपुरवठाही खंडित झाला…
-
छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव कचरा डेपोला भीषण आग
दाट धुरामुळे भीमनगर, पडेगाव परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास. कचऱ्यातील मिथेन वायूमुळे वारंवार आग लागत असल्याची अग्निशमन विभागाची माहिती. शिवसेना – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कचरा डेपो समोर आंदोलन सुरू.
-
नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची स्थिती निर्माण.
डिझेलची मागणी वाढल्याने पुरवठ्यावर ताण. गुजरातमधील वाहनचालक नंदुरबारमध्ये इंधन भरण्यासाठी दाखल. काही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. पेट्रोल कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याची माहिती. इंधन उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली. जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवत आहे…
-
अमरावती देशात सर्वाधिक उष्ण, पारा ४६ अंशांवर; पुढील ५ दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज
भारतीय हवामान खात्याने दक्षिण अंदमानात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली असली, तरी दुसरीकडे विदर्भात सूर्याचा प्रकोप सुरूच आहे. शनिवारी देशातील सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली असून, पुढील पाच दिवस संपूर्ण विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. सकाळपासूनच पडणाऱ्या कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, २१-२२ मे नंतर विदर्भात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, २२ मेपासून तापमानात घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
-
भांडुपच्या काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर गुन्हा दाखल
मुंबईतील भांडुप प्रभाग क्रमांक ११० च्या काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर (काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी), त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि चालकावर भांडुप पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पतीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेचे अपहरण करणे, तिला बेदम मारहाण करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या कोपरकर कुटुंबावर करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संपूर्ण कुटुंबाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, भांडुप पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
-
कोकण रेल्वेमार्गावर धावणार 10 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने पनवेल ते सावंतवाडी रोड आणि मडगाव दरम्यान १० अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सावंतवाडी रोडसाठी आठ आणि मडगावसाठी दोन फेऱ्यांचा समावेश आहे. या अंतर्गत गाडी क्रमांक ०१००७ पनवेल-सावंतवाडी विशेष गाडी ६ जूनपर्यंत दर शनिवारी सायंकाळी ६.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता पोहोचेल, तर परतीची गाडी क्रमांक ०१००८ सावंतवाडी येथून दर शनिवारी सकाळी ७.२० वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता पनवेलला पोहोचेल.
-
पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही भेट झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही भेट नेमकी कशासाठी याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
-
नागपुरात तीव्र उष्णतेमुळे दुपारी कोचिंग क्लासेसवर बंदी; कामगारांना विश्रांतीचे आदेश
नागपूर जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी ११ ते सायंकाळी ४:३० या वेळेत कोचिंग क्लासेस घेण्यावर पूर्ण बंदी घातली असून, वर्ग केवळ सकाळी किंवा संध्याकाळी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, बांधकाम व कारखान्यातील कामगारांना दुपारी ११ ते ४ या वेळेत उघड्यावर काम करण्यास मनाई करून विश्रांती देण्याचे निर्देश दिले आहेत. महाविद्यालयांना दुपारच्या सत्रात परीक्षा टाळण्यास सांगण्यात आले असून, रुग्णालयांना ‘हीट ॲक्शन प्लान’ अंतर्गत सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचा वाद आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हाचा (लोगो) वाद आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी पोहोचणार आहे. या बोधचिन्हात केवळ शैव पंथाची प्रतीके असून वैष्णव पंथाची चिन्हे वगळण्यात आल्यामुळे वैष्णवपंथी साधुसंत आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बोधचिन्हामध्ये प्रभू श्रीरामाचे प्रतीक असलेले धनुष्यबाण आणि वैष्णवांच्या इतर पवित्र प्रतीकांना समान स्थान मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे. हा वाद अधिक चिघळण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी भावना वैष्णव पंथियांकडून व्यक्त केली जात असून ते आता थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घालणार आहेत.
-
NEET पेपर फुटीप्रकरणी मोठी कारवाई; नाशिकमधून अटक केलेल्या शुभम खैरनारचे बँक पासबुक आणि डिजिटल पुरावे जप्त
देशभर गाजलेल्या ‘नीट’ (NEET) पेपर फुटीप्रकरणी नाशिकमधून अटक करण्यात आलेला संशयित शुभम खैरनार याच्याविरुद्ध सीबीआयने (CBI) तपासाचा फास आवळला आहे. सीबीआयने शुभमचा मोबाईल, लॅपटॉप तसेच त्याच्या नांदगाव येथील घर आणि फ्लॅटमधून बँक पासबुक, व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आणि काही महत्त्वपूर्ण डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. ही प्रश्नपत्रिका मोठ्या रकमेला विकली गेल्याच्या संशयावरून सीबीआयकडून आता बँक खात्यांचे व्यवहार तपासले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ प्रश्नपत्रिका फुटीपुरता मर्यादित न राहता, आर्थिक गैरव्यवहार, पैशांची देवाणघेवाण आणि इतर आरोपींशी असलेले लागेबांधे या दिशेने अधिक तीव्र होणार असून लवकरच आर्थिक व्यवहारांचे मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.
-
कसारा-इगतपुरी दरम्यान विशेष रेल्वे ब्लॉक; लोकल सेवा बंद राहणार असल्याने प्रवाशांचे हाल
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत कसारा-इगतपुरी दरम्यान ओव्हरहेड इक्विपमेंटच्या (OHE) पायाभूत कामांसाठी १७ ते २२ मे दरम्यान दररोज दुपारी ३.५० ते सायंकाळी ५.५० या वेळेत दोन तासांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ६ दिवसांच्या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते कसारा लोकल सेवा पूर्णपणे उपलब्ध नसेल, ज्यामुळे आसनगाव ते कसारा दरम्यानचा प्रवास कमालीचा खडतर होणार आहे. लोकल बंद राहिल्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजून पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागणार असल्याने त्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.
-
गोंदियात मध्यरात्री अवकाळी पावसाचा तडाखा; वादळी वाऱ्यामुळे पिकाला मोठा फटका
गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्री अचानक हवामानात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील धान कापणी करत असलेल्या शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली असून, शेतात कापून ठेवलेले धान भिजल्याने उत्पादनाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. धानासोबतच मका पिकालाही या पावसाचा फटका बसण्याची शक्यता असून, वादळी वाऱ्यामुळे आंबा गळती वाढून आंबा उत्पादक शेतकरीही संकटात सापडला आहे.
-
मोसमी पाऊस अंदमानात दाखल; केरळमध्येही लवकरच आगमनाची शक्यता
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेपूर्वी दाखल होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी मान्सूनने आग्नेय अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, नैऋत्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागरासह संपूर्ण अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर मजल मारली असून विजयपुरम येथेही त्याचे आगमन झाले आहे. मान्सूनची ही प्रगती पाहता लवकरच देशाच्या मुख्य भूभागावर पावसाची दमदार हजेरी लागण्याचे संकेत मिळत आहेत.
Published On - May 17,2026 8:56 AM
