Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
मुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता कल्याण पूर्वेलाही बसला असून, आडीवली-ढोकळी परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सोसायट्या, चाळी आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता कल्याण पूर्वेलाही बसला असून, आडीवली-ढोकळी परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सोसायट्या, चाळी आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
परिसरातील तळमजल्यावरील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक पाणी घरात घुसल्याने रहिवाशांची मोठी तारांबळ उडाली असून, अनेकांना आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले.
दरम्यान, रस्त्यांवर गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी साचल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांनाही पाण्यातून मार्ग काढत वाहने चालवावी लागत असून, अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि जलसंकटावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असल्याने प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
