Maharashtra News LIVE : राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा अगोदरच प्रस्ताव- नाना पटोले
Maharashtra News LIVE : भाजपविरोधात आता काँग्रेस अधिक मजबूत करण्याची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी आणि इतर घटक पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेने जोर धरला आहे. आता राज्याला मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
ऑनलाइन पासचे संकेतस्थळ बंद; भीमाशंकरचे दर्शन कसे होणार?
श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर १५ जूनपासून भाविकांसाठी खुले होणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली आहे. मात्र, मंदिरात दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली असताना त्यासाठीचे संकेतस्थळ अद्याप कार्यान्वित झाले नसल्याने हजारो भाविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, नोंदणीची प्रक्रिया सुरू न झाल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
-
पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला थोड्याच वेळात होणार सुरुवात होत आहे. काल रात्रीपर्यंत तरी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. आमदार रोहित पवारांच्या आंदोलनाचा निरोप जिल्ह्यातील शरद पवार पक्षाच्या आमदारांना नाहीच. राष्ट्रवादी शरद पवार पक्षात विसंवाद दिसून येत आहे. आमदार उत्तम जानकर आणि आमदार अभिजीत पाटलांना आंदोलनाची माहितीच नाही…
-
-
धाराशिव जिल्ह्यातील १२८ गावात जूनमध्येही टंचाईची झळ, १२ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा
जून महिना अर्धा संपत आला तरी धाराशिव जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट कायम आहे. जिल्ह्यातील तब्बल १२८ गावांना आणि १२ ठिकाणच्या वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून २०८ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. अनेक प्रकल्प कोरडे पडल्याने उपलब्ध पाणीसाठा केवळ १२.३७ टक्क्यांवर आला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाला ४४ प्रकल्पांमधील पाणी राखीव ठेवावे लागले आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी जिल्ह्यात समाधानकारक तसेच काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी राहील, अशी अपेक्षा होती. मात्र दीर्घ कोरडा कालावधी, वाढता पाणी उपसा आणि भूजल पातळीत झालेली मोठी घट यामुळे टंचाई निर्माण झाली आहे.धाराशिव तालुक्यात सर्वाधिक विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा असतानाही जिल्ह्यातील अनेक गावांना अजूनही टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असल्याचे वास्तव आहे
-
महागाईविरोधात मनसेचा हिंदी बॅनर, दिनेश साळवी यांची सत्ताधाऱ्यांवर टीका
चारकोप मनसेने महागाईविरोधात चक्क “हिंदी” भाषेत बॅनर लावून लक्ष वेधले आहे. मनसे विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांचा हा हिंदी बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. चारकोप मनसे विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी महागाईच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. महागाईविरोधात त्यांनी लावलेला “हिंदी” बॅनर सध्या चर्चेत आहे.
सोशल मीडियावर पोस्ट लिहून दिनेश साळवी यांनी म्हटले आहे की, मतदारांना पैशांचे आमिष दाखवून सत्तेवर आल्यावर ती सत्ता टिकवण्यासाठी अदाणी सारख्या लोकांना खुश करावे लागते. सरकार चालविण्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढवावे लागतात.
-
शहीद जवान अर्जुन जाधव यांच्यावर आज लष्करी इतमामात अंतिम संस्कार
शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या वर आज कराड तालुक्यातील शहापुर येथे लष्करी इतमामात अंतिम संस्कार होणार आहेत. कुटुंबियांसह ग्रामस्थ त्यांच्या पार्थिवाच्या प्रतिक्षेत असुन शहापूर फाटयापासुन अंत्ययात्रा निघणार आहे.
-
-
काँग्रेसकडून वंचित उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्यासंदर्भात बैठक
अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून वंचित उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्यासंदर्भात बैठकींचे सत्र सुरूच आहे. काल रात्री पाठिंबा संदर्भात दोन बैठका; सुरुवातीला काँग्रेसच्या नेत्यांची अंतर्गत बैठक झाली. त्यानंतर वंचितच्या उमेदवारा सोबत एक गुप्त बैठक झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली. वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात आज दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. काल झालेल्या बैठकीचा तपशील अमरावतीतील काँग्रेस नेते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना कळवतील.
-
जालना जिल्ह्यातील 86 हजार लाडक्या बहिणी अपात्र
राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची ही केवायसी आणि प्रशासकीय पडताळणी पूर्ण झाली असून जालना जिल्ह्यातील तब्बल 86 हजार पेक्षा अधिक लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरल्याने त्यांचा हप्ता बंद झाला आहे. प्रलंबित इ केवायसी अर्जामधील त्रुटी आणि विविध शासकीय विभागांच्या पडताळणीनंतर या महिलांना योजनेतून अपात्र करण्यात आले असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण विभागाने दिली. सुरुवातीला जालना जिल्ह्यात 4 लाख 84 हजार 694 महिला लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी होत्या मात्र त्यानंतर कसून झालेल्या तपासणीत आता केवळ 3 लाख 98 हजार 102 महिलाच पात्र राहिल्या. शिवाय योजनेच्या नियमाचे उल्लंघन करून एकच कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभ घेणाऱ्या 11 हजार 288 महिला देखील आढळून आल्याचा समोर आलय.
-
Maharashtra News LIVE : भाजपाविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा प्रस्ताव अगोदरच देण्यात आला होता, अशी माहिती ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी आज सकाळी नागपूर विमानतळावर दिली. तर टीएमसीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनाही वेग आला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या रेल्वेवर उत्तर भारतात दगडफेकेची घटना घडली आहे. कानपूर येथून दिल्लीला जात असताना फिरोदाबाद जिल्ह्यात ही घटना घडली. शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या वर आज कराड तालुक्यातील शहापुर येथे लष्करी इतमामात अंतिम संस्कार होणार आहेत. तर हुलकावणी देत असलेल्या मान्सूनची राज्याला प्रतिक्षा लागली आहे. तर आमदार रोहित पवार यांचे संपूर्ण कर्जमाफीसाठी आजपासून पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
Published On - Jun 12,2026 8:00 AM
