Maharashtra Breaking News LIVE : नाशिक शहरात पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. याबद्दलची माहिती संजय राऊतांनी दिली. “निवडणूक आयोगाला भेटणं ही औपचारिकता आहे. कारण ते काहीच करत नाही. तरीही आमचे काही प्रश्न आहेत, शंका आहेत, काही रहस्य आहेत. त्यांचा उलगडा निवडणूक आयोगासमोरच करावा लागेल”, असं ते म्हणाले. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रवारी ते 18 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
नाशिक शहरात पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी
नाशिक – नाशिक शहरात पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. शहरात गुन्हेगारी वाढत असताना रात्रीच्या सुमारास शहर पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. संशयास्पद वाहने अडवून चौकशी आणि तपासणी केली जात आहे.
-
पालघरमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
पालघर – भाजपच्या तोडीस-तोड पक्षप्रवेश पार पाडून शिवसेनेने डहाणू नगरपरिषदेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. डहाणू नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजू माच्छी, शिक्षणमहर्षी मिलिंद पाटील,राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सईद शेख यांच्या विविध राजकीय पक्षांच्या सहप्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
-
-
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथे सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव नामंजूर
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथे सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव नामंजूर झाला आहे. आज झालेल्या अविश्वास प्रस्तावामध्ये डव्वा येथील 11 ग्रामपंचायत सदस्यांपैकी आठ सदस्य उपस्थित झाल्याने अखेर हा अविश्वास प्रस्ताव नामंजूर झाला…. कर्मचारी जखमी झाले…
-
सोलापूर: नाशिकमधील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ संस्थेतर्फे पूरग्रस्त शेतकऱ्यांना जीवनावश्यक कीटचे वाटप
नाशिकमधील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ संस्थेतर्फे पूरग्रस्त शेतकऱ्यांना जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा, उत्तर सोलापूर, करमाळा या तालुक्यातील 4600 नागरिकांना पूरग्रस्त कुटुंबाना हे किट देण्यात आले आहे. पुरामुळे सोलापूरकरांची दैना झाली आहे, त्यामुळे अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरुपीठातर्फे आम्ही ही छोटीशी मदत करत आहोत. दिवाळीपूर्वीच पूर आल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यांना दिवाळी साजरी करता यावी म्हणून आम्ही ही सेवा करतोय असं पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
-
भिवंडी: चाविंद्रा-वडपे रस्त्यावर भीषण अपघात, एका तरुणाचा मृत्यू
भिवंडी-पडघा या मार्गावरील चाविंद्रा-वडपे रस्त्यावर रात्री झालेल्या झालेल्या भीषण अपघातात एका तरुण इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणाची ओळख विनोद पाटील (वय 29, रा. कशेळी) अशी झाली आहे. तो वाशिंद येथील एका खाजगी कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत होता. नेहमीप्रमाणे काम आटोपून घरी परतत असताना ट्रक आणि त्याच्या दुचाकी मध्ये जोरदार धडक झाली आणि या भीषण धडकेत विनोद पाटील ट्रकखाली चिरडून जागीच ठार झाला.
-
-
बीड: केज शहरातील रस्ता रोको आंदोलनातील आंदोलकाने केले विष प्राशन
बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे साठवण तलाव करावा, ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी अहिल्यानगर-अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. यातील एका आंदोलकाने काही वेळापूर्वी ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. तर आता स्वप्निल वरपे नामक आणखी एका तरुण आंदोलकाने विष प्राशन केले असून त्याच्यावर केज येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
-
मनसेच्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे यांना आमंत्रण
महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून दरवर्षी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये दीपोत्सव साजरा केला जातो. यावर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीपोत्सवाच्या उद्घाटनला आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आता पुम्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसणार आहेत.
-
मंगोलियाचे राष्ट्रपतींनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
मंगोलियाचे अध्यक्ष खुरेलसुख उखना यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची संसद भवनात भेट घेतली. मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख उखना हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. त्यांच्या भेटीचा उद्देश द्विपक्षीय सहकार्य वाढवणे आहे
-
प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी
सातपूर गोळीबार प्रकरणी प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुख्य आरोपी भूषण लोंढे अद्यापही फरार आहे. पोलिसांची चार पथक भूषण लोंढेच्या मागावर आहे.
