केजरीवालांचं अभिनंदन, दिल्लीकरांनी भाजपच्या भ्रमाचा भोपळा फोडला : उद्धव ठाकरे

| Updated on: Feb 11, 2020 | 2:59 PM

आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी केला.

केजरीवालांचं अभिनंदन, दिल्लीकरांनी भाजपच्या भ्रमाचा भोपळा फोडला : उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Uddhav Thackeray on Delhi Election result) यांचं विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल कौतुक केलं आहे. दिल्लीतील ‘आप’च्या विजयाने अरविंद केजरीवाल यांनी जन की बात देशाला दाखवून दिली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला टोला लगावला. (CM Uddhav Thackeray on Delhi Election result)

आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे आणि दिल्लीतील जनतेचे मन:पूर्वक  अभिनंदन.  दिल्लीतील जनतेने मन की बात नव्हे तर जन की बात आता देशात चालणार हे दाखवून दिले आहे. तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ूसमोर टिकाव लागला नाही. बलाढ्य पक्षाने आपले रथी महारथी निवडणुकीत उतरवून, अरविंद केजरीवाल यांची थेट दहशदवाद्यांशी तुलना करुन, स्थानिक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून, मतदारांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करुन सुद्धा अरविंद केजरीवाल यांना ते पराजीत करू शकले नाहीत.

दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे उभी राहिली आणि जनतेने लोकशाहीवरचा भरोसा कायम असल्याचे दाखवले. आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळाही दिल्लीकर मतदारांनी फोडला. दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे मी महाराष्ट्रातर्फे आणि शिवसेनेतर्फे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी विकासमय वाटचालीस शुभेच्छा देतो.” अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.