Maharashtra Breaking News LIVE 30 January 2025 : राज ठाकरे उशीरा का होईना पण सत्य बोलले – अरविंद सावंत
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 30 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

जिल्ह्य नियोजन समितीच्या बैठकीसाठी अजित पवार आज बीडमध्ये आहेत. त्याआधी ते बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात गेले. तिथे त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. अक्षय शिंदेला नराधम म्हणणाऱ्या दोन नेत्यांना अक्षय शिंदेच्या वकिलांनी पाठवली नोटीस. आमदार योगेश कदम आणि संजय शिरसाठ यांना पाठवली नोटीस. न्यायालयाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आमदार योगेश कदम आणि संजय शिरसाठ यांच्यावर आरोप. बेपत्ता शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश. पाच संशयित फरार आरोपींपैकी 2 आरोपी राजस्थानला पळून गेल्याची माहिती. शोधासाठी पोलिसांची पथकं परराज्यात दाखल. धोडी यांचा घातपात करून संशयित आरोपी राजस्थान येथे पळून गेल्याचा पोलिसांचा अंदाज. ठाणे जिल्ह्यात एसटीच्या प्रवासी वाहतुकीला बळ. महामंडळाच्या ताफ्यातील गाड्यांची 577 संख्या झाली.
LIVE NEWS & UPDATES
-
मुलीवर झालेली काळी जादू काढतो म्हणत महिलेला लाखो रुपयांचा गंडा, पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुण्यात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीवर झालेली काळी जादू काढतो म्हणत एका महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. भोंदू बाबाने या महिलेला 29 लाखांचा गंडा घातला आहे. ही महिला पुण्यातील बालेवाडी भागात राहाणारी असून या अंधश्रद्धेमुळे ज्येष्ठ महिलेची लाखोंची फसवणूक झाली आहे. फसवणूक झालेल्या महिलेने पोलिसांत तक्रार दिली असून पुढील तपास सुरु आहे.
-
शेगांव केस गळती प्रकरणात ICMR चा अहवाल प्राप्त होणार; केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांची माहिती
बुलढाण्यातील शेगांव केस गळती प्रकरणात आय सी एम आरचा अहवाल प्राप्त होणार आहे. केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी माहिती दिली आहे. आज नागपूर एम्सची टीम शेगाव तालुक्यात गावा गावात सर्वे करीत आहे. मात्र आता येथील नागरिकांना केस गळती होऊन टक्कल पडल्याच्या समस्येनंतर आता डोळ्याची समस्या होत असल्याची ग्रामस्थांची माहिती आहे. तसेच या आजाराचेही निदान झाल्या नंतरच योग्य ते औषध उपचार देता येतील अस नागरिकांना सांगण्यात आलं आहे.
-
-
राज ठाकरे उशीरा का होईना पण सत्य बोलले – अरविंद सावंत
उशिरा का होईना राज ठाकरे सत्य बोलले, आम्ही बोललो तर आम्हाला राजकीय राजकीय म्हणतात असे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहेत
-
भाजपा आमदार सुरेश धस अंतरवालीमध्ये येणार
भाजपाचे आमदार सुरेश धस आल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील आपली भूमिका मांडणार आहेत.आमदार सुरेश धस सरकारचा संदेश घेऊन येणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. बीड DPDC ची बैठक झाल्यानंतर आमदार सुरेश धस अंतरवाली येथे येणार आहेत.
-
सुर्यवंशी आणि वाकडे कुटुंबियांना न्याय देण्यासाठी परभणीत वंचितचा मोर्चा
सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकडे कुटुंब यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणीत वंचित बहुजन आघाडीचा आज विराट मोर्चा काढण्यात येणार आहेत.
-
-
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला धक्का
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला झटका लागला आहे. पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे नगरसेवक फुटले आहेत. चंदीगड महानगरपालिकेत भाजपचा महापौर झाला आहे. आम आदमी पक्षाचा उमेदवार पराभूत झाले आहेत. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे 19 नगरसेवक असूनही उमेदवार पराभूत झाला आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांना याबाबत विशेष जबाबदारी देण्यात आली होती. गतवर्षीच्या चंदीगड महापौर निवडणुका वादग्रस्त ठरल्या होत्या. निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करून सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या विजयी उमेदवाराची निवडणूक अवैध ठरवली होती.
