Maharashtra News LIVE : यवतमाळ वीज कोसळून शेतकरी जागीच ठार
Maharashtra News LIVE : पर्वतीत अत्याचारला बळी पडलेल्या मुलीच्या ओठासह छातीवर मोठ्या मारहाणीच्या जखमा. 62 वर्षे व्यक्तीने नऊ वर्षीय नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या पीडित मुलीच्या तोंडावर ओठ आणि छातीवर जखमा आढळून आल्या आहेत.

मराठवाड्यात दिवसेंदिवस खालावत चाललेली भूजल पातळी चिंतेचा विषय ठरत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या तपासणीत मराठवाड्यातील सरासरी भूजल पातळी भूपृष्ठापासून 7.42. मीटरपर्यंत खाली गेल्याचे समोर आले आहे. विभागातील 76 पैकी 17 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत घट नोंदवण्यात आली असून मराठवाड्यातील 875 विहिरीद्वारे ही भूजल पातळी मोजण्यात आली आहे. जायकवाडी धरणाची क्षमता घटवणारा तब्बल 20 टीएमसी गाळ उपसण्याच्या हालचालींना वेग आला असून राज्य सरकारच्या नव्या धोरणामुळे मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 50 वर्षांत पहिल्यांदाच जायकवाडीतील साचलेला गाळ काढला जाणार असून यामुळे धरणाची साठवण क्षमता वाढून छत्रपती संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्यासह मराठवाड्यातील सिंचनालाही फायदा होणार आहे. नाशिकच्या म्हाडा घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील यांना अटक तसेच या प्रकरणातील फिर्यादी भूमि अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन काजळे यांना देखील गुन्हे शाखेकडून अटक. काही दिवसांपूर्वी नायब तहसीलदार नितीन पाटील याला देखील करण्यात आली होती अटक.म्हाडा घोटाळाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आली होती स्वतंत्र एसआयटी.
LIVE NEWS & UPDATES
-
नाशिक भूखंड घोटाळ्यातील दोघा सरकारी अधिकाऱ्यांना ११ मेपर्यंत कोठडी
नाशिक म्हाडा भूखंड घोटाळ्यातील आरोपी सरकारी अधिकारी कल्पेश पाटील , बिपीन काजळे यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणातील फिर्यादीच आरोपी निघाल्याने खळबळ उडाली आहे. राज्यभरात गाजत असलेल्या म्हाडा भूखंड घोटाळ्यात पोलिसांनी नायब तहसीलदारच्या अटकेनंतर दोन सरकारी अधिकाऱ्यांना अटक करत मोठी कारवाई केली आहे. आज कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाकडून दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. आणि आरोपींनी 11 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नगररचना विभागातील साय्यक संचालक कल्पेश पाटील आणि भूमी अभिलेख कार्यालयातील बिपीन काजळे यांच्यावर कागदपत्रात फेरफार केल्यासह जाणीवपूर्वक बनावट नकाशांना मंजुरी दिल्याचा आरोप आहे.
-
जळगावात जलजीवन मिशन योजना बारगळल्याने पाणी टंचाई
जळगाव जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजना बारगळली आहे. अनेक गावात योजनाची कामे रखडल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या चार वर्षात जलजीवन मिशनच्या मंजूर 1 हजार 371 योजनांपैकी केवळ 460 गावात योजनाची कामे पूर्ण झाली आहेत. चार वर्षात केवळ 460 गावांमध्येच जलजीवन मिशन योजनेचे पाणी पोहोचले आहे. 906 गावांमध्ये योजनेची कामे अपूर्ण आहेत. जागेच्या अडचणी, कौशल्य असलेले कामगारांची टंचाई, निधीच्या अभावामुळे योजनेची कामे रखडल्याचे अभियंत्यांनी म्हटले आहे.
-
-
वांगणीत वाऱ्यासह मुसळधार पावसाने वीजेच्या तारांवर पत्रे उडल्याने स्पार्किंग
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने वांगणी आणि परिसराला झोडपून काढले आहे. अशातच एका घराचा पत्रा हायटेन्शन वायरमध्ये अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होत असून नागरिक भयभीत झाले आहेत. वांगणी पश्चिमेकडील श्रीनगर भागात ही घटना घडली आहे. घराचा पत्र आहे हायटेन्शन वायरमध्ये अडकल्याने इथल्या रहिवाशांची धावाधाव झाली आहे.