-
बीडच्या केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको
बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे साठवण तलाव करावा, ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी गेल्या पाच तासांपासून केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अहिल्यानगर-अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. यातील महिला आंदोलकांनी आता तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडलाय.
-
मैथिली ठाकूर भाजपमध्ये सामील होणार, बिहारमधील या जागेवरून निवडणूक लढवणार
मैथिली ठाकूर आज भाजपमध्ये सामील होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मैथिलीला अलीनगर विधानसभा जागेसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून ती भाजपात सहभागी होणार याची चर्चा होती.
-
आंबेगावमध्ये राष्ट्रवादी काका गटाला मोठा झटका
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष शेखर पाचुंदकर यांनी यांचा पक्षाला रामराम ठोकत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला.
-
अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रीवादीच्या जिल्हाध्यक्षांसह वरळी डोममध्ये बैठकीला सुरुवात
अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रीवादीच्या जिल्हाध्यक्षांसह वरळी डोममध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने ही बैठक होत आहे. त्यामुळे अजित पवार आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने युती बाबत काय भूमिका जाहीर करणार याकडे लक्ष लागून आहे.
-
KDMC कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 20 हजार रुपये बोनस म्हणून जाहीर
केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. केडीएमसीने बोनस म्हणून 20 हजार रुपये जाहीर केले आहेत. शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
-
बीड शहरात होणाऱ्या महाएल्गार सभेच्या बॅनरवर अखेर लक्ष्मण हाके यांचा फोटो
मंत्री छगन भुजबळ यांची बीड शहरात ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी येत्या 17 तारखेला महाएल्गार सभा होत आहे. यापूर्वी दोन वेळा बीड शहरात महाएल्गार सभेचे बॅनर लागलेले होते. या कुठल्याही बॅनरवर लक्ष्मण हाके यांचा फोटो नव्हता. यावरून मोठी चर्चा झाली होती. मात्र आता बीड शहरातील काही भागात नव्याने बॅनर लागले आहेत. या बॅनरवर लक्ष्मण हाके यांचा फोटो लावण्यात आला आहे.
-
कळव्यात क्लस्टर प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध
ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा परिसरात सुरू असलेल्या क्लस्टर प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांकडून तीव्र विरोध केला जात आहे. मनीषा नगर परिसरातील अनेक सोसायटींमध्ये रहिवाशांनी क्लस्टर नको अशी भूमिका घेत मोठ्या प्रमाणात बॅनर लावले आहेत. या बॅनरवर ठळकपणे जाहीर निषेध असा उल्लेख करण्यात आलेला आहे.
नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. स्थानिकांचा आरोप आहे की हा प्रकल्प नागरिकांच्या मतांचा विचार न करता राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कळवा परिसरात नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालंय.
-
कल्याण पूर्वेतील पत्रीपूल ते नवीन गोविंदवाडी रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य
कल्याण पूर्वेतील पत्रीपूल ते नवीन गोविंदवाडी रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य असलेले पाहायला मिळत आहे. वारंवार तक्रार करून पालिका लक्ष देत नसल्याने काँग्रेस आक्रमक झाले आहे. खड्ड्यात झाडं लावत या खड्डेमय रस्त्याला आयुक्तांच्या नावाचा फलक लावत नामकरण करत केले काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. रस्त्याचे काम तातडीने सुरू करा यासाठी काँग्रेसकडून आमरण उपोषण देखील सुरू करण्यात आलं आहे.
-
बीडच्या केज शहरातील चायनीज सेंटर चालवणाऱ्या तरुणावर टोळक्याकडून प्राणघात हल्ला
बीडच्या केज शहरातील बस स्थानकासमोर चायनीज सेंटर चालवणाऱ्या सय्यद इरशाद नामक तरुणावर दहा ते बारा जणांच्या टोळक्याकडून बील देण्याच्या किरकोळ कारणावरून लाठ्या-काठ्या आणि तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. लाठ्या काठ्या आणि नंगी तलवार फिरवत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न या गुंडांकडून करण्यात आला. यामध्ये सय्यद इर्शाद हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वाराती या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
-
नागरिकांना 2 वर्षात घरे मिळाली पाहिजेत यासाठी प्रयत्न; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
नागरिकांना 2 वर्षात घरे मिळाली पाहिजेत यासाठी प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने 2 वर्षांचे आगाऊ भाडं दिल्याचंही त्यांनी म्हटलं. मुंबई झोडपडपट्टीमुक्त करण्यासाठी क्लस्टर योजना आखली असून SAR आणि MMRDA ने मिळून हे काम केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
-
झोपडपट्टीत राहणाऱ्यांना सुंदर घरे देणार : मुख्यमंत्री
झोपडपट्टीत राहणाऱ्यांना सुंदर घरे देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मुंबई झोडपडपट्टीमुक्त करण्यासाठी क्लस्टर योजना आणल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. दोन वर्षात काम पूर्ण झालं पाहिजे असंही फडणवीसांनी म्हटलं.