-
कल्याण एपीएमसीवर भाजपची सत्ता; दत्ता गायकवाड यांची सभापतीपदी बिनविरोध निवड
कल्याण एपीएमसीवर भाजपने आपली सत्ता स्थापित केली आहे. भाजपचे दत्ता गायकवाड पहिल्यांदाच महायुतीमधील सभापती म्हणून बिनविरोध निवडले गेले. त्यांच्या निवडीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि जल्लोषाचे वातावरण आहे.
-
बीडच्या बदनामीवरुन डीपीडीसीच्या बैठकीत बाचाबाची : खासदार बजरंग सोनवणे
बीडच्या बदनामीवरुन डीपीडीसीच्या बैठकीत बाचाबाची झाल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली. डीपीडीसीची बैठक पार पडल्यानंतर खासदारांनी याबाबत माहिती दिली. धनंजय मुंडे, सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांच्यात बाचाबाची झाली. दहशतीच्या मुद्द्यावरुन बाचाबाची झाली, असंही खासदारांनी सांगितलं.
-
भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना सोबत घेतलं आणि पदं दिली : राज ठाकरे
राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यातून राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केलं. राज ठाकरे यांनी मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना सोबत घेतलं आणि पदं दिली. भाजपने आरोप केलेले सर्व जण हे भाजपसोबत आण मंत्रिमंडळात आहेत.
“तसेच 70 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना आत टाकू असं मोदी म्हणालेले. मात्र आम्हाला माहिती नव्हतं की मोदी त्यांना मंत्रिमंडळात टाकतील”, असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला.
-
मनसेने केलेली कामं, आंदोलनं लोकांसमोर मांडत रहा : राज ठाकरे
लोकांनी आपल्याला मतदान केलं, पण ते आपल्यापर्यंत आलं नाही. लोकांनी आपल्याला मतदान केलं ते गायब झालं, असं मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वरळीतील एका कार्यक्रमात म्हटलं. तसेच यावेळेस राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आपण केलेलं काम लोकापर्यंत पोहचवा अशा सूचना केला. मनसेने केलेली कामं, आंदोलनं लोकांसमोर मांडत रहा, असं राज ठाकरे म्हणाले.
-
अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या- राज ठाकरे
“तुम्ही कुठे मनात धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं. पण केलेलं मतदान कुठे तरी गायब झालं. अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या,” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
-
महाराष्ट्रात निकाल लागल्यावर पहिल्यांदा सन्नाटा पसरला- राज ठाकरे
“निवडणुकीचा निकाल लागल्यावर बरेच लोक भेटले. ज्या दिवशी निकाल लागला, मी बोलतो ते तुम्हाला समजत असेल. तुम्हाला माहीत आहे. महाराष्ट्रात निकाल लागल्यावर पहिल्यांदा सन्नाटा पसरला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता, मिरवणुका काय सगळं… सन्नाटा. कारण लोकांमध्येच संभ्रम होता. असा कसा निकाल लागला,” असं राज ठाकरे म्हणाले.
-
‘छावा’ या चित्रपटाच्या ट्रेलरवरून सुरू असलेल्या वादावर राज ठाकरे काय म्हणाले?
‘छावा’ या चित्रपटाच्या ट्रेलरवरून सुरू असलेल्या वादावर राज ठाकरे म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट काढणारे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर परवा माझ्याकडे आले होते. ते उत्तम दिग्दर्शक आहेत. मी काही त्याचा डिस्ट्रिब्युटर नाही. पण महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे. कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे, छत्रपती संभाजीराजे आमचे हे बलिदान आहे.”
-
मी शांत आहे, याचा अर्थ विचार करत नव्हतो असं नाही- राज ठाकरे
“बऱ्याच दिवसाने आपण भेटतोय. निकाल लागले. त्यावर मी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर मी काही बोललो नव्हतो. पण शांत आहे, याचा अर्थ विचार करत नव्हतो असं नाही. सर्व गोष्टींचं विवेचन सुरू होतं. आकलन सुरू होतं. बरेच लोकं मला भेटले,” असं राज ठाकरे म्हणाले.
-
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत देवेंद्र फडणवीसांची भूमिका काय?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ते त्यांच्या कामाने आले होते. मी माझ्या कामाला आलो होतो. ते आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायला चोरी नाही. त्यांच्या राजीनाम्याबाबत जी भूमिका अजित पवार यांनी मांडली तीच आमची भूमिका आहे.”
