Dhananjay Munde : दोनदा मरता मरता वाचलो, मंत्री झालो पण आनंद… धनंजय मुंडेंनी भावनिक होत व्यक्त केली खंत
धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद गमावल्याची खंत व्यक्त करत 250 दिवस मीडिया ट्रायलला सामोरे जावे लागल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, दोनदा मरता मरता वाचलो आणि देवाने जनतेची सेवा करण्यासाठीच वाचवले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपानंतर राजीनामा द्यावा लागल्याने विजयाचा आनंदही साजरा करता आला नाही, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.
धनंजय मुंडे यांनी अलीकडेच मंत्रीपद गमावल्याबद्दल पुन्हा एकदा खंत व्यक्त केली. माझी 250 दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर मीडिया ट्रायल झाली आणि दोनदा मरता मरता वाचलो, असे त्यांनी परळीतील बोधे गावात विकास कामांच्या उद्घाटनावेळी सांगितले. सर्व आजारातून बरे होऊन जनतेची सेवा करण्यासाठी देवानेच आपल्याला वाचवल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर आणि त्यांचे खास वाल्मिक कराड यांच्यावर संशयाची सुई फिरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला होता. या घटनेमुळे विधानसभा निवडणुकीत मिळालेला मोठा विजय आणि मंत्रीपदाची शपथ घेऊनही, मिळालेल्या मंत्रीपदाचा आनंद साजरा करता आला नाही, अशी खंत मुंडेंनी बोलून दाखवली. मीडियाने केलेले हे वार्तांकन त्यांनी मीडिया ट्रायल असल्याचे म्हटले आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत देशमुख परिवार आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