-
यवतमाळ वीज कोसळून शेतकरी जागीच ठार
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील दराटी येथे वीज पडून एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. श्रीनिवास राठोड (45) असे वीज पडून जागीच ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून लहान मुलगा आणि एक महिला जखमी झाली आहे.
-
धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा
धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा
कळंब परिसरात वादळीवाऱ्यासह विजांच्या कडकडात पाऊस
उन्हाच्या कडाक्यात अवकाळी पावसाने दिलासा, ऊस पिकालाही संजीवनी
पावसाने ज्वारीच्या कडब्याचे नुकसान
-
-
लग्न मंडपावर सोलर खांब पडून मोठा अपघात, 6 जण जखमी
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील वडगाव इथ वादळी वाऱ्यामुळे ग्रामपंचायतीचा सोलर खांब विद्युत तारांवर कोसळून अपघात झाला आहे. यात सोलर खांब विद्युत तारांवर पडल्याने विद्युत तारा तुटून थेट लग्न मंडपावर पडल्याने एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत सहा जण जखमी झाले असून, विजेचा शॉक लागून काही जण किरकोळ जखमी झाले आहेत, तर दोन महिला या गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
-
बीड जिल्ह्याला पुन्हा पावसानं झोडपलं, अवकाळीचा तडाखा
बीड जिल्ह्यातील काही भागात दुपारनंतर अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे बीड तालुक्यातील वडगाव कळसंबर परिसरात झेंडुच्या शेतीचे माठ्ये प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान यापुर्वी झालेल्या पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यातच आजच्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
-
अंबादास दानवे यांनी घेतली चंद्रकांत खैरे यांची भेट
शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली. यावेळी खैरे यांनी दानवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
-
नाशिकमध्ये कांदा काढणीला वेग, मजुरांचा तुटवडा
नाशिक जिल्ह्यात येवला, लासलगावसह परिसरात उन्हाळी कांदा काढणीला वेग आला असताना येवला तालुक्यात मजुरांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. बाजारभाव कमी असल्याने शेतकरी कांदा साठवणुकीकडे वळत आहेत. मात्र मजूर उपलब्ध नसल्यामुळे संपूर्ण कुटुंबच शेतात उतरून काढणी, वाळवण आणि साठवणुकीची कामे करत आहे. महिला, ज्येष्ठ आणि मुलांचाही या कामात सहभाग दिसून येत आहे. -
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सहपरिवार घेतले शिर्डीत साईबाबांचे दर्शन
भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सहपरिवार शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. रामनाथ कोविंद यांनी साईबाबांच्या समाधीवर पाद्यपूजा करत मनोभावे दर्शन घेतलं. मला दर महिन्याला दर्शनाला यावं असं वाटतं मात्र जेव्हा बाबांचा बुलावा येतो तेव्हाच दर्शनाचा योग येतो असं म्हणत सध्या जगात असलेली युद्धजन्य स्थिती निवळून शांती असावी अशी प्रार्थना कोविंद यांनी केलीय. -
राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेच्या ठिकाण असल्यास तोरणमाळला जोरदार पावसाची हजेरी
नंदुरबार : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेच्या ठिकाण असल्यास तोरणमाळला जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. गेल्या काही तासापासून तोरणमाळला पावसाची जोरदार बँटिंग चालू आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटकांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
-
नसरापूर अत्याचार प्रकरणातील भीमराव कांबळेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
नसरापूर अत्याचार प्रकरणातील भीमराव कांबळेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे भीमराव कांबळे याला कोर्टात हजर करण्यात आले. सुरक्षिततेच्या कारणास्तव व्हिसीद्वारे भीमराव कांबळे याला कोर्टात हजर केले गेले. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
-
जळगावात विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक कार्यरत
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या हस्ते दामिनी पथकांच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. महिला हेल्पलाइनवर आलेल्या कॉलनंतर १० मिनिटांत प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. दामिनी पथक शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे येथे गस्त घालणार आहे. विद्यार्थिनींना ‘गुड टच, बॅड टच’ची माहिती देण्यासह सोशल मीडियाच्या दुरुपयोगाच्यापरिणामाविषयीही मार्गदर्शन करणार आहेत. अल्पवयीन मुली , महिलांच्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही वर्षांपासून बंद दामिनी पथक सुरू करण्यात आले आहे
-
संजय राऊत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडून
तब्बल एक तासांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची वाट बघत आहेत. जिल्हाधिकारी यांच्यासोबत जो पर्यंत भेट होत नाही तो पर्यंत जाणार नसल्याच्या भूमिकेवर संजय राऊत ठाम आहेत.
