Maharashtra Political News LIVE : महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला उद्या मुंबई दौऱ्यावर
Live Updates In Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

पुण्यातील सुमारे १८०० कोटी रुपये किमतीची महार वतन जमीन ३०० कोटी रुपयांमध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केल्याप्रकरणी चौकशीसाठी महसूल सचिव विकास खारगे समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सादर केला. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अभय देण्यात आलं आहे. तसंच या व्यवहारात मदत करणाऱ्या दोन सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. पुण्यातील मुंढवा भागातील मोक्याची जमीन अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने स्वस्तात खरेदी केली होती. तर दुसरीकडे वडाळा- ठाणे- कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामादरम्यान झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेऊन MMRDA ने डीबी एचआयएलएल एलबीजी या सल्लागार कंपनीची हकालपट्टी केली. तसंच तातडीने सल्लागाराचे कंत्राट रद्द करण्यासह त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात आलं. यासह राज्य, देश-विदेशातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
नवी मुंबई: उलवे सेक्टर 26 मध्ये शाळेजवळ ब्लास्टिंग; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
नवी मुंबईतील उलवे सेक्टर 26 मध्ये शाळेजवळ सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्लॉट क्रमांक 145 आणि 146 वर विकासकामासाठी खडक फोडण्याचे स्फोट होत असून मोठा आवाज, कंपने आणि धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शेजारीच शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे, त्यामुळे पालकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
-
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला उद्या मुंबई दौऱ्यावर
उद्या महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ते राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत उद्या सकाळी 11 वाजता टिळक भवन येथे बैठक घेणार आहेत. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर चेन्नीथला यांच्यासोबत ही पहिलीच बैठक असणार आहे.
-
-
अहिल्यानगर : डोंगरगण घाटातील खोल दरीत मृतदेह आढळला
अहिल्यानगरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डोंगरगण घाटातील खोल दरीत एका गोणीत बंद अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. स्थानिक नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने संशय आल्यावर परिसराची पाहणी करण्यात आली. त्यावेळी दरीत गोणी आढळून आली आणि त्यामध्ये मृतदेह असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, दोन ते तीन दिवसांपूर्वी हा मृतदेह येथे आणून टाकण्यात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
लातूर : अंगणवाडी कामगार आणि मदतनीसांचे आंदोलन
निवडणुकीत केलेल्या कामाचे मानधन मिळाले नसल्याने लातूर मध्ये अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांनी आंदोलन पुकारलेले आहे. आज लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात अंगणवाडी ताई धरणे आंदोलन करीत आहेत. वेगवेगळ्या शासकीय योजनेसाठी सरकार काम सांगते मात्र त्याचा मोबदला देत नाही. कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने अंगणवाडीतील मुलांकडे म्हणावे लक्ष देणे होत नाही. त्यामुळे आमच्या मान्य करा अशी मागणी करण्यात येत आहे.
-
अजितदादांच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी – सुनील तटकरे
अजितदादा यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. अजितदादांच्या कडील खात्याच्या फाईलवर मंजूरी घेतल्याच्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी आपण केल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
-
-
…तर गुन्हा दाखल करावा, दगडफेक नव्हे – पुणे पालिका विरोधी पक्ष नेते निलेश निकम
केंद्रात भाजपाचे सरकार, राज्यात पण त्यांचे सरकार आहे, पोलीस आपले आहेत. चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं असेल तर गुन्हा दाखल करावा. कोणाच्यातरी कार्यालयावरती जायचं, आणि त्या ठिकाणी दगडफेक करायची अत्यंत निंदनीय आणि चुकीचा प्रकार आहे. पुण्याच्या महापौराने सुद्धा या प्रकारामध्ये जाणं अपेक्षित नव्हतं. कारण त्या संपूर्ण पुण्याच्या महापौर आहेत अशी टीका राष्ट्रवादी नेते तथा महानगरपालिका विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी केली आहे.
