Maharashtra Election News LIVE : सिंधुदुर्ग : पाच जिल्हा परिषद गट बिनविरोध
BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates : मुंबईचा महापौर कोण हे जाणून घेण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते, कारण ही निवड लांबणीवर पडली आहे.तर प्रजासत्ताक दिनानंतर नाशिकचा महापौर ठरू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिल आहे. स्वतः मुख्यमंत्रीच नाशिकच्या महापौरांबाबतचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. यासह देश, विदेश, महाराष्ट्रातील महत्वाच्या घडमोडी या ब्लॉगमध्ये दिसभर तुम्हाला वाचायला मिळतील.

सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची महाआघाडी. बीड मोक्क्यातील फरार आरोपी सनी उर्फ शनेश्वर आठवले याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. सोलापूर महापालिकेसाठी आज भाजपच्या गटनेत्याची आज निवड केली जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत गटनेता निवडीबाबत बैठक होणार आहे. मुंबई महापौर पदाची निवड लांबणीनवर पडू शकते. मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. तर या पदासाठी 31 जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया होणार होती. मात्र भाजप आणि शिंदेसेनेने अद्यापही कोकण आयुक्तांकडे गटाची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. यासोबतच निवडणुकीसंदर्भातील इतर अपडेट्स, राज्याभरातील घडामोडी, राष्ट्रीय पातळीवरील बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
LIVE NEWS & UPDATES
-
जालना : शेतकरी अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यात आणखी 4 आरोपींना अटक
जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात झालेल्या शेतकरी अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात आणखी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 जणांना अटक केलं आहे तर उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
-
सांगली : स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे भाजपमध्ये प्रवेश करणार
सांगलीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महेश खराडे यांचा भाजप प्रवेश होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये उद्या सायंकाळी सात वाजता पक्षप्रवेश होणार आहे.
-
-
छत्रपती संभाजीनगर : अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ झाला. श्री क्षेत्र मुरडेश्वर संस्थान येथे मोठे शक्ती प्रदर्शन करत सत्तार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा शुभारंभ करत रणशिंग फुंकले आहे.
-
सिंधुदुर्ग : पाच जिल्हा परिषद गट बिनविरोध
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50 जिल्हा परिषद गटांपैकी पाच जिल्हा परिषद गट बिनविरोध झाले आहेत त्यामुळे महा विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्ष बसविण्यासाठी 26 जागी विजय मिळवणे महत्त्वाचा आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच पाच जागा बिनविरोध झाल्याने महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे.
-
शंकरपटात बैलांना पळवलं तसं सरकारला पळवू – बच्चू कडू
अमरावती: 30 जून पर्यंत जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर राज्यात एकही रेल्वे फिरू देणार नाही असे नेते बच्चू कडू यांनी म्हटले आहे. जर कर्जमाफी झाली नाही तर ज्या प्रकारे शंकरपटात बैलांना पळवलं तसं सरकारला पळवू असा इशाराही कडू यांनी दिला आहे.
-
-
गडचिरोलीतील या नक्षलग्रस्त भागात नागरिक पहिल्यांदाच करणार मतदान
गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात बिनागुंडा गावातील नागरिक पहिल्यांदाच मतदान स्वतःच्या गावी मतदान करतील असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे. लोकसभा आणि विधानसभेत बिनागुंडा गावचे मतदान केंद्र लाहेरी येथे हलवण्यात आले होते, यंदा जिल्हा परिषद निवडणुकीत बिनागुंडा गावातच मतदान होणार आहे.
-
दिल्लीत नाना पटोलेंनी राहुल गांधींची भेट घेतली
काँग्रेस नेते नाना पटोलेंनी राहुल गांधींची भेट घेतली. दिल्लीच्या निवासस्थानी पटोलेंनी सदिच्छा भेट होती. महाराष्ट्रातील विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
-
सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ होणार- मोहिते पाटील
सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपाचा सुपडा साफ होणार, असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. जिल्हा नियोजन समितीचा निधी मिळत नसल्याने कोर्टात जाणार असल्याचं मोहिते पाटलांनी सांगितलं.
