Maharashtra Breaking News LIVE 20th June 2025 : मीरा भाईंदरमधील काशिमिरा परिसरात अनधिकृत बोर्डिंग लॉजवर हातोडा
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 20 जून 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

परंडा तालुक्यातील सीना कोळगाव नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटीवर परंडा महसूल विभागाची कारवाई. परंडा तालुक्यातील सीना कोळगाव धरणात सुरू असलेल्या अवैध वाळू उपश्यावर परंडा तहसीलदार निलेश काकडे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने डोमगाव परिसरात वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटी उध्वस्त केल्या आहेत. यात दोन मोठ्या तर एक लहान बोटीचा समावेश आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी पाण्यात बुडविल्या तर एक बोट पेटवून नष्ट करण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान काल रात्री आळंदी येथून झाले यानंतर महाराजाची पालखी त्यांच्या आजोळी गांधी वाड्यात मुक्कामी होती. आज पालखीचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू होत असून सकाळचा विसावा हा भोसरी फाटा या ठिकाणी होऊन दुपारचा विसावा फुलेनगर या ठिकाणी होणार असून पालखी पुण्यातील भवानी पेठ येथे मुक्कामी असणार आहे
LIVE NEWS & UPDATES
-
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन
पालखीवर पुषवृष्टी करत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत
माऊली माऊलीचा वारकऱ्यांकडून जयघोष
संगमवाडी पुलाच्या खाली पालखीचे स्वागत
-
योगा डे निमित्त विशाखापट्टणममध्ये उद्या वर्ल्ड रेकॉर्ड
योगा डे निमित्त विशाखापट्टणममध्ये उद्या वर्ल्ड रेकॉर्ड
वर्ल्ड रेकॉर्डची आजच तयारी
25 हजार विद्यार्थी 108 मिनिटे करणार योगा
सर्व पंचवीस हजार विद्यार्थी हे आदिवासी
आंध्र प्रदेश विद्यापीठाच्या पटांगणावर होणार वर्ल्ड रेकॉर्ड
-
-
कल्याण- पुणे लिंक रोडवर दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू
कल्याण पुणे लिंक रोड वर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. विजय नगर परिसरात डंपरला ओव्हरटेक करताना दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सिलिंडरच्या गाडीला धडक दिली, त्यानंतर डंपरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
-
मीरा भाईंदरमधील काशिमिरा परिसरात अनधिकृत बोर्डिंग लॉजवर हातोडा
मीरा भाईंदरमधील काशिमिरा परिसरात अनधिकृत बोर्डिंग लॉजवर महापालिकेने तोडक कारवाई केली आहे. काशिमिरा परिसरात आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बोर्डिंग आणि लॉजिग वर तोडक कारवाई केली. महामहापालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.
“परवानगीशिवाय अशा प्रकारच्या सुविधा सुरू करणं केवळ बेकायदेशीरच नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे अशा व्यवसायांवर कठोर पावलं उचलण्यात येत आहेत”, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
-
शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांचा एकही स्वतःचा कारखाना नाही : युगेंद्र पवार
“महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सहकार चळवळीत शरद पवार यांचं सर्वात जास्त योगदान आहे. शरद पवार साहेब महाराष्ट्रातील सर्व कारखाण्यासाठी काम करत आलेत. शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांचा एकही स्वतःचा कारखाना नाही”, असं राष्ट्रवादी काका गटाचे नेते युगेंद्र पवार म्हणाले आहेत.
-
-
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल झाली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी सीओपी महाविद्यालयसमोरच्या चौकात दाखल झालीय. पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून पालखीचं स्वागत करण्यात आलं आहे. पालखीच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी पुणेकरांची मोठी गर्दी केली आहे.
-
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जम्मू-काश्मीरमधील उधमपूरला रवाना
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरला रवाना झाले आहेत. जिथे ते उद्या सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभात सहभागी होतील. तसेच, ते उधमपूर कॅन्टमध्ये सशस्त्र दलाच्या जवानांना भेटतील.
-
कैलास मानसरोवर यात्रेसाठी यात्रेकरूंचा पहिला गट रवाना
सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांनी नाथू ला येथे कैलास मानसरोवर यात्रा 2025 साठी यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला.
