सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर त्याच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली असून, यानंतर शिवसेनेच्या उबाठा नेता माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर तपासासाठी गुन्हे शाखेची सर्व युनिट्स एकत्र आली. मात्र मॉरिसकडून माझे पती अभिषेक घोसाळकर यांची दिवसाढवळ्या हत्या झाली त्या मर्डर केसचा तपास केला जात नाहीये, असा आरोप त्यांनी केला आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले की, सलमानच्या घरावर गोळीबार झाल्याचे दुःख आहे, मात्र त्याची सुरक्षा वाढवली जात आहे, सीसीटीव्ही फुटेज काढले जात आहेत. तसेच अभिषेक घोसाळकर प्रकरणात आम्ही सीसीटीव्ही दिल्यानंतरही योग्य कारवाई का होत नाही? असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे. दरम्यान, तेजस्वी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी करणार आहेत.