-
केडीएमसीतील नॉट रिचेबल 4 नगरसेवकांची मिसिंग तक्रार
केडीएमसीतील नॉट रिचेबल चार नगरसेवकांची ठाकरे सेनेकडून मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटव्ही, कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपासाची मागणी करण्यात आली आहे. बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
-
धाराशिवमध्ये जिल्हापरिषद निवडणुकीत महायुतीत तणाव
धाराशिवमध्ये जिल्हापरिषद निवडणुकीत महायुतीत तणाव कायम आहे. यशवंत सेना आणि अपक्ष उमेदवाराला तानाजी सावंत यांचा पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सावंत यांचे अप्रत्यक्षपणे भाजपाविरोधात लढण्याचे संकेत दिले आहेत.
-
शंकराचार्यांनी बनावट सनातनींचा पर्दाफाश केला आहे: अखिलेश यादव
सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्याबाबत एक मोठे विधान केले आहे. अखिलेश यादव म्हणाले, “शंकराचार्य खंबीरपणे उभे आहेत याचा मला आनंद आहे. देशातील प्रत्येक सनातनी त्यांच्यासोबत आहे. शंकराचार्यांनी बनावट सनातन्यांना उघड केले आहे.”
-
पिंपरी चिंचवड महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
पिंपरी चिंचवडचा महापौर 6 फेब्रुवारीला खुर्चीवर विराजमान होणार, हे कालचं स्पष्ट झालं होतं. आता आज या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. त्यानुसार 2 फेब्रुवारीच्या दुपारी 3 ते 5 वाजेच्या दरम्यान अर्ज दाखल करायचे आहेत. मग 6 फेब्रुवारीच्या सकाळी 11 वाजता सर्व साधारण सभा होईल. या सभेत महापौर आणि उपमहापौर पदावर शिक्कामोर्तब होईल.
-
मीरा भाईंदर महापालिकेत सेना काँग्रेस एकत्र- सरनाईक
मीरा भाईंदर महापालिकेत सेना काँग्रेस एकत्र. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भाजपला यश आले आहे. त्यांना यश आले असताना आम्हाला विरोधात बसावे लागेल. सदस्य संख्या कमी असल्यामुळे मीरा भाईंदर विकास आघाडी स्थापन केली. काँग्रेसचे नगरसेवक आणि शिवसेना एकत्र आले. यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी ही आघाडी स्थापन केली आहे असं ठाणे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
-
बीड – GST विभागातील अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणातील मोठी अपडेट समोर
बीडच्या GST विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांचा 16 जानेवारी रोजी धुळे-सोलापूर महामार्गालगत उभ्या असलेल्या एका कारमध्ये मृतदेह आढळून आला. यामध्ये अनेक संशयास्पद वस्तू आढळून आल्या होत्या. यामध्ये कारच्याखाली आणि कार मध्ये मडके आणि त्यामध्ये कोळसा तसेच मडक्याच्या खाली ठेवलेले काही दगड मिळून आले होते. ज्या गाडीमध्ये सचिन जाधवर यांचा मृतदेह आढळला त्यामध्ये काही प्रमाणात सीटवर रक्त देखील पडलेले होते. यातील रक्ताचे नमुने आणि कार वरील हाताचे ठसे देखील फॉरेन्सिक टीमने घेतले आहेत. दरम्यान पत्नी मयुरी जाधवर यांच्या फिर्यादीवरून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातला तपास सुरू असून मोठी गुप्तता बाळगली जात आहे.
