Avinash Jadhav : तुमचे तिकीट वाचवण्यासाठी राज ठाकरेंनी..; अविनाश जाधवांची राणेंवर खरमरीत टीका
Avinash Jadhav Criticized Narayan Rane : नारायण राणे यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून मनसे नेते अविनाश जाधव यांनी राणेंवर चांगलीच आगपाखड केली आहे.
आमची ताकद नाही तर मग नारायण राणे तुम्ही कशाला आमची दखल घेता? मैत्रीला थोडंफार जागा. हेच राज साहेब ठाकरे तुमचे तिकीट वाचवण्यासाठी होते, असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हंटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काहीच ताकद नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तरी काही फरक पडणार नाही. असं माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हंटलं होतं. त्यावर आज अविनाश जाधव यांनी राणेंवर ही खरमरीत टीका केली आहे. तुमच्यासाठी कोकणामध्ये सभा घेतली. सभा घेण्यासाठी तुम्ही राज साहेबांना किती फोन केले मला माहीत आहे, असं म्हणत अविनाश जाधव यांनी राणेंची खिल्ली उडवली.
पुढे बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी ही सभा आवश्यक होती. याचा अर्थात आमची महाराष्ट्रामध्ये ताकद काय हे कोणी सांगायची गरज नाही. दोन्ही भावांची युती व्हावी ही महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील व्यक्तींची इच्छा आहे. दोन्ही ठाकरे बंधू ताकदवान आहेत. ज्या दिवशी दोन्ही भाऊ एकत्र येतील तेव्हा तुम्ही आगीत तेल का टाकलं? असा सवाल भाजपवाले नारायण राणेंना नक्कीच विचारतील, असा मिश्किल टोमणा देखील त्यांनी लगावला आहे.