-
कोकण किनाऱ्यावर उंच लाटांचा इशारा, पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होताच, राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) कोकण किनाऱ्यावर उंच लाटा उसळण्याचा इशारा दिला आहे. याअंतर्गत, मच्छीमार आणि लहान बोटींना पुढील काही दिवस समुद्रात जाऊ नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे घाट परिसरात केंद्राने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
-
पुणे जिल्ह्यात पादचारी तरुणाचा अपघातात मृत्यू; चारचाकी गाडी चालक फरार
शिरूर तालुक्यातील गोलेगाव रस्त्यावरून पायी चालणाऱ्या तरुणाला समोरून येणाऱ्या चारचाकीने कारणे जोरदार धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. धनुष राम केवट असे २२ वर्षीय मृत तरुणाचे नाव असून हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.
-
मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
मुंबई गोवा महामार्गावर सध्या मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत. दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे सध्या मुंबई गोवा महामार्गावरती खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून याच खड्ड्यातून चाकरमान्यांना मार्गक्रमण करावे लागत आहे. मार्ग शोधताना चालकाची चांगलीच दमछाक होत आहे व त्यास तारेवरची कसरत करत मार्ग शोधावा लागत आहेत रात्रीच्या अंधारात तर हे खड्डे अजिबातच चालकाला दिसत नाहीयेत.
-
मनसेच्या मॅरेथॉन बैठका सुरू
केंद्रीय समितीच्या बैठकीनंतर आता विभाग अध्यक्षांची बैठक मनसेच्या राजगड या पक्ष कार्यालयात सुरु आहे. संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली ही विभाग अध्यक्षांची बैठक सुरु आहे. हिंदी भाषा सक्ती विरोधात मनसेच्या आंदोलनाची पुढची दिशा असेल तरी काय? हे बैठकीत ठरणार. या बैठकीला अमित ठाकरे ही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
-
कल्याण-लोकलमध्ये महिलांमध्ये हाणामारी; व्हिडीओ व्हायरल
कल्याण-लोकलमध्ये महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. चालू लोकलमध्ये महिलांची ही हाणामारी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. लोकलच्या गर्दीत अशा प्रकारे हाणामारी होण्याची आणि व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलच वेळ नाही. शुल्लक कराणांवरून लोकलमध्ये महिलांमध्ये हाणामारी झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण केलेल्या दुकानांवर पालिकेचा हातोडा
छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण केलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. 10 ते 12 जेसीबीच्या मदतीने ही दुकाने पाडण्याचं काम सुरु आहे. 50 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमण केलेल्या दुकानांवर पालिकेने अखेर हातोडा मारला आहे.
-
बारामतीमधील कार्यक्रमाला अजित पवारांची अनुपस्थिती; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अजित पवारांची मात्र अनुपस्थिती होती. याबद्दल सुप्रिया सुळेंना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “दादा या कार्यक्रमाला न येण्यामागचं कारण मला माहित नाही. आणि सर्वच गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलायच्या नसतात.” असं त्यांनी म्हटलं आहे.
-
पुण्यात वैष्णवांची मांदियाळी
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार आहे. पुणेकरांकडून स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिर येथे तर संत तुकाराम महाराज पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर येथे मुक्कामी असणार आहे.
-
आषाढी वारीसाठी भीमा नदीत पाणी सोडणार
आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी उजनी धरणातून 1600 क्युसेक्सने उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे. आज दुपारी ३ वाजल्यानंतर भिमा नदीत(चंद्रभागेत) उजनीतून पाण्याचा विसर्ग सोडला जाणार आहे. आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी आलेले वारकरी चंद्रभागा नदीत स्नान करुनच वारी पूर्ण करतात.
-
विराज आणि सत्यजित देशमुख यांचा प्रवेश
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलासह पुतण्याचा सांगलीच्या रेठरे धरण येथील सैनिकी शाळेमध्ये आज प्रवेश पार पडला, मोठ्या जल्लोषांमध्ये संतोष देशमुख यांचा मुलगा विराज आणि पुतण्या सत्यजित देशमुख सह देशमुख कुटुंबाचे स्वागत करण्यात आले. यावेळी संतोष देशमुख यांच्या पत्नी मुलगी भाऊ आणि बहिणीचा इतर कुटुंब देखील उपस्थित होते. फुलांचा वर्षाव करत आणि झांज पथकांच्या निनादात आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहे.
-
एकनाथ शिंदे यांच्यावर विनायक राऊतांची टीका
एकनाथ शिंदे आधी उध्दव ठाकरे काय बोलतात ते ऐकून नंतर भाषण करतात. त्यांच्याकडे स्वतःचे विचार नाहीत. दूरदृष्टी नाही. केवळ उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करणे हा शिंदेंचा एकमेव फंडा असल्याचे विनायक राऊत म्हणाले.