-
जालन्यात गोळ्या घालून तरुणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक
जालन्यात गोळ्या झाडून तरुणाची हत्या करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलय.कदिम जालना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.अजय विजय अमलेकर आणि अमन शैलेंद्र ढिल्लोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.काल रात्रीच्या सुमारास चरण प्रल्हाद रायमल (वय 27 वर्ष) हा तरुण आपल्या बुलेट गाडीवरून घाटी रोड परिसरातून जात असताना, स्कुटीवरून आलेल्या अजय अमलेकर व अमन ढिल्लोड यांनी त्याच्यावर गोळीबार केला.या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या चरणचा मृत्यू झाला.या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. दरम्यान,आरोपी जालन्यातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे कदिम जालना पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करत दोन्ही हल्लेखोरांना अटक केलय.पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ
सोन्याच्या दरात 2 हजार 200 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 15 हजार रुपयांची वाढ
सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 61 हजार 916 रुपयांवर
चांदीचे दर जीएसटीसह 3 लाख 50 हजार 200 रुपयांवर पोहोचले
-
अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत माशी
अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत माशी
नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा गावातील धक्कादायक प्रकार
अंगणवाडीत येणाऱ्या आदिवासी बालकांच्या जीवाशी खेळ
ग्रामस्थांकडून संताप
-
कमाल आर खानला गोळीबार प्रकरणात 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
कमाल आर खानला गोळीबार प्रकरणात 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
वांद्रे हॉलिडे कोर्टाने दिली पोलीस कोठडी
कमाल खानने दोन राऊड फायर केले मात्र एकच काडतूस सापडलं
गोळीबार करण्यामागचं कारण अजून स्पष्ट नाही, चौकशी करायची आहे, पोलिसांची कोर्टात माहिती
कमाल खान यांच्या वकिलांचा अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याचा न्यायालयात दावा
-
कुंभमेळा कामकाजावर साधू महंत नाराज
कुंभमेळा कामकाजावर साधू महंत नाराज थोड्या वेळात पत्रकार परिषद घेऊन करणार भूमिका स्पष्ट
त्र्यंबकेश्वरमध्ये साधू महंत आणि आखाडा प्रमुख घेणार पत्रकार परिषद
त्र्यंबकेश्वरमध्ये साधू महंत आणि आखाडा प्रमुख काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष
-
ठाण्यातील उपवन आर्ट फेस्टिवल कधी होणार सुरु?
येत्या शुक्रवारी 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत उपवन आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे. अनेक मराठी आणि हिंदी कलाकार या फेस्टीवलला हजेरी लावणार आहेत. ठाण्यात विठ्ठल वारी थीम ठेवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या उत्सवाला हजेरी लावणार आहेत.
-
डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचा वळसा
पालिकेची कारवाई होत नसल्याने डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी फुटपाथवर पुन्हा कब्जा केल्याचे पाहायला मिळत आहे. डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात फुटपाथवर अतिक्रमण केले आहे. सकाळपासूनच स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची वाढलेली गर्दी नागरिकांच्या त्रासाला कारणीभूत ठरत आहे.
-
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आले आहे. वाहनांच्या चार ते पाच किमी पर्यंत रांगा पहायला मिळत आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे वाहनांच्या रांगाच रांगा. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून प्रयत्न सुरू
-
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत दाखल
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अमरावतीच्या शासकीय विश्राम गृह याठिकाणी जनता दरबार सुरू आहे. त्यासाठी ते अमरावतीमध्ये दाखल झाले आहेत. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन याठिकाणी जिल्हा नियोजन समितीची सभा होणार आहे.
-
उमरगा पंचायत समितीच्या निवडणुकीत चुरस
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील पंचायत समितीला अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागेवर सर्वाधिक १८ उमेदवार भुसणी गणातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी सभापती कैलास शिंदे यांच्यासह मातब्बर उमेदवार भूसणी गणातून निवडणूक आखाड्यात आहेत. उमरगा पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आल्याने इच्छुकांची गर्दी ,मातब्बर उमेदवार रिंगणात असल्याने लढत चुरशीची होणार आहे.