-
केज शहरात रस्ता रोको आंदोलन
बीडच्या केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या एक तासापासून शेतकऱ्यांचा रस्ता रोको सुरू आहे. केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे साठवण तलाव करण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हा रस्ता रोको सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून साठवन तलावाच्या मागणीसाठी अनेक आंदोलने सुरू आहेत. तर कोरडेवाडी येथे 12 दिवसांपासून तरुणीचं आमरण उपोषण सुरू आहे.
-
अहिल्यानगरहुन छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गाची मोठी दुरावस्था
अहिल्यानगरहुन छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गाची मोठी दुरावस्था झाल्यामुळे प्रहार संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. या रस्त्यावर दररोज अपघातांची मालिका पाहायला मिळत असून पांढरीपूल घाट परिसरात हनुमंत शिकारे वय 53 यांचा या खड्ड्यांमुळे दुर्दैवी मृत्यू
-
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी ‘ई-मेल’ डिजिटल आंदोलन
करमाळा तालुक्यातील खांबेवाडी येथील किशोर शिंदे तरुणाचे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी ‘ई-मेल’ डिजिटल आंदोलन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनगर समाजाला ST मधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी दहा दिवसांत दहा लाख मेल करणार किशोर शिंदे यांची माहिती.
-
चोक्कलिंगम आणि राज्याच्या निवडणूक आयुक्तांसोबत उद्या बैठक होणार- संजय राऊत
चोक्कलिंगम यांच्यासोबत काही निर्णय अनिर्णित आहे. त्यामुळे उद्या बैठक होणार आहे. चोक्कलिंगम आणि राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे बैठकीला असतील. त्यामुळे उद्या चर्चा होईल. चर्चा अपुरी झाली आहे. पुन्हा उद्या चर्चा होणार आहे असे संजय राऊत यांनी सांगितले.
-
तीन वेळा नाकारल्यानंतर अखेर आज होऊ शकतो वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेली चर्चेला आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वैभव खेडेकर हे आज मुंबईतील भाजपा पक्ष कार्यालयात दाखल झाले असून, चौथ्यांदा प्रवेश होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी शक्तीप्रदर्शन करूनही तीन वेळा प्रवेश थांबविण्यात आला होता. मात्र आजचा दिवस ठरणार निर्णायक आहे.
-
निवडणूक आयोगाच्या भेटीगाठी म्हणजे उबाठा यांची अखेरची फडफड
निवडणूक आयोगाच्या भेटीगाठी म्हणजे उबाठा यांची अखेरची फडफड सुरु असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली. महाविकास आघाडीकडे आता दुसरा कुठलाच मुद्दा राहिलेला नाही..आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडे करायला दुसरा कोणता इव्हेंटही उरलेला नाही.. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भेटीगाठी घेऊन विरोधक राजकीय इव्हेंटस करण्याचा प्रयत्न करत आहेत.उद्धव ठाकरे यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्या पाहून त्यांची आता शेवटची फडफड सुरू झाली आहे..उद्धव ठाकरेंचे आता असं झालंय की त्यांना राज ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय राजकीय ग्लॅमर मिळत नाही. काँग्रेसने एकतर ठरवावं की त्यांना काय करायच आहे..? कारण एकीकडे वर्षा गायकवाड सांगतात की आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आणि दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव शिष्टमंडळात असून देखील ते अचानक दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले..त्यामुळे काँग्रेस मध्ये तरी काय चालले आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही, अशी टीका त्यांनी केली.
-
खोट्या मतदारांची नोंदणी झाल्या -जितेंद्र आव्हाड
विधानसभा निवडणुकी आधी १८ रोजी नोव्हेंबर आम्ही पत्र दिले आयोगाला, खोट्या मतदारांची नोंदणी झाल्या. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.आज एक आमदार सांगतो की आम्ही बाहेरून मतदार आणले.अजून काय पुरावा हवाय तुम्हाला, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. निवडणूक आयोगासोबत विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ भेटीला गेले आहे. या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील (शेकाप) शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रईस शेख, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे, कॉ. प्रकाश रेड्डी उपस्थित आहे.