-
भाईंदरात १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार, मनसेचा आक्रमक पवित्र्याने आरोपीला अटक
भाईंदरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याच्या घटनेनंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानंतर पोलिसांनी नराधमाला गजाआड केले आहे. भाईंदर पूर्व येथील गोडदेव परिसरातील एका स्टील कंपनीत १९ वर्षीय तरुणीवर कंपनीचा मालक असलेल्या जयनारायण सैनी याने बलात्काराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
-
हर्षवर्धन सपकाळ यांची दिलगिरी, सुलतान प्रकरणात पोस्ट करीत म्हणाले…
दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान सोबत केली होती. या वक्तव्यामुळे राज्यभरात गदारोळ निर्माण झाला. दरम्यान, आज हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक पोस्ट करीत शिवप्रेमीची दिलगिरी व्यक्त केली. फेसबुक पोस्ट करत ते म्हणाले की, “भाजपचा तीव्र शब्दात निषेध करत त्यांच्या गलिच्छ व खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो.”
-
हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली दिलगिरी
फेसबुक पोस्ट करत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल केली दिलगिरी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी टिपू सुलतान यांची शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केली होती.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. ते आज मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. ते मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या क्लायमेट परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
-
जालन्यातील वडीगोद्री येथे बँक लुटण्याचा प्रयत्न, थरार सीसीटीव्हीत कैद
जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी मागील भागाचे शटर तोडून बँकेत असलेली रक्कम पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला. मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये 5 ते 6 चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. पोलिसांनी बँकांच्या अधिकाऱ्याकडून तपासणी सुरूअसून पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे
-
सांगलीत अतिक्रमण हटाव मोहिमेला गती, नागरिकांचा विरोध
सांगली महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. शहारातील झुलेलाल चौक ते शंभर फुटी रोडवरील अतिक्रमण महापालिका प्रशासनाकडून जेसीबी लावून काढण्यात आले आहे. यावेळी नागरिकांनी अतिक्रमणाला विरोधदेखील केला. प्रशासन अधिकारी आणि नागरिकांच्या मध्ये वादावादीचा प्रकार यावेळी घडला.
-
येवल्यात वाहतूक कोंडीविरोधात पँथर सेनेचे आंदोलन
नाशिक : येवल्यातील पुणे-इंदोर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. वाहतूक कोंडीबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी आता केली जात आहे. या मागण्यासाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाची तातडीने दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
-
कांदा क्षेत्राला चालू आर्थिक वर्षात मोठा धक्का
देशाच्या कृषी निर्यातीत महत्त्वाची भूमिका असलेल्या कांदा क्षेत्राला चालू आर्थिक वर्षात मोठा धक्का बसला आहे. केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणात सातत्याने बदल होत असल्याने कांद्याची निर्यात 20 टक्क्यांची घट झाली. एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत कांदा निर्यातीमधून 2137 कोटींचे परकीय चलन प्राप्त झाले. एप्रिल 2024 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान निर्यातीमधून 2663 कोटी रुपये मिळाले होते. निर्यात धोरणातील अस्थिरतेचा शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांना फटका बसल्याचे स्पष्ट होत आहे.
-
दारू दुकान त्वरित बंद करा
गोंदिया जिल्ह्यातील किडंगीपार येथील दारू दुकान त्वरित बंद करा अशी मागणी महिलांनी केली आहे. महिलांचा तहसील कार्यालयावर एल्गार दिसून आला. जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन व नगरपरिषदेला महिलांनी निवेदन दिले. 20 फेब्रुवारीला आंदोलनाचा महिलांनी इशारा दिला.
-
दिल्लीतून या प्रकरणात असलेल्या नेत्यांना सोडू नका अशा सूचना
माझ्यावर EDची केस होती. आर्थिक गुन्हे शाखेने बँकेत कुठेच काही झालेले नाही असे ईडीला सांगितले आहे तरी ईडी विषय सोडायला तयार नाही. २६ जानेवारीला हा विषय दिल्लीला गेला. दिल्लीतून या प्रकरणात असलेल्या नेत्यांना सोडू नका अशा सूचना आल्या आहेत. आम्हाला संघर्ष करायचा आहे, मात्र सत्तेत असलेल्यांना वाटेल आम्ही सुटलो असे नाही असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले.
