मुंबई : राज्यात सध्या जवळपास बहुतेक भागात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. मात्र येत्या काही दिवसात राज्यातील नागरिकांना या उष्णतेपासून मोठा दिलासा मिळणार आहे. कारण भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 5 मे पासून मान्सून केरळमध्ये त्याची दमदार हजेरी लावेल. तर तो येत्या 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या सर्वांचे लक्ष पावसाकडे लागले असून पाऊस कधी आणि किती पडणार यावर शेतकऱ्यांची अनेक गणित अवलंबून आहेत. तर गेल्या दोन दिवसांत मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागात पोहोचले आहेत. त्यासोबत मौसमी वाऱ्यांनी अंदमान निकोबार बेटांचा उर्वरित भाग आणि श्रीलंका, मालदीव, कोमोरीनचा बरासचा भाग व्यापला आहे. त्यामुळे मान्सून आज केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.