मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला साहसी खेळात सामाविष्ट करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच गोविंदांना नोकरीत पाच टक्के आरक्षण दिलं जाईल असेही त्यांनी सांगितले. यानंतर विरोधकांसह अनेकांनी टीकेची झोड उठवली. यादरम्यान उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी हा निर्णय घेत असताना, निकष ठरविण्यासाठी काम करण्यात येत असल्याचेही म्हटलं आहे. त्याचबरोबर हिंदूंचे सण साजरे करत असताना, त्याला एक विशिष्ट दर्जा देऊन जर जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न आत्ताचे सरकार करत असेल तर कोणाला पोट शूळ उठण्याची गरज नाही असेही म्हटलं आहे. तसेच कदाचित सरकार बदललं, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले हेच अजून काही लोकांना रुचलं नसल्यामुळे ते असा प्रकार करत असल्याचेही सामंत म्हणाले.