सोलापूर : मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण आता खातेवाटप कधी असा सवाल उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजूनही खात्याची जाबाबदारी कोणत्याही नवनियुक्त मंत्र्यावर सोपवलेली नाही. त्यामुळे यंदाच्या 15 ऑगस्टला बिनखात्याचेच मंत्री हे ध्वजारोहण करतील असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला पण आता कोणते खाते कुणाकडे यावरुन अनेक मतभेद असल्याने एवढ्यात तरी खातेवाटप होईल असे वाटत नसल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. काही पराक्रम आणि काही विक्रम करायचे असतात. एकनाथ शिंदे आमचे मित्र आहेत ते हाही विक्रम महाराष्ट्रात करून दाखवतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिंदे गटाकडून आता प्रति शिवसेना भवनही उभारले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी भवन उभारले खरा शिवसैनिकांचा देव हा पहिल्याच शिवसेना भवनात असणार असे म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांच्या पाठीशी उभे राहतील असेही ते म्हणाले आहेत.