Maharashtra News LIVE : अमेरिका–इराण युद्धाचा फटका; डांबराचे दर गगनाला भिडले
Meta Description: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. सध्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे इराण-इस्त्रायल युद्धामुळे जागतिक इंधन संकट उद्भवले आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा- राऊत
भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा. मंत्र्यांना सहआरोपी केल्याशिवाय राज्यातली भोंदूगिरी थांबणार नाही. संजय राऊत यांची मागणी
-
भोंदूबाबाला जमीन विकल्यापासून एक मुलगा बेपत्ता असल्याचं समोर
भोंदूबाबाला जमीन विकल्यापासून एक मुलगा बेपत्ता असल्याचं समोर. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. नाशिकच्या पाथर्डीमधील घटना समोर, शिवाजी ढगेंची माहिती. भोंदूबाबानं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन पैसे दिलेच नाहीत- ढगे यांचा आरोप
-
-
1 एप्रिलपासून विमान इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता
आखाती देशांतील युद्धाचा भारतीय विमान कंपन्यांवर परिणाम… 1 एप्रिलपासून विमान इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता…. प्रवाशांवर तात्काळ बोजा पडणार नाही आणि यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू… केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून स्पष्ट..
-
उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या खासदारांची बोलावली बैठक
उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या खासदारांची तातडीची बैठक बोलावली. दुपारी 12.30 वाजता मातोश्रीवर बैठकीचं आयोजन. ‘ऑपरेशन टायगर’ चर्चेच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती
-
इराण युद्धाचा अमेरिकेचा अंदाजित खर्च 27 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला
इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेचा लष्करी खर्च आता 27 अब्ज डॉलर्सच्या पार गेला…. अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आणि युद्धनौकांच्या तैनातीमुळे खर्च दिवसाला 1 ते 2 अब्ज डॉलर्सने वाढला….
-
-
इराण-अमेरिका तणावाचा फटका; डांबराच्या किमती वाढल्या
अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम डांबराच्या दरांवर झाला आहे. डांबराचे दर गगनाला भिडल्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) खड्डेमुक्ती निविदांना ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. पहिल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेवर दुसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ आली आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वीची रस्ते दुरुस्तीची कामे रेंगाळण्याची भीती निर्माण झाली आहे. वाढत्या दरांमुळे पालिका प्रशासन सध्या हतबल दिसत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता या संकटातून मार्ग काढून पालिका पावसाळ्यापूर्वी नागरिकांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
विदर्भात अवकाळी पावसाचे सावट; नागपूरसह अनेक जिल्ह्यांत आजही ढगाळ वातावरण
विदर्भातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी नागपूरसह अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने नागरिक होरपळून निघाले होते, मात्र गेल्या काही दिवसांतील ढगाळ हवामानामुळे तापमानात ४ ते ५ अंशांची घट झाली असून उन्हाचा तडाखा काहीसा कमी झाला आहे. नागपूर हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ही स्थिती तात्पुरती असून उद्यापासून तापमानात पुन्हा मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने कडाक्याच्या उन्हाच्या झळा विदर्भाला बसण्याची चिन्हे आहेत.
-
-
धाराशिवच्या कळंब शहरात दोन गटांत तुफान दगडफेक; रमाई चौक परिसरात तणाव
धाराशिवच्या कळंब शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. शनिवारी सायंकाळी रमाई चौक परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार दगडफेकीमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भरदिवसा झालेल्या या राड्यात दोन्ही गटांतील किमान ५ ते ६ जण जखमी झाले आहे. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, मागील केवळ एक महिन्यात कळंबमध्ये घडलेली ही चौथी मोठी हिंसक घटना आहे. या दगडफेकीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी शहरात वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे कळंब पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. गुन्हेगारी रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. या राड्यानंतर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
कॅप्टन खरात आणि ऑफिस बॉयची समोरासमोर चौकशी
नाशिकमधील बहुचर्चित कॅप्टन खरात प्रकरणात विशेष तपास पथकाचे (SIT) पाश आता अधिक घट्ट होत आहेत. गेल्या तीन दिवसांत खरातची तब्बल २० तास चौकशी करण्यात आली असून, पोलिसांनी खरात आणि त्याचा ऑफिस बॉय नीरज यांची समोरासमोर बसवून उलटतपासणी केली. या चौकशीदरम्यान नीरजकडून सुमारे ४० महिलांचे संपर्क क्रमांक हस्तगत करण्यात आले आहेत. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, नीरजच्या माध्यमातून काही संशयास्पद ‘लँड एजंट’चे क्रमांकही पोलिसांच्या हाती लागले आहेत. आता खरातच्या ‘बड्या भक्तांची’ आणि राजकीय-प्रशासकीय कनेक्शन्सची माहिती मिळवण्यासाठी गृह विभागाची पूर्वपरवानगी घेऊन खरातचा सीडीआर तपासला जाणार आहे. भायखळ्यातील परब आणि पुण्यातील जासूद यांचीही लवकरच एसआयटीमार्फत चौकशी होणार असून, खरातच्या गुन्हेगारी साम्राज्यातील अनेक धक्कादायक गुपिते उघड होण्याची चिन्हे आहेत.
