Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतून कथितरित्या पैशांची चोरी झाल्याच्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली असून, या घटनेवर आता प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतून पैशांची चोरी झाल्याच्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली असून, या घटनेवर आता प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दत्तात्रय होसबळे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अयोध्येतील श्रीरामलल्ला मंदिर हे अनेक पिढ्यांच्या संघर्षातून आणि कोट्यवधी रामभक्तांच्या समर्पण, त्याग व बलिदानातून उभे राहिलेले हिंदू समाजाच्या श्रद्धेचे आणि आस्थेचे पवित्र केंद्र आहे. अशा मंदिरातील दानपेटीतून रक्कम चोरीला जाण्याची घटना ही संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावणारी असून, यामुळे सर्व रामभक्त अत्यंत व्यथित झाले आहेत.
या प्रकरणी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या विनंतीनुसार उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, त्याच्या शिफारशींनुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तपासात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कोणतीही दया न दाखवता कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यासोबतच श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाने या घटनेला अपवादात्मक मानून मंदिराच्या व्यवस्थापन, आर्थिक नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेतील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मंदिरातील पारदर्शक आणि सक्षम व्यवस्थेमुळे कोट्यवधी रामभक्तांचा विश्वास अधिक दृढ होईल आणि सध्या निर्माण झालेला संभ्रम दूर होईल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणामुळे देशभरात मोठी चर्चा सुरू झाली असून, विशेष तपास पथकाच्या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
