Maharashtra News LIVE : पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 19 लाखांचा साठा जप्त
Maharashtra News LIVE : विधान परिषद निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 जून 2026 होती. त्यानंतर आज उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर अर्ज माघार घेण्याची मुदत 4 जून 2026 पर्यंत आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
पिंपरी-चिंचवडमधील अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांवर मोठी कारवाई
फुगेवाडीमधील विषारी दारू प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पथकांनी विविध भागांत छापे टाकून मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू, रसायने आणि दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहेत. अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-
जळगावच्या एमआयडीसीतील रेमंड पतसंस्थेत 38 लाख 84 हजारांचा घोटाळा
जळगावच्या एमआयडीसीतील रेमंड पतसंस्थेत 38 लाख 84 हजारांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात संस्थेचे तत्कालीन माजी सचिव आणि माजी व्यवस्थापक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सचिव नरेंद्र गोविंदराव पाटील आणि माजी व्यवस्थापक श्रीराम आत्माराम पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावं आहेत. माजी सचिव आणि माजी व्यवस्थापक या दोघांनी विविध निधींमधून हा डल्ला मारल्याचं विशेष लेखापरीक्षणात समोर आलं. तपासणीदरम्यान संस्थेच्या मुख्य खात्यांमध्ये आणि जमा-खर्चात वेगवेगळ्या हिशोबात आणि निधींमध्ये एकूण 38 लाख 84 हजार 241 रुपयांची अफरातफर केल्याचं समोर आलं.
-
-
मुंबईला पाणीपुरवठा करणारा अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला
मुंबईला पाणीपुरवठा करणारा अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला असून फक्त 40 दिवस पाणीपुरवठा होईल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राज्य सरकारच्या मालकीचा अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला आहे. यामुळे या तलावातून मुंबईला होणारा पाणीपुरवठा आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये 1 जूनपर्यंत या तलावात 7 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र यंदा परिस्थिती बिकट झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच तलावांमधील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस मोठी घट होत असून, सध्या केवळ 15.57 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
-
तुळजाभवानी मंदिर संस्थानला पेड दर्शनातून दोन कोटींचं उत्पन्न
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात अधिक मासामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अधिकमासाचा फायदा मंदिर संस्थानालाही चांगलाच होताना दिसून आला असून पेड दर्शनाच्या माध्यमातून मंदिर संस्थानला 15 मे ते 30 मे या कालावधीत जवळपास दोन कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. पेड देणगी दर्शनास भाविकांनी मोठी पसंती दिली आहे. या कालावधीत जवळपास 70 हजार भाविकांनी पेड दर्शन घेतलं आहे.
-
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन
कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारच्या धोरणामुळे कांद्याचे दर पडत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड रोष आहे. त्याविरोधात आज आंबेगाव तालुक्यातील मंचर इथं आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
-
-
जालना जिल्ह्यात 4 जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा
कुलाबा इथल्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून जालना जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याने शेती मालाचं नुकसान टाळण्यासाठी वेळीच नियोजन करावं असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
-
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची पाच ठिकाणी धडक कारवाई
पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव आणि खेड तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पाच ठिकाणी धडक कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या विशेष मोहिमेत तब्बल 19 लाख 3 हजार 379 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. मंचर इथं प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच, विनापरवाना चालणाऱ्या ‘खेमराज फूड इंडस्ट्रीज’मधून साडेदहा लाखांचा मैदा, बेसन आणि आट्याचा साठा जप्त करण्यात आला.
-
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. महायुतीत भाजपने ११ जागा स्वत:साठी ठेवल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाला चार तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन जागा सोडल्या आहेत. यावेळी भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीने गेल्या वेळी जिंकलेल्या छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या जागा स्वत:कडे घेतल्या आहेत. याशिवाय गेल्या वेळी काँग्रेसने जिंकलेला सातारा- सांगली, नांदेड या मतदारसंघांतही उमेदवार उभे केले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी शेवटपर्यंत आग्रही होते. पण भाजपने ही जागा सोडण्यास ठाम नकार दिला. तर दुसरीकडे कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारच्या धोरणामुळे कांद्याचे दर पडत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड रोष आहे. त्याविरोधात आज आंबेगाव तालुक्यातील मंचर इथं आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Jun 02,2026 8:12 AM