-
फुलंब्रीत शिंदेसेना-उद्धव सेनेत चाय पे चर्चा
ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये फुलंब्रीत चाय पे चर्चा झाली. ठाकरे शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर व माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत चर्चा केली.छत्रपती संभाजी नगरच्या फुलंब्री परिसरातील एक हॉटेलमध्ये दोघांनी सोबत चहा घेतला.याला चाय पे चर्चा म्हणता येणार नाही दुखत घटनेमुळे आम्ही एकत्र आलो होतो, अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन झालं तिथे आम्ही दोघे सोबत होतो मग आम्ही एका रस्त्याला आहे तर चहा घेऊ राजकीय काही नाही, असे अर्जुन खोतकर म्हणाले.
-
आमच्याकडून विलिनीकरणाला पूर्णविराम
आमच्याकडून राष्ट्रवादी विलिनीकरणाला पूर्णविराम देण्यात आला आहे. दादा गेल्यानंतर हा विषय गौण झाला आहे. विलिनीकरण आणि राजकारण दुय्यम आहे असं आमदार रोहित पवार म्हणाले.
-
साकेत खाडीचा नवीन पूल वाहतुकीसाठी खुला
ठाणे ते नाशिक कडे जाणाऱ्या मार्गावरील साकेत खाडीच्या नवीन पुलाचे ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या समवेत पूल वाहनासाठी खुला करण्यात आला. साकेत पुलाच्या चार पदरी पुलावरून वाहन मोठ्या प्रमाणात जाताना दिसत आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी साकेत पूल नंतर कशेळी, पिपलास,वडपे पर्यंत आणखी तीन नवीन पुलाचे आणि रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मार्चपर्यंत कशेळी, पिपलास , वडपे असे तीन पूल तयार होणार आहे.
-
नाशिकच्या गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयासमोर पहाटे भीषण अपघात, एकाचा मृत्यू
नाशिकच्या गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयासमोर पहाटे भीषण अपघात झाला, अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. गंगापूर कडून अशोक स्तंभाकडे जाणाऱ्या दुचाकी वरील समाधान देवरे याचा अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
-
विद्यार्थ्यांवर उन्हात बसून शिक्षण घेण्याची वेळ
बदनापूर तालुक्यातल्या डापका तांडा येथील इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांवर मागच्या 8 महिन्यांपासून ऊन्हात बसून शिक्षण घेण्याची नामुष्की ओढावली आहे.गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वर्गखोली कोसळल्यामुळे तेव्हापासून हे विद्यार्थी वर्ग खोली नसल्यामुळे बाहेर बसून शिक्षण घेत आहे.गावकऱ्यांनी या संदर्भात वारंवार प्रशासनाला तक्रारी आणि निवेदन यांचा पत्र व्यवहार करत या मागणीच्या संदर्भात पाठपुरावा केला मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचं चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार असा थेट इशारा संपूर्ण गावकऱ्यांनी दिलाय.
-
चेंबूर – शिंदेंच्या शिवसेनेकडून गणेश नाईकांना टोला लगावणारे बॅनर
चेंबूर – शिंदेंच्या शिवसेनेकडून गणेश नाईकांना टोला लगावणारे बॅनर लावण्यात आले आहेत . स्मृतीभ्रंश झालेल्यांचे मोफत उपचार करून मिळतील असं लिहीलेला बॅनर असून त्यासह एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांचा फोटो आहे.
-
जळगाव- धरणगाव येथे भंगार गोडाऊनला भीषण आग
जळगावच्या धरणगाव येथे चोपडा रोडवरील एमआयडीसी मधील भंगार गोडाऊनला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आकाशात धुराचे लोट व आगीचे लोळ उसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. या गो़ाऊन शेजारीच महावितरणचे 132 केव्हीचे सब स्टेशन आहे, मात्र आग तिथपर्यंत न पोहोचल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
-
छत्रपती संभाजीनगर – मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याचा गल्लीत खेळणाऱ्या चिमुकल्यावर हल्ला
छत्रपती संभाजीनगर शहरातील बायजीपुरा परिसरात मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने गल्लीत खेळणाऱ्या एका चिमुकल्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. मोकाट कुत्र्यांनी मुलाला घेरून खाली पाडत शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
-
सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने निदर्शनं
सोलापूरमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहेत.
-
वर्धा-जीटी एक्सप्रेसच्या गार्डच्या डब्याला आग
वर्धा-जीटी एक्सप्रेसच्या गार्डच्या डब्याला आग लागली. शिंदी रेल्वे ते तुळजापूर रेल्वेच्या बोगीत आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे.
