इंधनाची चिंता मिटणार! 2 पेट्रोलियम जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे रवाना
Fuel Shortage : इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. असं असलं तरी आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे 2 पेट्रोलियम जहाजे रवाना झाली आहेत.

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी गॅसची कमतरता निर्माण झाली आहे, तसेच काही पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. अशातच आता भारतातील इंधन संकट काहीसे कमी होण्याची शक्यता आहे. कारण भारतासाठी पेट्रोलियम उत्पादने घेऊन जाणारी आणखी दोन व्यापारी जहाजे सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनी पार करत असल्याची माहिती समोर आली आहे. हा भारतासाठी मोठा दिलासा आहे.
दोन पेट्रोलियम जहाजे भारताकडे रवाना
सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, दोन पेट्रोलियम जहाजे भारताकडे रवाना झाली आहेत. गरज पडल्यास मदतीसाठी भारतीय नौदलाची युद्धनौका स्टँडबायवर तैनात आहेत. या भागात सध्या तणावाचे वातावरण आहे. या भागातून प्रवास करण्यासाठी काही निवडक जहाजांनाच प्रवेश दिला जात आहे. तसेच जी जहाजे विना परवानगी या भागातून प्रवास करत आहेत, त्यांच्यावर हल्ले होत आहेत. त्यामुळे अनेक जहाजे क्लिअरन्सची वाट पाहत आहेत. या जहाजांना परवानगी मिळत नसल्यामुळे अनेक देशांवर मोठा परिणाम झाला आहे.
भारताच्या जहाजांची वाहतूक सुरू
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी, इपाणने काही मित्र देशांची यादी जाहीर केली आहे. यात भारत, रशिया, चीनसह इतर दोन देशांचा समावेश आहे. या देशांच्या जहाजांना होर्मुज सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारताकडे येणाऱ्या या जहाजांचा प्रवास या परवानगीनंतर सुरू झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी कॅरियर शिवालिक आणि नंदा देवी या जहाजांनी होर्मुज पार केले होते. तसेच भारतासाठी एलपीजी घेऊन जाणारे पाइन गॅस आणि जग वसंत या टँकर्सनेही या मार्गाने प्रवास केला होता.
भारतीय नौदलाकडून सुरक्षा व्यवस्था
भारतीय नौदलाने होर्मुज सामुद्रधुनी आणि आसपासच्या भागात व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी युद्धनौका तैनात केल्या आहेत. भारतीय ध्वजाखालील तसेच भारताकडे येणाऱ्या जहाजांना मदत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात जीपीएसमध्ये अडथळे आणि संभाव्य समुद्री माईन्सबाबत इशारे देण्यात आले आहेत, ज्यामुळे जहाजांच्या नेव्हिगेशनवर परिणाम होत आहे.