-
आता खड्डे बुजवा
पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी युद्धपातळीवरती रस्त्याची काम झाली असल्याचा दावा ठाणे महानगरपालिकेने केला असताना मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्याच्या आणि मुंबईच्या वेशीवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याचे चित्र दिसत आहे… त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.. खड्डे वेळीच बुजवले गेले नाही तर खड्ड्यात उतरून आंदोलन करण्याचा इशारा ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे.
-
खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग कमी
खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. रात्री विसर्ग १५ हजारावर होता तो आता ७ हजार ८९८ कमी केला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग कमी केला आहे.
-
रायगडमध्ये धुसफूस चव्हाट्यावर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रायगड जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादी बरोबर जाऊ नये , रायगड जिल्हा आढावा बैठकीत शिवसेनेच्या नेते आणि पदाधिकार्यांनी सूर आळवला. रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपाने युती करावी मात्र राष्ट्रवादीला बरोबर घेऊ नये. राष्ट्रवादीला सोबत घेतल्यास कार्यकर्ते काम करणार नाही अशा पद्धतीच्या भावना काल कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केल्या आहेत.
-
मराठी माणसा जागा हो हिंदी सक्ती विरोधाचा धागा हो ..!! पुण्यात झळकले हिंदी सक्ती विरोधाचे फलक
मराठी माणसा जागा हो हिंदी सक्ती विरोधाचा धागा हो ..!! पुण्यात हिंदी सक्ती विरोधाचे फलक झळकले
तामिळनाडू मध्ये नाही कर्नाटक मध्ये नाही केरळ मध्ये इतकेच काय गुजरात मध्ये ही नाही पहिली पासून तिसरी भाषा हिंदी शिकवण्याचा पर्याय मग महाराष्ट्रातच का ??
राज्य सरकारचा हा निर्णय मराठी भाषाला मारक आहे , मराठी माणसाने विकसित केलेल्या महाराष्ट्राचा फायदा उठवण्यासाठी परप्रांतीयांच्या ताब्यात महाराष्ट्र देण्यासाठी हिंदीकरण केले जात आहे या विरोधात मनसेनी आवाज उठविला आहे यांस मराठी माणसांनी ही साद देत हिंदी सक्ती विरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे .महाराष्ट्राचे मराठीपण आपण जपले पाहिजे .
याकरीता जनजागृती होण्यासाठी मनसेने पुणे शहरात अशा प्रकारचे फलक शनिपार , स प महाविद्यालय , टिळक रोड आणि विविध ठिकाणी लावले आहेत .
-
रायगड जिल्ह्यात शिवसेना- भाजपाने युती करावी, मात्र राष्ट्रवादीला बरोबर घेऊ नये – शिवसेना नेत्यांचा सूर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रायगड जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादी बरोबर जाऊ नये , रायगड जिल्हा आढावा बैठकीत शिवसेनेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांचा सूर आहे.
रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपाने युती करावी मात्र राष्ट्रवादीला बरोबर घेऊ नये. राष्ट्रवादीला सोबत घेतल्यास कार्यकर्ते काम करणार नाही अशा पद्धतीच्या भावना काल कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केल्या.
काल कर्जत येथे रायगड जिल्हा शिवसेनेची आढाव बैठक पार पडली. त्यावेळी या भावना व्यक्त करण्यात आल्या.
-
कराड – दक्षता म्हणून कोयना धरण पायथा वीजघरातून पाण्याचा विसर्ग सुरू
दक्षता म्हणून कोयना धरण पायथा वीजघरातून 1050 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून आठवडाभरात धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
कोयना धरणाच्या पायथा वीस गृहाचे एक युनिट सुरू. कोयना धरणात 32.51 टीएमसी पाणीसाठा आहे. दरम्यान कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
-
परळी ते बीड टोकवाडी गावकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको
परळी ते बीड राष्ट्रीय महामार्गावर टोकवाडी गावकऱ्यांच्या वतीने टोकवाडी गावामध्ये गतिरोधक बसवावेत या मागणीसाठी गेल्या एक तासापासून रस्ता रोको करण्यात येत आहे… यामध्ये गावकरी मोठ्या संख्येने तसेच महिला सहभागी झाले आहेत… वाहनांच्या लांबच लांब रांगा रांग लागल्या आहे.. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हा रस्ता रोको असा सुरू राहणार
-
सोमेश्वर धबधबा प्रवाहित
नाशिकमध्ये झालेल्या पावसानंतर धबधबा सुरू… फोटो आणि सेल्फीसाठी तरुणांची गर्दी… मात्र सुरक्षा रक्षक किंवा महापालिका कर्मचारी नसल्याने नाशिककरांचा जीव धोक्यात… तर काही तरुणांचे धबधबा परिसरात मद्यपान..