-
पोलीस भरतीचा थरार सुरू, १७३३ जागांसाठी १ लाख ३९ हजार उमेदवारांची मैदानात झुंज
पुणे शहर पोलीस दलातील १७३३ रिक्त पदांसाठी बहुप्रतिक्षित पोलीस भरती प्रक्रियेला सोमवारपासून दणक्यात सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी तब्बल १ लाख ३९ हजार उमेदवारांनी अर्ज केले असून, पहिल्याच दिवशी मैदानी चाचणीसाठी तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे आणि कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय (Human Intervention) राबवली जात असल्याची खात्रीशीर माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी दिली आहे.
-
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा एप्रिलपासून धावणार, ५ तासांत कोकणात पोहोचता येणार
मुंबई ते कोकण या प्रवासाला आता एक जलद आणि सोयीस्कर पर्याय मिळणार असून, बहुप्रतिक्षित ‘मुंबई-विजयदुर्ग’ सागरी रो-रो सेवेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने (MMB) या सेवेसाठी निविदा प्रसिद्ध केल्या असून, येत्या एप्रिल महिन्यात ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे. या सेवेमुळे मुंबई (भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग हे अंतर केवळ ५ तासांत कापले जाणार असून, दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासाचा हा मार्ग ठरणार आहे. ६५० प्रवासी क्षमता असलेली ही सेवा यशस्वी झाल्यास ती कायमस्वरूपी सुरू ठेवली जाईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानग्या आणि हवामानातील बदलांमुळे यापूर्वी लांबणीवर पडलेली ही सेवा आता कोकणच्या पर्यटनाला आणि वाहतुकीला मोठी गती देणार आहे.
-
बीडमध्ये न्यायासाठी रस्ता रोको करणाऱ्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल
बीड शहरातील गोरे वस्ती परिसरात उघड्या विद्युत डीपीला चिकटून एका १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेतील दोषींवर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी नातेवाईक आणि नागरिकांनी बीडच्या मुख्य रस्त्यावर दीड तास ठिय्या आंदोलन केले. मात्र, सार्वजनिक रस्ता रोखून धरल्याने आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तब्बल ३० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या मयताच्या नातेवाईकांवरच गुन्हे दाखल झाल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे.
-
उमरगा पंचायत समितीमध्ये राजकीय हालचालींना वेग; भाजपचे ७ सदस्य मुंबईत सहलीवर
उमरगा पंचायत समितीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे, ते फुटण्याची भीती असून आणि संभाव्य फोडाफोडी टाळण्यासाठी भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलेले ७ पंचायत समिती सदस्य सध्या मुंबईच्या सहलीवर धाडण्यात आले आहेत. या सदस्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामुळे स्थानिक राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांकडून घोडेबाजार होण्याची शक्यता गृहीत धरून भाजपने आपल्या सदस्यांना सुरक्षित स्थळी हलवल्याचे बोलले जात आहे.
-
लाचखोरीचा प्रकार हा कलंक लावणारा – नरहरी झिरवाळ
नरहरी झिरवाळ यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील आरोपांवर भाष्य केले. लाचखोरीचा प्रकार हा कलंक लावणारा प्रकार आहे. या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया झिरवाळ यांनी दिली.
-
लाचखोरीचा प्रकार घडत होता याची मला पुसटशीही कल्पना नव्हती : नरहरी झिरवाळ
१२ तारखेला टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये एका क्लार्कला रंगेहाथ पकडण्यात आले असून, या संपूर्ण प्रकरणावर नरहरी झिरवाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. मात्र, संबंधित कार्यालयात असा काही लाचखोरीचा प्रकार सुरू होता, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती,” असे नरहरी झिरवाळ म्हणाले. प्रशासकीय कामात पारदर्शकता महत्त्वाची असून चौकशीतून सर्व बाबी समोर येतील, असा विश्वासही झिरवाळ यांनी व्यक्त केला.
-
माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन.
शिंदेसेनेचे सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी तथा सिल्लोडच्या माजी नगराध्यक्षा नफिसा बेगम सत्तार यांचं आज पहाटे निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे सत्तार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुस्लिम परंपरेनुसार त्यांच्यावर सिल्लोड येथील फकीरी कब्रस्तानात दफनविधी करण्यात येत असून अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. परिसरात शोककळा पसरली आहे.