-
तीन वर्षांनंतरही जळगाव जिल्ह्यातील मयत चिमुकलीला न्याय नाही
जळगावच्या भडगाव तालुक्यातील एका गावातील २०२३ मध्ये सात वर्षीय बालिकेवर अत्याचार करून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरला होता. आरोपी स्वप्निल पाटील याने बालिकेवर अत्याचार करून तिचा चेहरा दगडाने ठेचत मक्याच्या कुट्टीमध्ये मृतदेह लपवून ठेवला होता. दोन दिवसानंतर दुर्गंधी आल्यामुळे घटना उघडकीस आली होती.बालिकेवर बलात्कार आणि अत्याचाराच्या या घटनेने पाचोरा भडगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती.
-
सोलापुरात 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
सोलापुरात अल्पवयीन मुलींसोबत आता मुलेही असुरक्षित असल्याचे पाहायला मिळतेय. या प्रकरणातील आरोपी नराधमाला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील धक्कादायक घटना समोर आली. सिद्धाराम सलगर असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
-
अमरावतीत शासकीय मेडिकल कॉलेज वरून वाद
ज्यांच्या डोक्यावरचे पांढरे केस झाले त्यांनी दिवसा स्वप्न पाहू नये अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली. आलेल्या कामावर विघ्न टाकण्याचं काम बंद करा. अमरावतीचे शासकीय महाविद्यालय वडद येथेच होणार. रवी राणा यांची नाव न घेता आमदार संजय खोडके यांच्यावर टीका केली.
-
३१ मे पासून भाविकांसाठी खुले होणार भीमाशंकर मंदिर
मुख्य सभामंडपाच्या पुनर्बांधणीसह विविध सुरक्षा आणि सुविधा विकासकामांसाठी बंद ठेवण्यात आलेले भीमाशंकर मंदिर ३१ मे पासून पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार मंदिर परिसरात गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी व्यापक कामे हाती घेण्यात आली होती. सुरुवातीला ९ जानेवारीपासून तीन महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्याचे नियोजन होते; मात्र कामांच्या प्रगतीनुसार ही मुदत वाढवून ३१ मे पर्यंत करण्यात आली.
-
पेट्रोल-डिझेल न मिळाल्याने संताप
बीड जिल्ह्यात आजही पेट्रोल आणि डिझेलची टंचाई कायम आहे.नवव्या दिवशी देखील जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची टंचाई दिसून आली. बहुतांश पंपाकडे जाणारे रस्ते नागरिकांनी बंद केले. रस्त्यावर मोठे मोठे दगड, वाहनं आणि लाकडं टाकुन रस्ते बंद करण्यात आले आहे. अनेक पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत. चार चार दिवस आम्हाला पेट्रोल डिझेल दिले जात नाही, यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी लागणारे तेल सुद्धा कधीपर्यंत पुरणार? नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे अशी पेट्रोल पंप चालकाने प्रतिक्रिया दिली.
-
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन घोटाळाप्रकरणी अविनाश पाठक यांना अटक
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन आणि मावेजा घोटाळा प्रकरणात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूरमधून पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी फोनवरून दिली. अविनाश पाठक यांना अटक केल्यानंतर बीडच्या न्यायालयात हजर केले जाईल. या अगोदर अविनाश पाठक यांची दिवसभर कसून चौकशी करण्यात आली होती. एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात दहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना एसआयटीने आज तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनाच अटक केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
-
कल्याण पश्चिम इथल्या ऋतू रिव्हर व्ह्यू क्लासिक इमारतीत भीषण आग
कल्याण पश्चिम इथल्या ऋतू रिव्हर व्ह्यू क्लासिक इमारतीत भीषण आग लागली असून दोन घरांचं मोठ्या प्रमाणात नुकासान झालं आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एका घराच्या हॉलमधील एसीचा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं असून आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
-
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांची हायकोर्टात धाव
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्याकडून हायकोर्टामध्ये धाव घेण्यात आली आहे. बीडच्या विशेष मकोका न्यायालयात ठेवलेले दोषारोप रद्द करण्यात यावेत यासाठी उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली आहे. दोषारोपाविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 21 मे रोजी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 21 मे रोजी होणार आहे. जयराम चाटेकडून बीडच्या विशेष मकोका न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. प्रतीक घुलेचा न्यायालयाकडे जेलमधून एक अर्ज असून हा अर्ज नेमका कशासाठी केला आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. आरोपीच्या वकिलांकडून घटनास्थळाच्या पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण दाखवण्याची मागणी केली जात आहे. अधिकचा पुरावा म्हणून जोडलेल्या लॅपटॉपची क्लोन कॉपी देण्यात यावी, अशी मागणी पुन्हा आरोपींच्या वकिलाकडून न्यायालयाकडे करण्यात आली.