-
पुणेकरांना दिलासा, 10 वाजता खडकवासला धरणातून विसर्ग होणार कमी…
खडकवासला धरणातून काल रात्री 11 वाजलेपासून 15 हजार क्यूसेक्स विसर्ग सुरु करण्यात आला होता. आता 10 वाजेपासून कमी करण्यात येणार असून, 12 हजार क्यूसेक्स केला जाणार आहे.
-
मुंबई नाशिक महामार्गावर कारला अपघात
भरधाव कारचालकाला पहाटेच्या वेळेस वळणाचा अंदाज न आल्याने कार पाण्याने भरलेल्या खड्यात गेली… बोरटेंभा फाटा येथे उड्डाणपुलाचे काम चालू असलेल्या खड्ड्यात कार पडली. अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. रूट पेट्रोलिंग टीमने अपघातग्रस्तांना बाहेर काढून घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलं आहे.
-
बडगुजर यांच्या भाजप प्रवेशानंतर नाशिकमध्ये वातावरण तापले, मनसेची टीका
सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशानंतर नाशिकमध्ये मनसेने पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीसाठी सत्ताधारी पक्ष भाजप जबाबदार असल्याचा आरोप मनसेने केला. मनसेचे नेते दिनकर पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले की, “भाजपला भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करायचा होता, मात्र ते आता गुन्हेगारांनाच आपल्या पक्षात प्रवेश देत आहेत.” कोणत्या पक्षात ‘अट्टल गुन्हेगार’ आहेत, हे जनतेनेच शोधले पाहिजे, असे आवाहनही पाटील यांनी केले. बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून नाशिकमधील राजकारण चांगलेच तापले आहे.
-
देवेंद्र फडणवीस-एकनाथ खडसे एकाच मंचावर, भाजप जाण्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया
जळगावात देवेंद्र फडणवीस यांच्या विविध कार्यक्रमांच्या दौऱ्यादरम्यान एकनाथ खडसे हजेरी लावणार आहेत. त्यामुळे त्यांची उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. फडणवीस आणि खडसे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. “माझा भाजप पक्षप्रवेशाचा विषय हा केव्हाच संपला आहे. मी त्याला पूर्णविराम दिला आहे,” असे खडसे म्हणाले.
-
ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासंदर्भात एक चांगली बातमी
ठाणे जिल्ह्यातील तहान भागविणारे बदलापूर जवळील बारवी धरण 43 टक्के भरले, पाणीटंचाई होणार दूर. बारवी धरणात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दुप्पट पाणीसाठा झाला आहे. गेल्या काही दिवसापासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. आतापर्यंत बारवी धरणात 789 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 25 टक्के धरण भरले होते ,आता 43 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. या धरणातून औद्योगिक क्षेत्रात ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, अंबरनाथ,बदलापूर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो.
-
वसई भुईगाव समुद्र किनाऱ्यावर सुरुच्या झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड
काल झालेला जोरदार पाऊस आणि समुद्रातील भरतीमुळे भुईगाव समुद्र किनाऱ्यावर सुरुच्या झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. भुईगाव समुद्र किनाऱ्यावर शेकडो झाडं उन्मळून पडली आहेत. वसईमधील समुद्रकिनारी संरक्षक धूप प्रतिबंधक बंधारा बनवण्याबाबत शासन निर्णय व निधी मंजूर आहे. पण घुपप्रतिबंधक बंदारा बांधला नसल्याने आखा किनारा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
-
Maharashtra News : गोदाघाट परिसरात पुन्हा अलर्ट
नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाणी ओसरले. दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी. पावसाची नाशिकमध्ये मध्यरात्री पासून विश्रांती. आज सकाळी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार. पाण्याचा विसर्ग होणार असल्याने गोदाघाट परिसरात पुन्हा अलर्ट. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला आज देखील येलो अलर्ट.
-
Maharashtra News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी घेतला एक ऐतिहासिक निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याजदरात उद्योग कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ व पर्यटन संचलनालय यांच्या व्याज परतावा योजनांची सांगड मुंबई बँकेशी घालण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील लाखो महिलांना उद्योग व्यवसायाचे नवीन दालन खुले झाले असून त्यांचे अर्थव्यवस्थेतील योगदान वाढणार आहे. या बैठकीस आमदार चित्रा वाघ, विद्याधर अनास्कर, नरेंद्र पाटील व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Published On - Jun 20,2025 8:24 AM