-
सीसीटीव्ही देखरेखीखाली दहावी CBSE परीक्षा….
गडचिरोली–गोंदिया विद्यार्थ्यांची एकलव्य विद्यालयात परीक्षा सुरु असून पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. आजपासून दहावी CBSE बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली असून परीक्षा पारदर्शक, शिस्तबद्ध आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाने यंदा कडक पावले उचलली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही देखरेखीखाली परीक्षा होत असून पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
-
योग्य मोबदला मिळात नाही म्हणून शेतकऱ्यांनी रेल्वे मार्गाचे काम थांबावले
धाराशिव येथे योग्य मोबदला मिळात नाही म्हणून शेतकऱ्यांनी रेल्वे मार्गाचे काम थांबावले आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील भातंब्री गावामध्ये रेल्वे मार्गाच्या कामाविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध, पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची सुरु झाली.
-
काहीही चुकीचं केलं नाही असं पार्थने मला सांगितलं होतं – सुप्रिया सुळे
पार्थवर माझा विश्वास होता, तेव्हा तसं मी व्यक्त देखील केलं होतं… काहीही चुकीचं केलं नाही असं पार्थने मला सांगितलं होतं… असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
-
या देशात राहायचं असेल तर मोदी, मोदी करावं लाहेल अशी स्थिती – संजय राऊत
या देशात राहायचं असेल तर मोदी, मोदी करावं लाहेल अशी स्थिती आहे. अजित पवार यांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद आहे… रोहित पवार केवळ राजकीय नेते नाही तर, अजित पवारांचं कुटुंब आहे. दादांची फाईल बंद करण्यास अमिक शाहांनी नकार दिलेला… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
अंबरनाथमध्ये शिवजयंतीनिमित्त ‘अभंग रिपोस्ट कॉन्सर्ट’
अंबरनाथमध्ये शिवजयंतीनिमित्त ‘अभंग रिपोस्ट कॉन्सर्ट’चं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना शहर शाखेच्या वतीने आयोजन करण्यात आलं आहे. शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं आहे.
-
सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
मुंबईत सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकमेव नगरसेवकासोबत भाजपची युती
स्वीकृत नगरसेवक निवडताना एक जागा कमी होऊ नये म्हणून भाजपने राजकीय खेळी केल्याचे पाहायला मिळतेय. भाजपला 9 व्या स्वीकृत नगरसेवकासाठी 3 मतांची गरज आहे. त्यामुळे भाजपजने राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एकमेव नगरसेवक सत्तेत सहभागी करुन घेतलाय. त्यामुळे MIM चे 8 नगरसेवक असून त्यांना दोन मतांची गरज आहे तर काँग्रेस 2 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 नगरसेवक कोणाच्या बाजूने मतदान करतात हे पाहणे महत्वाचे आहे. सोलापुरात भाजपाचे 102 पैकी 87 नगरसेवक निवडून आले आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक उमेदवार निवडून आला आहे
-
अक्कलकोटमधील भीमा नदी पात्रातील खानापूर बंधाऱ्याची गळती रोखण्याची ग्रामस्थांची मागणी
खानापूर बंधाऱ्याच्या प्लेटा खराब झाल्यामुळे पाणी वाहून जात आहे. खानापूर बंधाऱ्यातून जवळपासच्या गावांना शेती आणि पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र बंधाऱ्याला अशीच गळती सुरू राहिली तर ऐन उन्हाळ्यात बंधारा कोरडाठाक पडण्याची ग्रामस्थांना भीती. खानापूर बंधाऱ्याची गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे ग्रामस्थांची मागणी.