-
नसरापूर प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडी आज संपणार, न्यायालयात केलं जाणार हजर
भोर तालुक्यातील नसरापूर इथल्या साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार आणि त्यानंतर हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याची आज पोलीस कोठडी संपणार आहे. आरोपी भीमराव कांबळेला आज दुपारी दोनच्या सुमारास शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर कोर्टाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे.
-
उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात डॉक्टरांच कामबंद आंदोलन
उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुरापलं आहे. रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती. तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल आणि डॉक्टरांच्या अटकेची मागणी करण्यात आलेली. महापौर आणि पोलीस रुग्णालयात दाखल झाले आहेत.
-
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यातल्या खंबाटकी घाटाजवळील प्रवास होणार सुखकर
खंबाटकी घाटाजवळील नवीन दुसऱ्या बोगद्याची साताराहून पुण्याकडे जाणारी एक लेन चाचणीसाठी खुली झाली. ९ मे रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पुण्याहून साताऱ्याकडे येणाऱ्या दुसऱ्या लेनचे काम 86% पूर्ण झाले आहे. ही लेन पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा खंबाटकी घाटातील अर्धा तास वेळ कमी होणार आहे.
-
पुण्याच्या चऱ्होली खुर्दमध्ये पाईप कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग; मोठी वित्तहानी, जीवितहानी टळली
पुणे जिल्ह्यातील चऱ्होली खुर्द परिसरात पाईप कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आळंदी-वडगाव रस्त्यावरील साई गार्डन मंगल कार्यालयाच्या दक्षिणेला असलेल्या गोडाऊनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले असून कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
-
जालना जिल्ह्यातील 20 गावे आणि 19 वाड्यांमधील 65 हजार 877 नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून
दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा अधिकच वाढत चालला असल्याने पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे,जालना जिल्ह्यात सध्या स्थितीला 65,877 नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्यास वास्तव समोर आलं. जालना जिल्ह्यातील 20 गावे आणि 19 वाड्यांना 38 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असून दिवसाला 67 फेऱ्या सुरू आहे, सर्वाधिक पाणी टंचाईची गंभीर समस्या बदनापूर तालुक्यात निर्माण झाली असून एकट्या बदनापूर तालुक्यातील 40 हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी 21 टँकर सुरू आहेत, त्यामुळे येत्या काळात उन्हाचा तडाखा पाहता ही टँकरची संख्या यापेक्षाही जास्त वाढणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
-
शिर्डी पोलीस करणार भोंदू खरातसह जमीन व्यवहारातील साक्षीदारांची चौकशी…
मला गोत्यात आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदलली.. अशी माहिती भोंदू खरात याने चौकशीत पोलिसांना दिली. शिर्डीतील जमिनीचा व्यवहार पूर्ण कायदेशीर आहे. सावकारी करण्यासाठी हा व्यवहार केला नाही… मी जमीन मागायला जमीन मालकाकडे गेलो नव्हतो , ते आणि त्यांचे समवेत असणारे माझ्याकडे आले… काल पाच तासांहून अधिक वेळ भोंदू खरात याची चौकशी करण्यात आली. जमीन व्यवहारातील साक्षीदार प्रभाकर गुंजाळ , भाऊसाहेब चौधरी , सचिन वाणी या साक्षीदारांची होणार चौकशी तर शिर्डीतील व्यावसायिक मयत जितेंद्र शेळके यांचे बंधू महेंद्र शेळके हे देखील व्यवहाराला असल्याची भोंदू खरात याने शिर्डी पोलिसांना माहिती दिली.
