नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये काल जाहीर सभा झाली. या सभेत अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना काही प्रश्न विचारत सडकून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणतात की, भाजपने आपलं सरकार पाडलं. पण ते तसं नाहीय. खरा दगा हा तर उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीवर जावून बसले, असाही हल्लाबोल त्यांनी केला. यावेळी अमित शाह यांनी मुस्लिम आरक्षणापासून ते ट्रिपल तलाकपर्यंत उद्धव ठाकरे यांना उद्देशून चार महत्त्वाचे सवाल केले. हिंमत असेल तर आपली भूमिका स्पष्ट करा. ट्रिपल तलाक हटवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. त्यावर आपण सहमत आहात का नाही? अयोध्येत राम मंदिर बांधलं जात आहे. त्यावर तुम्ही सहमत आहात की नाहीत? तर धर्माच्या मुद्द्यावरुन आरक्षण मिळू शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं की, मुस्लिम आरक्षण हवं की नको? असा सवालही उपस्थित केला.