पुणे : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जे कमरेखालचे आरोप करतात, ते कुठेतरी चारित्र्यहीन वाटत आहेत. एका बाजूला बाळासाहेबांचे नाव घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मुलावर टीका करायची हा खोटारडेपणा आहे, अशी टीका प्रा. हरी नरके (Hari Narke) यांनी केली आहे. ते म्हणाले, की आतापर्यंत त्यांच्याकडून हे सांगितले गेले की आम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मानतो. कारण त्यांची नियुक्तीच बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. मात्र आता त्यांनी थेटपणे उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. यातून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याची नक्षलवाद्यांना सुपारी दिली होती असे सूचित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असा संशय नरके यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना झेड प्लस सिक्युरिटी दिली नव्हती, असा आरोप त्यांनी करायला सुरुवात केली आहे. पण काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिंदेंना झेड प्लस सिक्युरिटी दिली असल्याचे स्पष्ट केले आहे, असे त्यांनी सांगितले.