-
पिंपरी चिंचवड – कुदळवाडी परिसरातील नुरा मजिद्द जवळील एका गोदामाला भीषण आग
पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरातील नुरा मजिद्द जवळील एका गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठले आहेत. मात्र आजूबाजूचा परिसर मोकळा असल्याने सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाची तीन वाहने दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
सोलापूरच्या बोरामणीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी ताब्यात
सोलापूरच्या बोरामणीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी ताब्यात. – पश्चिम बंगालच्या सीमेवरून आरोपी शंकर मस्केला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
संपत्तीच्या वादातून आरोपीने आपली वहिनी आणि पुतण्या, पुतणीचा खून केला होता. त्यानंतर आरोपी मागील पाच दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला पश्चिम बंगाल येथून ताब्यात घेतले
-
विजय थलपती हे राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल, सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आलाय. विजय थलपती हे राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. टीव्हीकेसोबत एकूण 113 आमदार असून बहुमतासाठी अजून 5 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.
-
सोलापुरात 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
सोलापुरात अल्पवयीन मुलीच नव्हे तर मुलंही असुरक्षित असल्याचे दिसतंय. अवघ्या 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे उघड झाले असून याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी नराधमाला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील धक्कादायक घटना समोर आली असून नराधमाने बालकाला स्वतःच्या घरी नेऊन बालकावर अनैसर्गिक कृती केल्याचे उघड झाले.
-
31 मे पासून भाविकांसाठी खुले होणार भीमाशंकर मंदिर
मुख्य सभामंडपाच्या पुनर्बांधणीसह विविध सुरक्षा आणि सुविधा विकासकामांसाठी बंद ठेवण्यात आलेले भीमाशंकर मंदिर 31 मे पासून पुन्हा दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे.
भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार मंदिर परिसरात गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी व्यापक कामे हाती घेण्यात आली होती. सुरुवातीला 9 जानेवारीपासून तीन महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्याचे नियोजन होते; मात्र कामांच्या प्रगतीनुसार ही मुदत वाढवून 31 मे पर्यंत करण्यात आली होती.
-
ठाणेकरांना पाणी कपातीचा चटका; दुरुस्तीच्या कामामुळे टँकरसाठी लागल्या रांगा
ठाण्यात भीषण उष्णतेतच आता पाणी कपातीचे संकट ओढावले आहे. MIDC च्या दुरुस्ती कामामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी २४ तास पाणी बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे साकेतसह अनेक भागांत पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. टँकरसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सोसायट्यांमध्ये पाण्याची मागणी वाढल्याने महापालिकेच्या टँकरवर नागरिक अवलंबून आहेत.
-
डहाणू–दिवा लोकलमध्ये मराठीला दुय्यम स्थान, गुजराती जाहिरातींचा सुळसुळाट, रेल्वे प्रवासी संतप्त
डहाणू-दिवा लोकल गाड्यांमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या लोकलच्या डब्यांमध्ये सर्वत्र गुजराती भाषेतील जाहिराती आणि फलकांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. यामुळे मराठी प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गाडीच्या संपूर्ण डब्यात जाहिरातींचे फलक केवळ गुजराती भाषेत आणि गुजराती नावाने लावण्यात आल्याने, ही रेल्वे महाराष्ट्रात चालते की गुजरातमध्ये, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. स्थानिक भाषेत माहिती मिळणे हा प्रवाशांचा अधिकार असताना, रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे मराठीला डावलले जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
-
सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री एक भीषण अपघात घडला असून, यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शहरातील शेळगी उड्डाणपुलावर मध्यरात्री १ च्या सुमारास एका भरधाव कंटेनरने चारचाकी गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील दोन प्रवाशांचा जागीच प्राण गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे, मात्र मृतांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
-
पुण्यातील नसरापूर घटनेचा खटला फास्ट ट्रॅक ट्रायल कोर्टमध्ये चालणार
नसरापूर येथील साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेले निघृण अत्याचार व हत्ये प्रकरणाचा तातडीने निकाल लावण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार आणि उच्च न्यायालयाच्या परवानगीने फास्ट ट्रॅक ट्रायल कोर्ट स्थापन करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये विशेष तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी दिली आहे.
