स्वतः घरी बसलात म्हणून लोकांना घरी बसवायचा विचार आहे का? संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला सवाल

हे सरकार फक्त फेसबुकवर घोषणा करणारं आहे, प्रत्यक्षात काहीच केलं जात नाही, अशी टीकाही संदीप देशपांडे यांनी केली

स्वतः घरी बसलात म्हणून लोकांना घरी बसवायचा विचार आहे का? संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला सवाल
sandeep deshpande
| Updated on: Oct 04, 2020 | 11:09 AM

मुंबई : स्वतः घरी बसले म्हणून लोकांना घरी बसवायचं असा ठाकरे सरकारचा विचार आहे का, असा प्रश्न पडत असल्याचं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले. हे सरकार फक्त फेसबुकवर घोषणा करणारं आहे, प्रत्यक्षात काहीच केलं जात नाही, अशी टीकाही देशपांडेंनी केली. (Sandeep Deshpande Criticizes Thackeray Government)

‘तुम्ही रेस्टॉरंट-बार सुरु करत आहात. एक-एक आस्थापना सुरु करताय, पण त्यासाठी लोकांनी कामावर कसं जायचं? त्या प्रश्नाचं उत्तर सरकार देत नाही’ संदीप देशपांडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी याबाबत बातचित केली.

‘नुसती घोषणा करता, 15 ऑक्टोबरपासून लोकल सेवा सुरु करण्यासाठी विचाराधीन आहोत. त्यासाठी विचार करावा लागतो. विचार करण्याचं धाडस सरकरमध्ये नाही’ अशी टीकाही संदीप देशपांडेंनी केली. 15 ऑक्टोबरपासून लोकल सुरु करण्याचा विचार असल्याचं मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

“हायकोर्टाने कान टोचले तरी बुद्धी नाही”

‘हायकोर्टाने कान टोचले तरी यांना बुद्धी सुचत नाही. स्वतः घरी बसले म्हणून लोकांना घरी बसवायचं असा ठाकरे सरकारचा विचार आहे का, असा प्रश्न पडतो’ असंही देशपांडे म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार करा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता.

’10- 15 दिवस झाले आम्ही सातत्याने मागणी करत आहोत, बँक रोज कर्जासाठी तगादा लावत आहे, लोक कामावर गेले नाहीत, तर कसे भरणार हे पैसे?’ असा सवालही संदीप देशपांडे यांनी केला. ज्या कॅटेगरी सुरु केल्या, त्या ठिकाणी काम करणाऱ्यांना तरी परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी केली.

‘लोक आता याचं उत्तर देतील. आंदोलन करुन जर सरकारला अक्कल येत नसेल आणि सरकारला डोकं नसेल तर आपण तरी काय करणार? हे सरकार फक्त फेसबुकवर घोषणा करणारं आहे, प्रत्यक्षात काहीच केलं जात नाही’ अशी टीकाही संदीप देशपांडे यांनी केली. (Sandeep Deshpande Criticizes Thackeray Government)

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांकडून हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत, कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? संदीप देशपांडेंचा टोला

(Sandeep Deshpande Criticizes Thackeray Government)