-
यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका -राज ठाकरे
मतदार यादीत मोठा घोळ आहे. यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका असे मत मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी मांडले. तर तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का, असे आश्वासन द्या, अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली.
-
विरोधी शिष्टमंडळाची आयोगाकडे विचारणा
मुख्य निवडणूक आयोगासोबत विरोधी शिष्टमंडळाची चर्चा सुरू आहे. अनेक मुद्यावर निवडणूक आयुक्तासह अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात येत आहे. नव्याने 18 वर्षे पूर्ण करण्यात आलेल्या मतदारांच्या अधिकाराचे काय असा सवाल करण्यात आला.
-
खड्डे चुकवताना बाईकला अपघात, दोन चुलत भावांचा मृत्यू
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे दोन चुलत भावांचा खड्डे चुकवताना झालेल्या मोटरसायकल अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. मृत तरुणांपैकी एकाचा वाढदिवस होता, मात्र वाढदिवसाच्या दिवशीच त्याची अंत्ययात्रा निघाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आकाश जाधव आणि मयूर जाधव अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे दोघेही मंचरवरून अवसरीकडे आपल्या घरी येत असताना खड्डे चुकवताना पुलाच्या कठड्याला त्यांच्या दुचाकीने धडक दिली. या धडकेमुळे दोघेही डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या चारीमध्ये कोसळले आणि या दुर्दैवी घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
-
राज्य निवडणूक आयुक्तांंच्या भेटीनंतर सर्व नेते घेणार पत्रकार परिषद
सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर सर्व नेत्यांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी हे सर्व नेते या मुद्द्यावर भाष्य करणार आहेत.
-
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकाच गाडीतून प्रवास, मंत्रालयात दाखल
सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मंत्रालयात दाखल झाले आहेत.
-
निवडणूक आयुक्त कार्यालयात बैठक सुरु, अधिकारी उपस्थित
सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घण्यापूर्वी निवडणूक आयुक्त कार्यालयात बैठक सुरु आहे. या बैठकीला निवडणूक आयोगातील अधिकारी उपस्थित आहेत.
-
निवडणूक आयुक्तांना भेटण्यापूर्वी शिवालयात खलबतं सुरु
सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यापूर्वी शिवालयात खलबतं सुरु आहेत. यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात हे शिवालयात बैठकीसाठी उपस्थित आहेत.
-
मिलिंद नार्वेकर मंत्रालयात, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेणार
सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यापूर्वी मिलिंद नार्वेकर मंत्रालयात दाखल झाले आहेत. मिलिंद नार्वेकर हे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेणार आहेत.
-
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात शिवालयात दाखल, बैठक सुरु
सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात हे सर्व नेते शिवालय या ठिकाणी पोहोचले आहेत. सध्या या सर्वांची बैठक सुरु आहे.
-
ATS आणि तेलंगणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक केलेला तोसिफ शेख मालेगाव न्यायालयासमोर हजर
मालेगाव – ATS आणि तेलंगणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक केलेल्या तोसिफ शेखला मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
हा कायदा देशाच्या सार्वभौमत्व, एकात्मता आणि सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्यांवर कारवाईसाठी आहे. तोसिफला पुढील सुनावणीसाठी हैदराबाद न्यायालयात हजर केले जाणार. देशविघातक किंवा दहशतवादी संपर्क ठेवणं, प्रचार करणं याप्रकरणी कारवाई.
-
मुंबई – शरद पवार थोड्याच वेळात शिवालय कडे होणार रवाना
वाय बी चव्हाण मध्ये शशिकांत शिंदे, जयंत पाटील दाखल झाले आहेत. शरद पवार थोड्याच वेळात शिवालय कडे होणार रवाना.
-
सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्तांची घेणार भेट, राज ठाकरे रवाना
सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थहून रवाना झाले आहेत. शिवालय कडे जाण्यासाठी उद्धव ठाकरेही मातोश्रीहून निघाले.