-
पुण्यात वर्षभरात १२० पादचाऱ्यांचा मृत्यू; ४३ टक्के तक्रारींकडे दुर्लक्ष
पुण्यात वर्षभरात १२० पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘माय वॉक माय राइट’ मोहिमेंतर्गत दाखल ३०२ तक्रारींपैकी ४३ टक्के तक्रारींकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप ‘परिसर’ संस्थेने केला आहे. तक्रार निवारण प्रक्रियेत मोठ्या त्रुटी असल्याचे सांगत संस्थेने आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र पाठवून त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
-
नसरापूर घटनेनंतर पोक्सो आरोपींवर पोलिसांची करडी नजर
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणानंतर पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. पोक्सो कायद्यातील पुनरावृत्ती करणाऱ्या आरोपींविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत असून, दोन किंवा अधिक गुन्हे असलेल्या ३७ आरोपींना पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच १९३ संशयितांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉण्ड घेतला जाणार आहे तर गरज पडल्यास प्रतिबंधात्मक कारवाईही केली जाणार आहे.
-
अशोक खरात विरोधात दोषारोपपत्र दाखल होणार
अशोक खरात विरोधात दोषारोपपत्र दाखल केले जाणार. पुढील आठवड्यात एसआयटी कडून दोषारोपपत्र सादर होण्याची शक्यता. अशोक खरात विरोधातील एकूण 9 प्रकणाचा एसआयटीकडून करण्यात आलाय तपास. अटकेनंतर दोन महिन्यांत दोषारोपपत्र दाखल करण्याचा एसआयटीचा प्रयत्न. आतापर्यंत करण्यात आलेला तापस, नोंदविण्यात आलेल्या जबाबच्या आधारावर दाखल होणार दोषारोपपत्र.
-
सोलापुरात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार
सोलापुरात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार. आरोपी नराधमाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. सोलापुरातील धक्कादायक घटना समोर. सिद्धाराम सलगर असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव. नराधमाने बालकाला स्वतःच्या घरी नेऊन बालकावर अनैसर्गिक कृती केल्याचे समोर.
-
मेळघाटात नऊ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा
मेळघाटात नऊ गावांत टँकरद्वारे सहा हजार नागरिकांना होत आहे पाणीपुरवठा. समाधानकारक पावसाळा होऊनही अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे गंभीर चित्र निर्माण झाले असून मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील नऊ गावांतील सुमारे ६ हजार ७६ नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा करून तहान भागविली जात आहे. मेळघाटातील ९ गावांमध्ये नैसर्गिक पाणीस्रोत आटले असून,विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. चिखलदरा तालुक्यामध्ये नऊ ठिकाणी परिस्थिती सर्वाधिक बिकट असल्याचे दिसून येत आहे.
-
पर्वती अत्याचार, पीडित मुलीच्या ओठासह छातीवर मारहाणीच्या जखमा
पर्वतीत अत्याचारला बळी पडलेल्या मुलीच्या ओठासह छातीवर मोठ्या मारहाणीच्या जखमा. 62 वर्षे व्यक्तीने नऊ वर्षीय नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या तोंडावर, ओठ आणि छातीवर जखमा आढळून आल्या आहेत. अत्याचार करतेवेळी नराधम आजोबाने मुलीला नखे मारली असावीत अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
-
बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान, 10 हजार रुपये घ्यायचे
राहाता तालुक्यातील पिंप्रीनिर्मळ येथील बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी एका डॉक्टरसह दोन एजंट ताब्यात. प्रकरणाची व्याप्ती वाढली. पिंप्री निर्मळ शिवारात एका निर्जनस्थळी असलेल्या फार्महाऊसवर पोलिसांनी 29 एप्रिल रोजी टाकला होता छापा. फार्महाऊस येथे बेकायदेशीरपणे सुरू होते गर्भलिंगनिदान. अपर पोलिस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर आणि लोणी पोलिसांची संयुक्त कारवाई. गर्भलिंग निदानासाठी महिलांकडून 10 हजार रुपये घेत असल्याची माहिती.
-
लग्नाचे आमिष दाखवून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण
केज तालुक्यातील एका गावातून अकरावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली आहे. घरी कोणीही नसताना सकाळी 8 ते रात्री 7 वाजेच्या दरम्यान हे अपहरण झाले. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सागर शंकर गरडे नामक आरोपी विरुद्ध युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Published On - May 07,2026 8:19 AM