-
उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“ती लग्नात भेट झाली, लग्नात भेटल्यावर युती होते हा विचार डोक्यात येतो, हे मनातून काढून टाका,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या भेटीबद्दल ते बोलत होते.
-
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय पथक उपोषणस्थळी दाखल
जालना, अंतरवाली सराटी- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय पथक उपोषणस्थळी दाखल झालंं. मनोज जरांगे पाटील हे आज उपोषण सोडण्याची शक्यता आहे, तत्पूर्वी जारांगे पाटील मराठा समाजाशी संवाद साधतील. तसंच आज मराठा आरक्षण आंदोलनाची नवी दिशा ठरवणार आहेत.
-
एनटीसी गिरण्यांच्या थकीत पगारासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाकडून आंदोलन
एनटीसी गिरण्यांच्या थकीत पगारासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाकडून आंदोलन करण्यात येत आहे. एनटीसीच्या कार्यालयात राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत आंदोलन सुरु आहे. मुंबईतील एनटीसीच्या चार बंद गिरण्यांतील कामगारांना महिनोंमहिने थकीत पगार मिळत नसल्याने आंदोलन सुरु आहे. संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे.
-
पुरावे दिले, आता राजीनामा घ्या- अंजली दमानिया
ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये पहिलंत तर पुरावे दिलेत ते अतिशय स्ट्रॉंग पुरावे आहेत. तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. तो ताबडतोब घ्या. बीडमध्ये असताना तुम्ही घेतलात तर लोकांचा तुमच्यावर विश्वास बसेल की तुम्ही जे बोलताय ते खरं बोलताय, उगाच बोलत नाही, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
-
DPDC बैठकीपूर्वी अंबादास दानवे संतापले
माजी पालकमंत्री आमदार अब्दुल सत्तार डीपीडीसी बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तर गंगापूरचे आमदार प्रशांत बंब पाय फ्रॅक्चर असतानाही दाखल झाले. यावेळी अधिकाऱ्यांना आणि महत्त्वाच्या व्यक्तींना प्रवेश न दिल्याने अंबादास दानवे संतापले
-
अन् डीपीडीसी बैठकीत पसरली स्मशान शांतता
आमदार सुरेश दस यांनी ,धनंजय मुंडे पालकमंत्री असताना झालेला घोटाळा याबाबतचे पुरावे पेन ड्राईव्ह मध्ये अजित पवारांकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुरावे सादर करताच सभागृहामध्ये शांतता पसरली. अजित पवार मोठ्या आवाजात बोलताच सभागृात कमालीची शांतता पसरली.
-
अमित शाह यांच्यावर राऊतांची आगपाखड
आम्ही २५ वर्ष अत्यंत चांगलं काम केलं. नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही उत्तम काम केलं. पण सर्वांना माहीत आहे. दिल्लीत अमित शाह यांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट आलं. हे दुर्देवाने सांगावंसं वाटतं, असा आरोप संजय राऊत यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याबद्दल आभारी आहे, असे ते म्हणाले.
-
कार्यकर्ते आणि पीए ला ही DPDC मध्ये बंदी
नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जाण्यास आमदारांच्या कार्यकर्ते आणि पीए ला ही DPDC मध्ये बंदी घातल्याचे समोर आले. कडेकोट पोलीस बंदोबस्त, शासकीय अधिकार्यांनाही चेकिंग करून सोडले जात आहे. नियोजन समितीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. आमदारांचे पीए यांना डी झोनमध्ये थांबवण्यात आले आहे.
-
DPDC मध्ये केवळ आमदार, खासदार यांनाच प्रवेश
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन सभेची बैठक सुरू आहे. या बैठकीला केवळ आमदार, खासदार यांनाच प्रवेश देण्यात आला आहे. यंदाच्या बैठकीला जिल्हा नियोजन समितीमधील इतर निमंत्रित सदस्यांना आज बैठकीचे निमंत्रण नाही.
-
संजय राऊतांचा भाजपावर घणाघात
भाजपचे नेते आमच्या संपर्कात. संघाचे नेते आमच्या संपर्कात. आमची चर्चा होते. युती तुटल्याचं त्यांना दु:ख आहे, असे संजय राऊत म्हणाले. आम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं नाही. आम्हाला उपमुख्यमंत्रीपदही दिलं नाही. कारण भाजपच्या मनात खोट होती. खासकरून अमित शाह याच्या मनात खोट होती. त्यांना आमची पार्टी फोडायची होती. अमित शाह यांनी होऊ दिलं नाही. कारण त्यांचे आर्थिक हितसंबंध मुंबईत होते. मात्र शिवसेना असेपर्यंत ते होणार नव्हतं, असे ते म्हणाले.