-
पुणे – रांजणगाव येथे अहिल्यानगर पुणे महामार्गावर कारची वाहनांना धडक , अनेक जखमी
पुण्याच्या रांजणगाव येथे अहिल्यानगर पुणे महामार्गावर कारची अनेक वाहनांना धडक बसली असून यामध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धडक देणारे हे वाहन पोलीस अधिकाऱ्याचे असल्याचे समजते. याप्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
-
मिरा-भाईंदरमधील काही शिधावाटप केंद्रांमध्ये प्लास्टिक तांदूळ दिला जात असल्याचा व्हिडिओ समोर
मिरा-भाईंदरमधील काही शिधावाटप केंद्रांमध्ये प्लास्टिक तांदूळ दिला जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारी आहे, शिधा वाटप अधिकारी आणि कलेक्टर यांना मेल द्वारे युवक काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र खरात यांनी कळवले आहे. त्यांनी शिधा वाटप अधिकाऱ्यांना सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसंच तांदळाचे नमुने प्रयोगशाळेत तपासून त्याचा अहवाल जाहीर करण्यात यावा, अशीही विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रशासन काय पावलं उचलतं, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
-
भाईंदर पश्चिमेच्या गीता नगर भागात आज सकाळी गढुळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी
भाईंदर पश्चिमेच्या गीता नगर भागात आज सकाळी गढुळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे… असे पाणी आरोग्यास धोका ठरू शकते, आणि आता नागरिकांना घरातील पाणी टाक्या साफ कराव्या लागणार आहेत. सध्या मिरा भाईंदरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत, त्यामुळे पाईपलाईन तुटून गटाराचं पाणी नळांद्वारे घरी पोहोचतं. या गैरव्यवस्थेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.
-
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील वाघडू शिवारात कपाशी पीक अजूनही पाण्यात
शेतकऱ्यांच्या शेतात चिखल आणि पाणी साचल्याने शेतकरी हतबल… पंधरा दिवसापासून शेतात पाणी साचल्याने कपाशी पूर्णतः जळाले… शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रशासन सहकार्य करत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप… आमचं नुकसान झालं आम्ही दिवाळी कशी करायची शेतकऱ्यांचा सवाल… दिवाळी आधी शासनाने मदत द्यावी शेतकऱ्यांची मागणी…
-
२ कोटी रुपयांचे सव्वादोन किलो सोने चोरीला
जळगावच्या व्यापाऱ्याचे रेल्वेतून प्रवास करताना २ कोटी रुपयांचे सव्वादोन किलो सोने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. बडनेरा रेल्वे स्टेशनवर हावडा ते मुंबई मेल एक्स्प्रेसधील प्रवासादरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. किशोर ओमप्रकाश वर्मा असे 44 वर्षीय व्यापाऱ्याचे नाव असून त्यांच्या सोन्याची चोरी झाली आहे. या प्रकरणी बडनेरा रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
-
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा .. ?
भाजपाने सगळ्या 122 जागा स्वबळावर लढवाव्यात. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचे मुख्यमंत्र्यांना व प्रदेशाध्यक्षांना पत्र. नाशिकमध्ये भाजपची मोठी ताकद. भाजपाला इतर कोणाच्याही कुबड्या घेण्याची आवश्यकता नाही. बूथ पातळीवर भाजपची स्वतःची संपूर्ण यंत्रणा सज्ज.. प्रत्येक प्रभागात भाजपकडे स्वतःचे 4 ते 5 जण इच्छुक..
-
केज शहरातील चायनिज सेंटर चालविणाऱ्या एकावर धारदार शस्त्राने हल्ला
केज शहरातील बस स्टँड समोर चायनिज सेंटर चालविणाऱ्या सय्यद इर्शाद यांच्यावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याकडून धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली आहे. पाच ते सहा जणांनी धारदार हत्यारांने हल्ला केल्याने चायनीज सेंटर चालक सय्यद इर्शाद हे गंभीर जखमी झाले आहेत. केज उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिकच्या उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
-
बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळच्या सुमारास पुन्हा गोंधळ
बदलापूर रेल्वे स्थानकात आज सकाळच्या सुमारास पुन्हा गोंधळ झाला. खोपोलीहून येणारी ट्रेन 40 मिनिट उशीर आल्यानं रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी झाली. या विरोधात रेल्वे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. संतप्त प्रवाशांची रेल्वे आरपीएफ सोबत बाचाबाचीही झाली. सकाळी 7 वाजून 14 मिनिटांच्या सुमारास हा प्रकार घडला.