-
भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; आणखी ३ पीडित महिलांकडून तक्रारी
नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची कुंडली आता एसआयटी (SIT) पथकाने पूर्णपणे बाहेर काढली आहे. सुरुवातीला दबून असलेल्या आणखी तीन पीडित महिलांनी पथकावर विश्वास ठेवत खरातविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे, ज्यामुळे खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तपासादरम्यान खरातच्या नावावर तब्बल ५२ मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात त्याने फसवणुकीच्या माध्यमातून कोट्यवधींची माया जमवल्याचा आरोप आहे. यापैकी ११ मालमत्ता पूर्णपणे खरातच्या नावावर असून सिन्नर, गंगापूर आणि नाशिक शहरात त्याचा मोठा जमिनीचा पसारा आहे. विशेष म्हणजे, या जमिनींच्या व्यवहारातील संशयास्पद नोंदी आणि सामाईक सातबाऱ्यांवर काही बड्या शासकीय अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची नावे असल्याची चर्चा आता शहरात रंगली आहे. पोलिसांनी खरातचा जमीन एजंटही ताब्यात घेतला आहे. आता आयकर विभाग या बेनामी संपत्तीचा सखोल तपास करणार आहे.
-
नाशिक: भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आयकर विभागाची एन्ट्री
नाशिकमधील बहुचर्चित भोंदू अशोक खरात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, या गुन्ह्यात आयकर विभागाने (Income Tax) उडी घेतली आहे. विशेष तपास पथकाद्वारे (SIT) खरातच्या कृत्यांचा तपास सुरू असतानाच, आता त्याच्या अवाढव्य मालमत्ता आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली जाणार आहे. खरातने कमावलेल्या उत्पन्नाचे नेमके स्रोत काय? त्याने आयकर विवरणपत्रे (IT Returns) भरली होती का? आणि मोठ्या रकमेच्या व्यवहारांचे ‘लिंकिंग’ कोणाशी आहे, याची सखोल पडताळणी होणार आहे. विशेषतः ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्या, बँक खात्यांमधील हालचाली आणि रोख व्यवहारांची चौकशी आयकर विभागाच्या रडारवर आहे. यामध्ये खरातला आर्थिक मदत करणारे देणगीदार आणि त्याचे व्यावसायिक भागीदार यांचीही चौकशी होण्याची शक्यता असल्याने, खरातच्या आर्थिक जाळ्याचा मोठा पर्दाफाश होण्याची चिन्हे आहेत.
-
नव्या ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न
नागपूर शहरातील रस्ते आता मोकळा श्वास घेणार आहेत. शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने ९ मार्चपासून नवीन ऑटो रिक्षा परवाने देण्यावर स्थगिती आणली आहे. नागपुरात आधीच २३ हजार परवाने वितरित झाले असून, गरजेपेक्षा जास्त रिक्षा उपलब्ध असल्याने केवळ वाहतुकीचा खोळंबा होत नव्हता, तर रिक्षा चालकांच्या दैनंदिन कमाईवरही त्याचा मोठा परिणाम होत होता. मुक्त परवाना पद्धत बंद झाल्यामुळे रस्त्यांवरील गर्दी कमी होऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, या निर्णयाला काही रिक्षा चालक संघटनांनी विरोध दर्शवला असून, आगामी काळात हे निर्बंध शहराच्या वाहतूक चित्रात काय बदल घडवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
राज्यात सध्या अशोक खरात याच्या भोंदूगिरी प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. महिलांची फसवणूक आणि धार्मिक विधींच्या नावाखाली चालणाऱ्या गैरप्रकारांमुळे खरात आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. याच प्रकरणी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर दुसरीकडे जागतिक स्तरावर इराण आणि इस्त्रायल यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. या संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भारतातही लवकरच इंधन संकट ओढवण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या महागाईत भर पडण्याची दाट शक्यता आहे. यासह देश विदेश, मनोरंजन, क्रीडा, क्षेत्रासह राज्यातील ठळक बातम्यांचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचू शकता.
Published On - Mar 22,2026 9:06 AM