-
पुणे जिल्हा नियोजन समितीबाबत महत्वाची बातमी, नामनिर्देशीत सदस्याच्या समितीमध्ये शिवसेना आमदारांना डावललं
पुणे जिल्हा नियोजन समितीबाबत महत्वाची बातमी, नामनिर्देशीत सदस्याच्या समितीमध्ये शिवसेना आमदारांना डावलण्यात आलं आहे. सदस्यपदी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सरकारने काढलेल्या जीआरचा अभ्यास करून भाष्य करणार, अशी प्रतिक्रिया शिवतारे यांनी दिली आहे.
-
राज्य सरकारने सुरू केलेल्या ओबीसी वसतिगृहातील विद्यार्थी भोजन- निर्वाह भत्त्यापासून वंचित
चंद्रपूर: राज्य सरकारने सुरू केलेल्या ओबीसी वसतिगृहातील विद्यार्थी भोजन- निर्वाह भत्त्यापासून वंचित आहेत . चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी मुलांच्या वसतिगृहात सध्या 40 विद्यार्थी असून वसतिगृहाच्या स्थापनेपासून पाच महिने लोटूनही मुलांना डीबीटी रक्कम मिळाली नाही. प्रत्येक मुलाची 25 हजार रुपये रक्कम शासनाकडे थकीत असून ओबीसी नेत्यांनी या प्रश्नी 5 फेब्रुवारी रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
-
अमित शाहांना बाळासाहेबांची शिवसेना फोडायची होती – संजय राऊत
भाजप शिवसेना 25 वर्षांची युती तोडण्यासाठी भाजपचे काही नेते जबाबदार. अमित शाहांना बाळासाहेबांची शिवसेना फोडायची होती, फायद्यासाठी त्यांनी शिवसेना फोडली – संजय राऊत यांचा आरोप.
-
एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज आमने सामने येण्याची शक्यता
एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज आमने सामने येण्याची शक्यता आहे. मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची आज कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिलीच बैठक असून या बैठकीसाठी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
-
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कर्मचाऱ्याने संपवलं जीवन
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्र विभागातील कर्मचारी ऋतिक कदम याने संपवलं जीवन. पंढरपूर शहरातील यमाई तलावात रात्री उशिरा उडी मारुन संपवलं जीवन. शुभम जाधव या त्याच्या मित्राच्या समोरच यमाई तलावात उडी मारली. ‘मित्र माझ्या मदतीला येत नाहीत, मी सगळ्यांच्या मदतीला जातो’ असे शुभम जाधव याला सांगत अचानक ऋतिक कदम याने तलावात उडी मारुन संपवलं जीवन.
-
अहिल्यानगर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का
12 माजी नगरसेवकांसह पदाधिकारी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. नगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून 20 ते 30 गाड्या घेऊन शिवसैनिक मुंबईकडे रवाना. खासदार संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन सर्व शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना सोडण्याचा निर्णय. आठ दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज अखेर प्रवेशाची तारीख ठरली. याआधी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मन धरणीचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी केलेला प्रयत्न निष्फळ ठरला.
-
ठाण्यात चार बांगलादेशी महिलांना अटक
उथळसर भागात ठाणे महापालिकेच्या पुनर्वसन चाळीमध्ये भाड्याने वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना ठाणे गुन्हे अन्वेक्षण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांना भाड्याने घर उपलब्ध करून देणाऱ्या घर मालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
-
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारी सादर होणार. आयुक्त आणि प्रशासक म्हणून भूषण गगराणी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पर्यावरण, प्रदूषण ,बेस्टसाठी ठोस उपाययोजना करण्याची शक्यता. मुंबईकरांवर नवीन कर लागण्याची शक्यता.
-
मनोज जरांगे पाटील आज उपोषण सोडणार का?
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा आज उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जरांगे पाटील उपोषण सोडण्याबाबत दुपारी दोन वाजता समाजसोबत चर्चा करून निर्णय घेणार आहेत. काल मध्यरात्री भाजपा आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये भेट झाली आहे. या भेटीत जरांगे यांच्या मागण्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
Published On - Jan 30,2025 9:09 AM
