तुमचा नेता किती कलंदर… प्रसाद लाड यांचं नाव घेत मनोज जरांगेंचा कुणाला टोला?
Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे शस्त्र काढले आहे. राज्य सरकारवर त्यांनी अविश्वास दाखवला आहे. त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारविरोधातील खदखद व्यक्त केली.

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis -Prasad Lad: “मला आता आरपार खेटायचं आहे. मी येत्या 30 तारखेला एकटाच उन्हातानात बसणार आहे. प्रेमाने सांगितलं आणि बैठका झाल्या समजून सांगितलं तरी आरक्षण नाही त्यामुळे आता एकदा होऊनच जाऊ द्या. मे महिन्याच्या कडक उन्हात माझ्या जीवाची लाही लाही झाली तरी मी आता बसणार आहे. तुम्हाला खेटायचं असेल तर येत्या 30 तारखेपासून खेटू”, असा खणखणीत इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. त्यांनी उपोषणाचे शस्त्र पुन्हा एकदा बाहेर काढले. त्यामुळे आमदार प्रसाद लाड यांची मध्यस्थी यशस्वी ठरली नसल्याचे स्पष्ट झाले. आजच्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.
तुमचा नेता किती कलंदर…
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा टार्गेट केले. त्यांनी सरकार दहा महिन्यांपासून विविध मुद्यांवर केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला. त्यांनी यावेळी 22 मे रोजी आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत झालेल्या भेटीची आठवण करून दिली. प्रसाद लाड यांच्यावर विश्वास टाकला कारण त्यांचा शब्दच तसा होता असे त्यांनी स्पष्ट केले. लाड यांना दोष द्यायचा नाही. त्यांना काही म्हणायचं नाही, असे जरांगे म्हणाले.
सरकार सातत्याने भाजपच्या नेत्यांशी कोणीही बोलत नसल्याचे म्हणत होते. आमदार प्रसाद लाड यांना संपर्क साधला आणि भेट झाली. प्रसाद लाड यांना मनातल्या मनात एवढे जरी कळालं की आपलाच माणूस दोषी आहे तरी बस झालं, त्यांचा नेता किती कलंदर आहे हे त्यांना आता कळलं असेल असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला. आता काहीही झालं तरी मी उपोषणाला बसणार आहे हे फायनल झालेले आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांचा भाजपवर हल्ला बोल
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपने माझ्यावर सुद्धा डाव टाकला होता, असा आरोप त्यांनी केला. भाजप मधल्या मराठा आमदार आणि मंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे की तुमचे मुलं सुद्धा मोठे होणार आहे, असे आवाहन त्यांनी केले. मराठा समाजाने आंतरवाली मध्ये येऊ नका. राज्यामध्ये कोणीही उद्रेक किंवा धिंगाणा करायचा नाही जरांगे पाटलांचा समाज बांधवांना आवाहन केले. एकाही मराठा समाज बांधवांनी अंतरवाली मध्ये येऊ नका, तुमच्या लेकरा बाळाचं मी वाटोळ होऊ देणार नाही. तुमच्या लेकरांसाठी मी जीव सुद्धा द्यायला तयार आहे. येत्या 30 तारखेलाच आमरण उपोषण आंदोलन होणार आहे यात कोणताही बदल होणार नाही. जरांगे पाटील यांच्याकडून आमरण उपोषणावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
जातीचा नसूनही मुख्यमंत्री केलं
आज मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोर्चा वळवला. त्यांनी सरकारच्या वेळेकाढू धोरणावर जोरदार टीका केली. आपल्या जातीचा नसून त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं असं अनेक जण म्हणतात, असे फडणवीस यांच्याविषयी ते म्हणाले. मात्र फडणवीस जातीचे नसताना मराठा समाजाने त्यांना आपले मुख्यमंत्री केले हे तुम्ही कसं विसरता असा जबरी टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला.