-
जगदीश गुप्तांबाबत एकनाथ शिंदे निर्णय घेतील-अभिजीत अडसूळ
जेव्हा शिवसेना-भाजपची युती झाली होती तेव्हा माजी मंत्री जगदीश गुप्ता शिवसेनेला जय श्रीराम करून निघून गेले होते.पण एकनाथ शिंदे सात तारखेला अमरावती मध्ये आले होते तेव्हा त्यांच्याकडे जाऊन समजून काढून घेऊन आले.स्टेजवर सुद्धा बसले आणि काम करण्यासाठी त्यांना कन्व्हेन्स केलं. परंतु दिवसा दुसरा दिवसापासून शिवसेनेच्या लोकांचा प्रचार सोडून रवी राणांसोबत सभा मध्ये प्रचार मध्ये फिरत होते. त्यांनी स्वतः अपक्ष उमेदवार उभे केले होते त्यांच्यासाठी प्रचार करत होते. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवारांना मोठा फटका बसला. सगळ्या उमेदवारांची तक्रार आमच्याकडे आले. याबाबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आणि एकनाथ शिंदे याच्यावर निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया अभिजीत अडसूळ यांनी अमरावतीत दिली.
-
दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचा प्रस्ताव पाठवा-मनीषा कायंदे
मुंबई मनपात दोन्ही शिवसेना एकत्र यावं असं जर उद्धव ठाकरे यांच्या गटाला वाटत असेल तर त्यांनी तसा प्रस्ताव शिवसेनेला पाठवावा. एकनाथ शिंदे यावर योग्य तो निर्णय घेतील, असे मनीषा कायंदे म्हणाल्या. तुम्ही गेले ३ वर्ष निव्वळ टिका करत आहात, ते विकासाचं राजकारण करत आहेत. तुमेही टोमणे मारतात. विकासाचा अजेंडा काय आहे? भास्कर जाधवांनी जे वक्तव्य केलं ते उद्धव ठाकरे यांच्या सहमतीने केलं का? तसा प्रस्ताव त्यांनी शिंदेंना पाठवावा… तुम्ही कांग्रेस सोबत गेलात आणि मुख्यमंत्री बनलात असा टोलाही त्यांनी लगावला.
-
आता औरंगाबाद विमानतळाचे नावही छत्रपती संभाजीनगर विमानतळ
औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर आता हळूहळू सर्व शासकीय व केंद्रीय यंत्रणांकडून या नामकरणाची अंमलबजावणी होताना दिसत आहे. रेल्वे स्टेशन आणि विमानतळ यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांचे नामकरण केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने या प्रक्रियेला काहीसा कालावधी लागला होता. मात्र काही दिवसांपूर्वी औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नामकरण अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन असे करण्यात आले. त्यानंतर आता औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर विमानतळ करण्यात आले असून, त्यासंबंधी फलक लावण्याचे काम सुरू झाले आहे.
-
आयुक्तांच्या दालनात कुत्री सोडू
सांगलीवाडीत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. गावातील जेष्ठ नागरिकांनी सकाळच्या वेळी फिरणे बंद केले आहे. शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांवर देखील हल्ल्याचा प्रयत्न होत आहे. आयुक्तांनी तातडीने भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा, अन्यथा आयुक्तांच्या दालनात कुत्री सोडू, वेळ प्रसंगी जनहित याचिका दाखल करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नूतन नगरसेवक अभिजीत कोळी व काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी दिला आहे.
-
किरीट सोमय्या मुंब्रा पोलीस ठाण्यात
Mim चे मुंब्रा भागातील निवडून आलेली नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्या बाबत भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा मुंब्रा पोलिस ठाण्यात भेट देणार आहेत. सहर शेख यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी मुंब्रा वरिष्ठ पोलिस पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांना भेटणार आहेत. संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार असे निवडून आल्यावर सहर शेख यांनी वक्तव्य केले होते.
-
नीलम गोऱ्हे यांनी घेतली जखमी शिंदे गटातील नगरसेवक मोहन चतुरे यांची भेट
बदलापुरात डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली जखमी शिंदे गटातील नगरसेवक मोहन चतुरे यांची भेट. नीलम गोऱ्हेंकडून चतुरे यांच्या तब्येतीची विचारपूस. कॉम्प्रोमाइजसाठी भाजपकडून दबाव असं गोऱ्हे म्हणाल्या. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष बंटी म्हसकर आणि त्यांच्या साथीदारांनी केली होती मारहाण.
