
स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवणाऱ्या भोंदू अशोक खरात यांच्या कारनाम्यांची चौकशी आता जोरात सुरू आहे. एसआयटीने तपासाला वेग दिला असून, खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

खरातच्या अधिकृत कार्यालयात नव्हे, तर त्याने उभारलेल्या ५ कोटींच्या ‘तृप्तबाला’ महालात अनेक गुपिते दडली असल्याचे उघड होत आहे. विशेष म्हणजे, अमावस्येच्या रात्री अनेक बड्या राजकीय नेत्यांनी चोरपावलांनी या महालात हजेरी लावल्याची माहिती समोर आल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नाशिकमधील एका गल्लीत, जिथे तीन माजी आमदारांचे वास्तव्य आहे, तिथेच सुमारे २०१२ साली अशोक खरात यांनी साडेपाच कोटी रुपयांहून अधिक खर्च करून ‘तृप्तबाला’ नावाचा भव्य बंगला उभारला. बाह्य भव्यतेमुळे प्रसिद्ध असलेला हा महाल आता केवळ लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांमुळे नव्हे, तर त्याच्या भिंतींमागे दडलेल्या काळ्या रहस्यांमुळे चर्चेचा विषय बनला आहे.

एका वृत्तानुसार, अमावस्येच्या रात्री या बंगल्याचे स्वरूप पूर्णपणे बदलून जायचे. स्थानिक नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “अमावस्येच्या रात्री बंगल्याबाहेर महागड्या आलिशान गाड्यांच्या रांगा लागायच्या.”

राजकीय नेते, उच्च अधिकारी आणि आपली ओळख लपवणारे अनेक ‘व्हीआयपी’ लोक खरातच्या कार्यालयात न जाता, थेट या बंगल्यावर चोरट्या पावलांनी यायचे. रात्रीच्या अंधारात रंगणाऱ्या या गुप्त ‘दरबारात’ नेमके काय घडायचे, याची आता संपूर्ण नाशिकमध्ये दबक्या स्वरात चर्चा सुरू आहे.

खरातने केवळ सिमेंटची तटबंदी उभारली नव्हती, तर सुरक्षेच्या नावाखाली दहशतीचे एक छोटे साम्राज्य निर्माण केले होते, असे सांगितले जाते. बंगल्याच्या आवारात लाखो रुपयांचे दोन विदेशी जातीचे हिंस्र कुत्रे पाळण्यात आले होते. या कुत्र्यांच्या भीतीमुळे परिसरातील नागरिक या बंगल्याच्या जवळ फिरकायलाही धजावत नसत.

एक प्रकारे या श्वानांच्या मदतीने खरातने आपल्या काळ्या कारनाम्यांभोवती एक ‘अदृश्य कुंपण’ निर्माण केले होते, ज्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्य बाहेर येणे कठीण झाले होते.