Chal Halla Bol Video : ‘नामदेव ढसाळ कोण?’, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं
दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांनी लिहिलेल्या कविता या चित्रपटासाठी वापरण्यात आल्या होत्या. मात्र या कवितांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत ‘कोण ढसाळ?’ असे म्हटले. यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सेन्सॉर बोर्डालाच झापले.
दलित पँथर आणि युवा क्रांती दल या चळवळींवर आधारित ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांनी लिहिलेल्या कविता या चित्रपटासाठी वापरण्यात आल्या होत्या. मात्र या कवितांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत ‘कोण ढसाळ?’ असे म्हटले. यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सेन्सॉर बोर्डालाच झापले. ‘नामदेव ढसाळ आपल्या महाराष्ट्रातील क्रांतीकारी नेते आहेत. दलित पँथर या चळवळीच्या माध्यमातून सामान्य माणसाचा आवाज जगाच्या समोर आणला आहे. नामदेव ढसाळ हे थोर साहित्यिक आणि मोठे कवी सुद्धा आहेत. ढसाळ यांच्या कविता सर्वसमान्यांच्या मनगटामध्ये, मनात एक ज्वाला आणि ऊर्जा निर्माण करणाऱ्या आहेत. त्याच्या कवितांचा प्रत्येक शब्द हा ठिणगी पेटवणारा आहे. हेच सेन्सॉर बोर्डाला आवडलं नसावं’, असं अंबादास दानवे म्हणाले. दरम्यान, ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट १ जुलै २०२४ रोजी मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डकडे सबमिट करण्यात आला होता. पण चित्रपटातील कवितांमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचे सेन्सॉर बोर्डने म्हटलं. चित्रपटात वापरलेल्या कविता या नामदेव ढसाळ यांनी लिहिल्याची माहिती सेन्सॉर बोर्डला देण्यात आली होती. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी, ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ असे उत्तर दिल्याची माहिती मिळत आहे.