-
केईएम हॉस्पिटलचे नाव बदलण्यावरून वाद
मुंबईचे प्रसिद्ध केईएम हॉस्पिटलचे नाव बदलण्याच्या पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद पेटला आहे. खासदार अमोल कोल्हे, जे केईएमचे माजी विद्यार्थी आहेत, यांनी लोढा यांना हॉस्पिटलचा इतिहास अभ्यासावा आणि मगच असे वक्तव्य करावे, अशी टीका केली आहे.पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकत्याच केईएमच्या शताबदी वर्षांच्या समारंभात ‘किंग एडवर्ड’ हे नाव ब्रिटिश राजवटीचे प्रतीक असल्याने बदलावे, असे सुचवले.
-
सहर तरुण असल्यामुळे आम्ही पण तिचा माफीनामा स्वीकारला – किरीट सोमय्या
एमआयएमच्या सहर शेख यांनी आता माफी मागितली आहे. आम्ही मुंब्र्याला हिरवं बनवणार म्हणजे हिंदुंना भडकवणारी, चिथावणीखोर भाषण. आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोनदा त्यांना बोलावलं होतं. लिखित स्वरूपात सहरने माफी मागितली आहे. सहर तरुण असल्यामुळे आम्ही पण तिचा माफीनामा स्वीकारला आहे असं किरीट सोमय्या म्हणाले.
-
वसई विरार महापालिकेत भाजपाचा गटनेता गुलदस्त्यात
वसई विरार महापालिकेत भाजपाचा गटनेता अद्याप ही गुलदस्त्यात. निवडणुकीच्या निकाल लागून 8 दिवस संपले तरी भाजपाच्या गटनेता ठरेना. पक्ष आदेशावरून दोन दिवसात आमचा गटनेता ठरेल आमदार राजन नाईक यांची माहिती. वसई विरार महापालिका निवडणुकीत भाजपाचे 43 आणि शिंदे शिवसेनेचा 1 असे महायुतीचे 44 नगरसेवक निवडून आलेले आहेत.
-
चंद्रपुरात वाद नव्हताच त्यामुळे मिटण्याचा प्रश्नच नाही – हर्षवर्धन सपकाळ
चंद्रपुरात वाद नव्हताच त्यामुळे मिटण्याचा प्रश्नच नाही. चंद्रपुरात कुठल्याही मुद्यावर वाद विकोपाला गेलेलेा नाही. आमचे 27 नगरसेवक एक संघ आहेत आणि काँग्रेसचाच महापौर चंद्रपूरला बसेल. मीटिंगमध्ये कुटुंबात ज्याप्रमाणे चर्चा होते, त्याप्रमाणे चर्चा झाली असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भाजपाची कोअर कमिटीची बैठक
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भाजपाची कोअर कमिटी बैठक होत असून, महापालिकेतील गटनेत्याच्या निवडीवर चर्चा होणार आहे. गटनेत्याचे नाव आजच प्रदेश नेतृत्वाकडे पाठवले जाणार असून, मंगळवारपर्यंत निवड निश्चित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापौर पदासाठी भाजपामध्ये उत्सुकता वाढली असून, ५७ पैकी १२ संभाव्य नावांमधून एक नाव अंतिम केले जाणार आहे. महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने, त्याच प्रवर्गाचा उमेदवार द्यावा, अशी मागणी पक्षाकडे करण्यात आली आहे, असे किशोर शितोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी म्हटले
-
सांगलीतील नर्सरीला लागलेल्या आगीत महिलेचा संशयास्पद मृत्यू
सांगली शहरातील धामणी चौक येथे असणाऱ्या मयूर नर्सरीमध्ये लागलेल्या आगीमध्ये होरपळून महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. निकिता शिव मनगुळे-लोंढे असे आगीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. निकिता मनगुळे-लोंढे व तिचा पती कर्नाटकातील कागवाड येथील असून ते सध्या सांगली शहरातील धामणी चौकातील मयूर नर्सरीमध्ये राहण्यास होते.