-
महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, दोघांच्या नार्को टेस्ट होणार
बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज एका संशयित व्यक्तीची ब्रेन मॅपिंग करण्यात येणार आहे तर उद्या दोन संशयित व्यक्तींच्या नार्को टेस्ट करण्यात येणार आहेत. आतापर्यंत 11 संशयित व्यक्तींच्या नार्को टेस्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडुन मिळत आहे. यामुळे आता महादेव मुंडे हत्या प्रकरणात तपास यंत्रणेच्या हाती काही लागतं का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
-
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदा घाटावरील मंदिरांच्या डागडुजीला
रामकुंड आणि गोदाघाटवरील मंदिरांना मिळणार पुनर्वैभव..मंदिरांना डागडुजी करून, रंग रंगोटी आणि स्वच्छता केली जाणार. ऐतिहासिक नारोशंकर मंदिराचा देखील होणार कायापालट. ऐतिहासिक नारोशंकर घंटेचा आवाज पुन्हा घुमणार.. इतिहासाची साक्ष देणाऱ्या गोदाघाटवरील मंदिरांचे होणार पूर्ण नूतनीकरण.. सिंहस्थ निधीतून मंदिरांच्या डागडुजीला भरीव निधी
-
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल
घरावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसात आमच्याविरुद्ध तक्रार का दिली? असे म्हणत भररस्त्यात अडवून दोघांना केली बेदम मारहाण ; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल. घरावरील हल्ल्याच्या सीसीटीव्हीनंतर दोघांना भर रस्त्यात केलेल्या मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर. बीड शहरातील पेठ बीड भागात 11 फेब्रुवारी रोजी सदाशिव कोकाट यांच्या घरावर दगडफेक करत आणि लाठ्या-काठ्यांनी सीसीटीव्ही फोडत विजयमाला कोकाट यांना मारहाण करण्यात आली होती.
-
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर दोन गटांमध्ये जोरदार राडा
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. वाडेश्वर हॉटेलच्या समोर तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांना धक्का लागल्याने तरुणांनी राडा घातला. हा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे.
-
महापौर मंजूषा नागपुरे यांनी घेतला प्रकल्पांचा आढावा
पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रकल्पांचा आढावा घेतला. महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा’च्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. शिवाजीनगर – घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी प्रकल्पाच्या प्रगतीचे आणि संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले. तसेच आगामी नियोजनावर सविस्तर चर्चा पार पडली. महापौर मंजुषा नागपुरे, मनपा आयुक्त नवल किशोर राम आणि गणेश बिडकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
-
राहुल गांधी यांच्या विरोधातील स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणाची आज सुनावणी
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी सावरकरांचे वंशज सत्यकी सावरकर यांनी हा खटला दाखल केला आहे. आजच्या सुनावणीत राहुल गांधी यांच्या वकिलाकडून सरतापास करण्यात येणार आहे. फिर्यादी असलेल्या सात्याकी सावरकर यांच्या वकिलाकडून राहुल गांधींच्या बाजूचा सरतपास यापूर्वी पूर्ण झाला आहे.
-
शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमधील कर्मचाऱ्यांचे सलग तीन महिन्यांचे पगार थकले
शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमधील कर्मचाऱ्यांचे सलग तीन महिन्यांचे पगार थकले आहेत. पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. लवकर पगार न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. ७ सप्टेंबर २०२५ पासून प्रसादालय बंद आहे. सेवा नियम आणि पगार निश्चितीची तपासणी लेखा अधिकाऱ्यांकडून सुरू असून अडचणी दूर करून लवकरच पगार आणि प्रसादालय सुरू करू अशं प्रशासक अतुल चोरमारे म्हणाले आहेत.
-
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडियाला तीन मार्चपर्यंत मुदतवाढ
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडियाला तीन मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मुंढव्यातील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये आणि दंडाची रक्कम वसुलीसाठी दिलेली दोन महिन्यांची मुदत संपुष्टात आली आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आता विभागाने पंधरा दिवसांची मुदत कंपनीला वाढवून दिली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी तीन मार्चला होणार आहे.
-
तपोवन वृक्षतोड प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी
नाशिकमधल्या तपोवन वृक्षतोड प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील अंतरिम अर्जावर महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. नाशिक महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण विभाग आज उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनसेकडून वकील नितीन पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि गौतम अखंड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आज पुण्यात आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आज पुण्यात आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश NSUI कडून पुण्यात मोदींच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. एपस्टीन फाईल् मध्ये मोदींचं नाव आल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश NSUI आंदोलन करणार आहे.
-
अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचं निधन
शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचं निधन झालं आहे. नफिसा बेगम यांच्या पार्थिवावर सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. नफिसा या सिल्लोड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष होत्या.
Published On - Feb 17,2026 8:11 AM
