आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने आता शवासन करावं, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. सरनाईक यांच्या पत्रामुळे शिवसेनेत दोन गट असल्याची चर्चा आहे. त्याचा राऊत यांनी इन्कार केला. शिवसेनेत एकच ग्रुप आहे. तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा. शिवसेनेत कोणतीही गटबाजी नाही. कोणतेही गट नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आम्ही वाघाच्या काळजाची माणसं आहोत. शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं यात आम्ही मोडत नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहोत. आज आम्ही राजकारणात नाहीये. एक जमाना लोटलाय. पांढरे झाले. परत काळे करत आहोत. फार फार काय कराल, तुरुंगात टाकाल. आमची तयारी आहे तुरुंगात जायला. आम्ही महाभारताची उदाहरणे देतो. त्या महाभारतातील योद्धे आम्हीच आहोत, असं सांगतानाच माझं नाव संजय आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.