-
प्रजासत्ताक दिनानंतर ठरणार नाशिकचा महापौर ?
स्वतः मुख्यमंत्रीच घेणार नाशिकच्या महापौरा बाबतचा निर्णय. प्रजासत्ताक दिनानंतर राजकीय हालचालींना येणार वेग. गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार अंतिम निर्णय. महापौर पदासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू. मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेतील महापौर पदाच्या निवडी झाल्यानंतरच नाशिकचा नंबर लागण्याची शक्यता
-
त्याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही- संजय राऊत
सोलापूरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र लढत असल्याबाबतची माझ्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट सांगताना संजय राऊत दिसले आहेत.
-
सध्याच्या राजकारणात गुलामांचा बाजार भरला- संजय राऊत
संजय राऊत यांनी नुकताच टीका करत म्हटले की, सध्याच्या राजकारणात गुलामांचा बाजार भरला आहे. सध्याच्या राजकीय स्थितीवर बोलताना त्यांनी हे भाष्य केले.
-
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इथेनॉल टँकरला अपघातानंतर आग
धधुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या गेवराई शहराजवळ इथेनॉल टँकरला भीषण अपघातानंतर मोठी आग लागली. मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात टँकर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. इथेनॉलने पेट घेतल्याने मोठी आग लागली.
-
पुण्याचा महापौर कोण ? कधी होणार निर्णय ?
पुण्याचा महापौर कोण? हे पुढील काही दिवसांमध्ये ठरणार आहे. गेल्या 4 वर्षांपासून पुण्यातील महापौर बंगला वापरात नव्हता. आता सर्वसाधारण महिला आरक्षण पडले असून, महापौर निवडीनंतर या ठिकाणी नवीन महापौर राहण्यास येणार असल्याने डागडुजीचे, स्वच्छता काम सुरू करण्यात आले आहे.
-
विरारमध्ये मुलं चोरीच्या अफवातून संतप्त जमावाने चार महिलांना केली बेदम मारहाण
विरारमध्ये मुलं चोरीच्या अफवातून संतप्त जमावाने चार महिलांना बेदम मारहाण केल्याची घटना उघड झाली आहे . विरार पूर्व सहकार नगर रिक्षा स्टॅण्ड जवळ गुरुवारी सकाळी आकाराच्या सुमारास ही घटना घडली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला . विरार पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करून, मारहाण झालेल्या महिलांना ताब्यात घेऊन त्यांची जमवातून सुटका केली .
-
माय – लेकीच्या आंघोळीचा चोरून व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
जळगावात माय-लेकीच्या आंघोळीचा चोरून व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरुषोत्तम कुटे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून पत्र्याला छिद्रे पाडून त्या छिद्रांमधून त्याने महिला व मुलीचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध पोलिस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
-
नाशिक – फर्निचरच्या दुकानाला भीषण आग
नाशिकच्या सातपूरमध्ये केवल पार्क परिसरात फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे. सुदैवाने आगीत कोणीतीही जीवितहानी नाही. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश.
-
डेटिंग ॲपच्या जाळ्यात अडकवून तरुणांना लुटणारी टोळी गजाआड
डेटिंग अॅपवर ओळख वाढवून तरुणांना धमकावून लुटणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून मोबाइल, दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.
-
जालन्यात भर दिवसा आईस्क्रीम विक्रेत्याचे अपहरण
जालन्यात आईस्क्रीम विक्री करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून त्याला झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्याकडून 20 हजारांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 3अज्ञातांविरोधात तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी
सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची महाआघाडी केली आहे. विशेष म्हणजे भाजपविरोधात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी मिळून महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मेळाव्याला येण्याचे आवाहन केलं आहे. या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.
Published On - Jan 24,2026 9:02 AM