-
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मक्याची आवक
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 1000 क्विंटल मक्याची आवक. दररोज 500 ते 700 क्विंटल येणारा मका तब्बल 1000 क्विंटल एवढी विक्रमी आवक..मक्याला 1 हजार रुपयांपासून 1 हजार सातशे रुपये पर्यंत भाव. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मक्याची विक्रमी आवक..
-
वस्त्रांतर गृहाचा उर्वरित भाग तोडण्यास आजपासून पुन्हा सुरुवात
काल पाडण्यात आला वस्त्रांतर गृहाचा अर्धा भाग. नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेल्या वस्त्रांतर गृहाचे तोडकाम सुरू. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड करणार मोकळे. तोड काम सुरू असल्याने संपूर्ण परिसरात भाविकांना जाण्यास मज्जाव
-
पिंपरी चिंचवड- गौण खनिजांतून कोट्यवधींचा महसूल
पिंपरी चिंचवड- गौण खनिजांतून कोट्यवधींचा महसूल प्राप्त झाला आहे. पिंपरी-चिंचवड अप्पर तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात २०२४ पासून यंदा सप्टेंबर अखेरपर्यंतच १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा झाली आहे. २०२४ पासून यंदा सप्टेंबरपर्यंतचा गौणखनिज उत्खनन आणि रॉयल्टी वसुलीचा अद्ययावत अहवाल आला आहे
-
काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर आज शिवसेनेत प्रवेश करणार
हिंगोली- काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
-
तुळजाभवानीचं मंदिर आज भाविकांसाठी पहाटे एक वाजता खुलं
धाराशिव – तुळजाभवानीचं मंदिर आज भाविकांसाठी पहाटे एक वाजता खुलं करण्यात आलं. दिवाळी आणि नाताळाच्या सुट्ट्या लक्षात घेता तुळजाभवानी मंदिर आजपासून भाविकांसाठी पहाटे एक वाजल्यापासून खुलं करण्यात आले. येणाऱ्या 31 ऑक्टोबरपर्यंत मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी या गर्दीच्या दिवशी पहाटे एक वाजता देवीचे चरण तीर्थ होईल. सकाळी सहा ते दहा दरम्यान अभिषेक होणार आहेत. अभिषेक पूजेदरम्यान दिले जाणारे देणगी दर्शन पास बंद करण्यात आले असल्याची माहिती मंदिर संस्थान कडून देण्यात आली आहे.
-
अर्जुन खोतकरांची शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे मागणी
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात युरिया आणि डीएपी खतांच्या मोठ्या तुटवड्याला सामोरे जावे लागत असल्याने या समस्येची गंभीर दखल घेत शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी केंद्रीय खते आणि रसायन मंत्री जे पी नड्डा यांची दिल्लीमध्ये भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने युरिया आणि डीएपी खतांचा पुरवठा वाढवावा अशी मागणी केली. जिल्ह्यात सध्या खतांच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत असून रब्बी हंगामात सुद्धा खताची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं खोतकर यांनी दिलेला पत्रामध्ये म्हटलं.
-
वसई विरार पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार 22 हजार दिवाळी बोनस
वसई विरार शहर महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिवाळीच्या सणांच्या मुहूर्तावर 3 हजार 640 कर्मचाऱ्यांना 22 हजारांचा बोनस देण्यात येणार असल्याचं सांगितलं. यामध्ये पालिकेतील कायम स्वरुपी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 2 हजारांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे 8 कोटी 8 लाखांचा भुर्दंड पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे.
-
नाशिक- डिजिटल अरेस्टच्या घटनेत ज्येष्ठ नागरिकांना कोट्यवधी रुपयांना लुटलं
नाशिक- भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात ऑनलाइन हजर करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपये लुटले. डिजिटल अरेस्टच्या घटनेत ज्येष्ठ नागरिकांना कोट्यवधी रुपयांना लुटले. नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. एका घटनेत ज्येष्ठ नागरिकाला 72 लाख रुपयांना लुटले तर दुसऱ्या घटनेत एका ज्येष्ठ नागरिकाचे तब्बल 6 कोटी रुपये लंपास केले.
-
सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेणार निवडणूक आयोगाची भेट
सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश आहे. याविषयीची माहिती संजय राऊतांनी सोमवारी दिली.
Published On - Oct 14,2025 8:05 AM
